'एनएमएमएस' (आर्थिक दुर्बल) शिष्यवृत्तीची ३८ कोटींची रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या थेट खात्यात जमा
महाराष्ट्रातील ३१ हजार विद्यार्थ्यांचा समावेश: शिष्यवृत्तीसाठी आधार सीडिंग आवश्यक

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १० एप्रिल २०२५ :- महाराष्ट्रातील आतापर्यंत ३१ हजार विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत (एनएमएमएस) शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, या सर्व पात्र विद्यार्थ्यांच्या थेट बॅंक खात्यात या शिष्यवृत्तीची ३८ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. नुकत्याच संपलेल्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची ही शिष्यवृत्ती असून, केंद्र सरकारने ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे.
महाराष्ट्रातील अपेक्षित ४० हजार ५५० पैकी आतापर्यंत ३६ हजार ३७६ विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS)या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. यापैकी ३५ हजार ४१४ अर्जांची पडताळणी पूर्ण झाली असून, नवीन ८ हजार ९३७ आणि नूतनीकरणाचे २२ हजार ७३० अशा एकूण ३१ हजार ६६७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार रुपयांप्रमाणे शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्यावतीने पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे. उर्वरित सुमारे ३ हजार ७०० विद्यार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकासोबत सीडिंग केलेले नाही, त्यांनी तत्काळ आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा त्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणार नाही. विद्यार्थ्यांनी आपले आधार-सीडेड खाते तपासून आवश्यक ती दुरुस्ती करावी, असे आवाहन राज्याचे शिक्षण संचालक (योजना विभाग) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.
'एनएमएमएस' शिष्यवृत्तीचा उद्देश
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही शिष्यवृत्ती दिली जाते.ही केंद्रशासन पुरस्कृत योजना असून, ती सन २००७-०८ पासून सुरू करण्यात आलेली आहे. राज्यातील कोणत्याही शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानीत शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले इयत्ता ८ वीच्या वर्गातील विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतात.
शिष्यवृत्तीचे स्वरूप आणि पात्रतेचे निकष
- यासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी पासून बारावीपर्यंतच्या ४ वर्षांसाठी दरमहा १ हजार रुपये (वार्षिक १२ हजार रुपये) शिष्यवृत्ती दिली जाते.
- पालकांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे लागते.
- ही योजना शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना योजना लागू आहे.
- केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच राज्य शासनाच्या वसतिगृह सवलतीतील विद्यार्थी अपात्र असतात.
- इयत्ता १० वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रम घेतल्यास शिष्यवृत्ती मिळणार नाही.
- इयत्ता १० वीमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक तर, अनुसूचित जाती व जमातीसाठी ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते आवश्यक आहे.
- विद्यार्थीचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे बंधनकारक आहे.
उर्वरित विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी ऑफलाइन करणार
सन २०२४-२५ मध्ये निवड झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी एन. एस.पी. पोर्टलवर या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरलेला नव्हता किंवा अर्ज पडताळणीसाठी शाळा स्तरावर प्रलंबित होते, अशा ४ हजार १७४ पैकी ३ हजार २०० विद्यार्थ्यांच्या अर्जांची ऑफलाइन पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत.यानुसार जिल्हास्तरावर शिक्षण अधिकारी (योजना विभाग) यांच्याकडून या अर्जांची ऑफलाइन पडताळणी केली जाणार आहे. या पडताळणीनंतर अशा विद्यार्थ्यांची माहिती एक्सल शीटमध्ये योजना संचालनालयाकडे येत्या १५ एप्रिलपर्यंत पाठविण्यात येणार आहे. शिवाय यातील पात्र विद्यार्थ्यांची माहिती आणि बँक तपशील शिक्षणाधिकारी (योजना) यांच्याकडून मागविण्यात आली आहे. त्यामुळे आधार सीडिंग बाकी असलेल्या ३ हजार ७०० आणि पडताळणी बाकी असलेल्या ३ हजार २०० अशा आणखी एकूण ६ हजार ९०० विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शिष्यवृत्ती मिळणार आहे.
एनएमएमएस परीक्षा आणि निकाल
चालू आर्थिक वर्षासाठी (सन २०२५-२६) डिसेंबर २०२४ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्रासाठी ११ हजार ६८२ शिष्यवृत्तींचा कोटा केंद्र सरकारने निश्चित केला आहे.