महाराष्ट्रात महात्मा फुले यांनी शिक्षण व समानतेचा पाया रचला, भाजप नेते जालिंदर कामठे
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानतर्फे कोंढवा व हिवरे येथील शाळेत महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

प्रा. मीरा बडे-सांगळे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ११ एप्रिल २०२५ :- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि समानतेचा पाया रचण्याचे काम केले आहे. त्यांनी रचलेल्या या पायावरच आजचा भक्कम महाराष्ट्र उभा राहत असताना आपणास दिसून येत आहे, असे मत भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी शुक्रवारी (दि.११ एप्रिल) येथे बोलताना व्यक्त केले.
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या हिवरे (ता. पुरंदर) येथील गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालय आणि हवेली तालुक्यातील कोंढवा येथील प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यावेळी कामठे बोलत होते. हिवरे येथील कार्यक्रमाला पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य महेश शेंडकर,शब्बीर शेख, रमेश कुदळे,दीपक गायकवाड, शंकर कुदळे, मुख्याध्यापिका सुनीता रायडू, चंद्रशेखर गुरव, दत्तात्रेय गायकवाड, संजय शेडगे,रोहिणी गायकवाड, विकास भोसले, संदीप चाचर,वैशाली पवार,मेघा गायकवाड, स्मिता बोराटे, स्वाती बोरकर आदी उपस्थित होते.
दरम्यान,कोंढवा येथील प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालयात कामठे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी या विद्यालयाचे प्राचार्य भानुदास रिठे ,पर्यवेक्षक हेमंत जाधव,प्रतिमा केदार,विकास मोरे,स्वाती डहाळे, ज्ञानदेव गायकवाड आणि हरिभाऊ खेडकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जालिंदर कामठे म्हणाले, "महात्मा फुले यांची जयंती ही सामाजिक समतेचा,शिक्षणाचा आणि सशक्ततेचा संदेश देणारी प्रेरणादायी ठरणारी आहे. महात्मा फुले हे १९ व्या शतकातील महान समाजसुधारक होते. ज्यांनी स्त्री-पुरुष समानता,शिक्षणाचा प्रसार आणि जातीव्यवस्थेच्या विरोधात लढा दिला. महात्मा फुले यांचे विचार आजही समाजसुधारणेसाठी दिशादर्शक ठरतात. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि स्त्री-पुरुष समानतेसाठी केलेल्या कार्याला विनम्र अभिवादन करतो. महात्मा फुले यांचे विचार कायमस्वरूपी अजरामर राहतील."