तरुणांनो, आत्महत्या कशाला करताय, किमान आम्हाला समस्या तर सांगा ना, आम्ही त्यावर मार्ग काढू!

कनेक्टिंग ट्रस्टची तरूणांना साद : आत्महत्त्यांवर उपायांसाठी तरुणांनो, बोलते व्हा, व्यक्त व्हा, टोकाचा निर्णय घेऊ नका

तरुणांनो, आत्महत्या कशाला करताय, किमान आम्हाला समस्या तर सांगा ना, आम्ही त्यावर मार्ग काढू!
पुणे :- आनंदी तरुणाई

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २३ एप्रिल २०२५ :-   बेरोजगारीमुळे तरूणांमध्ये मानसिक ताणाचे प्रमाण वाढू लागले आहे. यातूनच काही तरुण टोकाची पावले उचली लागली आहेत. त्यामुळे मानसिक तणावग्रस्त तरूणांना आत्महत्त्यांपासून परावृत्त करण्यासाठी कनेक्टिंग ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. तरुणांनो, आत्महत्या कशाला करताय?, किमान आम्हाला समस्या तर सांगा ना, तुमच्या समस्यांवर आम्ही नक्कीच मार्ग काढू, अशी भावनिक  साद या ट्रस्टने तरुणांना घातली आहे. बोलते व्हा, आपले मन मोकळे करा. मनातील नैराश्याचे ओझे दूर करून कणखरपणे उभे राहा. पण आत्महत्या करु नका, असे आवाहन तरुणाई, समाजातील नैराश्य व तणावग्रस्त व्यक्तींना केले आहे. 

सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या नुकत्याच झालेल्या आत्महत्येने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर गेल्या तीन महिन्यात पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या परिसरात २२४ आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे तरुणांचे असून, १७७ पुरुषांचा समावेश आहे. ही आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे तरुण पिढीच्या मानसिक व भावनिक समस्यांकडे अतिशय गंभीरतेने बघायची गरज निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर कनेक्टिंग ट्रस्टने टोकाचा निर्णय घेऊ नये, असेही आवाहन केले आहे. 

मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंधासाठी गेल्या २० वर्षांपासून कनेक्टिंग ट्रस्ट ही संस्था हेल्पलाईनद्वारे काम करत आहे. तणावाखाली किंवा नैराश्यात असलेल्या व्यक्तींना भावनिक आधार देत, त्यांना व्यक्त होण्याची संधी देत आत्महत्येपासून परावृत्त केले जात आहे. 

गेल्या वर्षी संस्थेच्या हेल्पलाइन क्रमांकांवर एकूण ९ हजार ३४० फोन आले. त्यामध्ये ६५ टक्के पुरुषांचे, तर ३५ टक्के महिलांचे‌ फोन होते. शिवाय यामध्ये सर्वाधिक फोन हे १८ ते ४० वयोगटातील व्यक्तींकडून आल्याचे निरीक्षण आहे. एका बाजूला तरुण वर्गामध्ये मानसिक आरोग्याविषयी वाढत असलेली जागरूकता आणि संवेदनशीलता दिसते, तर दुसरीकडे याच तरुणाईमध्ये तीव्र मानसिक ताणतणाव आणि आत्महत्येचे वाढते प्रमाण बघायला मिळत असल्याचे या संस्थेचे प्रकल्प समन्वयक  विक्रमसिंह पवार यांनी सांगितले. 

तणावग्रस्त व नैराश्याची कारणे

- शिक्षण व नोकरीमध्ये येणाऱ्या समस्या. 
- नातेसंबंधांमधील तणाव.
- आर्थिक अडचणी.
- मानसिक आजार. 
- कौटुंबिक कलह.
- सामाजिक विषमता.
- लैंगिक समस्या.
- प्रेम प्रकरणातील ताण.
-  व्यसनाधिनता.

मदतीसाठी हे आहेत हेल्पलाईन नंबर 

समाजातील तणावग्रस्त किंवा नैराश्यात असलेल्या तरुण-, तरुणांना किंवा व्यक्तींना आपापल्या समस्या मांडता याव्यात, यासाठी संस्थेने ९९२२००४३०५ व ९९२२००११२२ हे दोन  विनामूल्य हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून दिले आहेत. आठवड्यातील सातही दिवस सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे दोन्ही हेल्पलाईन नंबर कार्यरत असतात. फोन करण्याच्या सुविधेसह अपॉइंटमेंटद्वारे प्रत्यक्ष भेटून बोलायची सोयही आहे. विनामूल्य अपॉइंटमेंट घेण्यासाठी ८४८४०३३३१२ या मोबाईल क्रमांकावर फोन किंवा मेसेज करणे आवश्यक आहे. याशिवाय distressmailsconnecting@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल. या सर्व सुविधा मोफत उपलब्ध आहेत.