World Anti-Drug Day Special :- महाराष्ट्रातील तरुण पिढीमध्ये वाढतेय अंमली पदार्थ व्यसनांची विकृती, वेळीच सावध व्हा, अन् या उपाययोजना करा!

World Anti-Drug Day Special :- महाराष्ट्रातील तरुण पिढीमध्ये वाढतेय अंमली पदार्थ व्यसनांची विकृती, वेळीच सावध व्हा, अन् या उपाययोजना करा!

World Anti-Drug Day Special :- महाराष्ट्रातील तरुण पिढीमध्ये वाढतेय अंमली पदार्थ व्यसनांची विकृती, वेळीच सावध व्हा, अन् या उपाययोजना करा!
पुणे:- भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई.

दरवर्षी २६ जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. एकीकडे आपण हा दिवस साजरा करत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील तरूण पिढी मात्र अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ लागली आहे‌. परिणामी राज्यातील तरुण पिढीमध्ये दिवसेंदिवस व्यसन विकृती वाढू लागली आहे. हीच व्यसन विकृती भावी पिढ्यांसाठी मोठा काळ बनणार आहे. त्यामुळे समाजातील विविध घटकांनी वेळीच या विकृतीला ठेचण्याची गरज आहे. या वाढत्या विकृतीची कारणे, प्रमाण आणि उपाययोजना या अनुषंगाने घेतलेला हा आढावा. 

- प्रा. डॉ. मिलिंद भोई,
अध्यक्ष, भोई प्रतिष्ठान व 
समुपदेशक,अमली पदार्थ विरोधी मोहीम, पुणे. 

मित्रांनो, आज (दि. २६ जून) आपण जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करत आहोत. या दिनानिमित्त जरी आपण यावर विचारमंथन करत असलो तरी, याच्यासाठी केवळ कुठलाही एक दिवस न ठरवता रोजच या शत्रूबरोबर रोजच प्रभावीपणे लढण्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे. कारण महाराष्ट्रातील तरूण पिढीमध्ये दिवसेंदिवस यांचे प्रमाण वेगाने वाढू लागले आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील तरुण पिढीतील व्यसनांची समस्या का वाढली?, याचेही मंथन आपण सर्वांनी एकत्र येत, करणे गरजेचे आहे. राज्यात आर्थिक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक होऊ लागला आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी ही मोठी धोक्याची घंटा आहे. 

अंमली पदार्थांच्या आहारी जाण्याची कारणे 

- सामाजिक माध्यमे,मोबाइल, इंटरनेटचा वाढता वापर 

सामाजिक माध्यमे, मोबाइल आणि इंटरनेटमुळे किशोरवयीन मुलांना जगातील नवनवीन अनुभव  घेणे सहज साध्य झाले आहे. ज्या अनुभवाबाबत वेळीच योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास ते व्यसनाच्या वाटेवर  जातात.सध्या अनेक चित्रपटांमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवणाऱ्या सिरीयल्स आणि मालिकांमधून या सर्व गोष्टींचा मुक्त वावर दाखवला जातो. कारण ज्याला कोणतेही संसाराचे बंधन नाही अशी आताची शालेय  व  तरुण पिढी ही या प्रसारमाध्यमांची विशेष शौकीन आहे. त्याचे ग्लोरिफिकेशन झाल्यामुळे, त्यामध्ये काही वाईट आहे हे कळण्याऐवजी ते स्टेटस सिम्बॉल किंवा फॅशन आहे आणि सध्याच्या काळाची गरज आहे, अशी एक चुकीची समजूत मुलांमध्ये बिंबवली गेली आहे.

- अभिव्यक्तीच्या नावाखाली काही तरुणांचे चुकीच्या दिशेने पाऊल 

आपल्या मुला-मुलींचे शिक्षण आणि करिअर योग्य पद्धतीने व्हावे, या उद्देशाने अनेक पालक हे आपल्या मुला-मुलींना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवतात. त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे व त्यांनी आयुष्यात काहीतरी चांगले बनावे, ही त्यांची यामागची भावना असते. मेडिकल, इंजिनिअरिंगसारखे व्यावसायिक अभ्यासक्रम असतील किंवा एमपीएससी यूपीएससी या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी बाहेरगावी शहरात राहणारे विद्यार्थी असतील, अशांना घरून मुबलक प्रमाणात पैसे मिळत असतात. पण हे विद्यार्थी या पैशातून  शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागवण्याऐवजी अशा प्रकारच्या अंमली पदार्थांकडे झुकत असतात. प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात पैसे आणि चुकीची संगत, चुकीचा मित्रपरिवार यामागचे प्रमुख कारण आहे.

- पालकांची भूमिका अन् जबाबदारीचा अभाव

पालक,समाज, शिक्षक हे तीनही घटक  एकमेकांवर जबाबदारी टाकत आहेत. परिणामी मुलांच्या संपर्कात आणि मार्गदर्शनात तुटकपणा जाणवतो.

- घरात पैसे खर्च करण्याच्या मुभेचा गैरवापर 

काही पालक हे मुले स्वतःच स्वतःचा पैसा कमवून, त्याचा विनियोग कसा करतात,याकडे लक्ष देत नाहीत. कारण तेवढा वेळ पालकांनाच नाही. काही बाबतीत मुले ही केवळ व्यसनासाठीच पैसे मिळवतात. पूर्वी परदेशात जाऊन राहणारे मुले किंवा शहरात जाऊन राहणारे मुले ही स्वतःच काहीतरी कामधंदा करून स्वतःचा शैक्षणिक खर्च भागवत होती. जेणेकरून त्याचा ताण पालकांवर पडू नये.आता ही मुले काम करतात आणि त्याचे मिळणारे पैसे दुर्दैवाने अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये खर्च करतात. पालक लांब असल्यामुळे त्यांना याचा काही  पत्ता लागत नाही. परिस्थिती अगदी हाताबाहेर जाते, तेव्हा काहीच करता येत नाही. 

- चित्रपट सृष्टी, स्वप्न नगरीमध्ये फिल्मी पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांचा मुक्त वापर

सध्या चित्रपटसृष्टी आणि स्वप्ननगरीमध्ये अनेक कलाकार हे विद्यार्थी प्रकारच्या पार्ट्यांचे आयोजन करत असतात. यामध्ये विशेषतः  रेव पार्ट्या, न्यू इयर फेस्टिवल आदींचा समावेश आहे. अशा गोंडस नावाखाली केल्या जाणाऱ्या पार्ट्यांमध्ये मुबलक प्रमाणात अंमली पदार्थांचे वितरण होत असते. एखादा तरुण किंवा तरुणी नुसती पार्टीला जरी गेली तरी तिथले वातावरण बघून त्यांना या गोष्टींचा मोह होतो आणि मग त्याची सुरुवात होते.

- शाळा व महाविद्यालयात व्यसन वाढ

अभ्यासाचा ताण, स्पर्धा, साथीजनांचे दबाव आणि सामाजिक वातावरण यामुळे अनेक तरुण हे व्यसनाकडे  वळत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे महाविद्यालयांमध्ये व्यसनाची समस्या खूपच वाढली आहे. पूर्वी  शया सर्व पदार्थांच्या सवयी या महाविद्यालयीन जीवनात लागत होत्या. पण आता दुर्दैवाने त्याची सुरुवात आता शालेयस्तरावर होत आहे. ही अत्यंत गंभीर आणि काळजी करण्याची गोष्ट आहे.

महाराष्ट्रातील व्यसनग्रस्त तरुण : काही ठळक आकडे

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या सन 2018–19 च्या नॅशनल सर्व्हे ऑन एक्सटेंड अॅंड पॅटर्न ऑफ सब्स्टन्स युजर इन इंडिया (National Survey on Extent and Pattern of Substance Use in India)  नुसार देशात सुमारे १४.६ टक्के लोकांनी अल्कोहॉलचा वापर केल्याचे दिसून आले आहे. ज्यात महाराष्ट्र हे अग्रगण्य राज्यांपैकी एक आहे. याचाच अर्थ असा आहे की, समाजात अल्कोहोलचे व्यसन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ही आकडेवारी जरी आपल्याला दिसत असली तरी हे फक्त हिमनगाचे टोक आहे. प्रत्यक्ष परिस्थिती खूपच गंभीर आहे. विशेषतः मुंबई आणि महानगरात घटनेचा प्रसार वेगाने वाढत आहे.  सन २०२० च्या क्राइम इन इंडियाच्या  (Crime in India 2020) च्या अहवालानुसार एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत मुंबईत ३ हजार ५०९ नोंदली गेली आहेत. महाराष्ट्रातील अन्य महानगरांपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. 

रस्त्यावरील गरीब मुलांमध्ये व्यसनाधिनतेत झपाट्याने वाढ

मुंबईतील रस्त्यावरील मुलांवर झालेल्या एका अभ्यासात, ८१ टक्के मुलांमध्ये व्यसनाचा वापर वाढला आहे. यापैकी ४८ टक्के मुले ही इन्हेलंट्स, 38 टक्के अल्कोहॉल, 26 टक्के सिडेटिव्ह किंवा स्टिम्युलेंट्स आणि १९ टक्के  गांजा/आपोइड्सचा व्यसन म्हणून वापर करत आहेत. यासाठी साथीजनांचा दबाव ६२ टक्के, प्रयोग करून पाहणे ३६ टक्के आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी २८ टक्के अशी प्रमुख कारणे आढळून आली आहेत.

अंमली पदार्थ व्यसनवाढीसाठी कारणीभूत प्रमुख घटक 

- सामाजिक ताण-तणाव

करिअरची चिंता, स्पर्धा परीक्षा, घरगुती दबाव,एकटेपणा,प्रेमसंबंधात आलेले अपयश हे सगळे तणाव किशोरांच्या मनावर मोठा ताण आणत असतात. 

- कुटुंबीय वातावरणात तूट

अपूर्ण कुटुंब, अनाकलनीय पालक, वेळ न देणारी घरं, यामुळे किशोरांना आधाराचा तुटेपणा भासत असतो. कारण सध्या पालक आणि मुले यांच्यातील स्नेहसंवाद हरवला आहे. तसेच शिक्षक आणि मुले यांच्यातील स्नेहसंवादसुद्धा हरवला आहे. बऱ्याचदा पालक त्यांच्या दिनक्रमात व्यस्त असतात.त्यामुळे मुले त्यांच्याशी बोलत नाहीत.अगदी छोटा मुलगा जरी असेल तर,आई बऱ्याचदा त्याच्या हातात मोबाईल देते. तो गेम सुरु करतो आणि एकटाच खेळत बसतो आणि नंतर त्याला मोबाईलचे व्यसन लागते. अनेकदा मोबाईल हातात दिल्याशिवाय मुले जेवत नाहीत किंवा झोपत नाहीत.अशी मुले हट्टी बनतात व येथूनच पुढे या व्यसनमार्गाची सुरुवात होते.यासाठीआई-वडिलांनी दिवसभरातून एक तास तरी मोबाईल बाजूला ठेऊन मुलांशी गप्पा मारणे आवश्यक आहे. तसेच शिक्षकांनीसुद्धा पठडीतले शिक्षणाच्या पलीकडे जाऊन मुलांचे छंद,खेळ, गाणी, गप्पागोष्टी याचा वापर करणे अतिशय आवश्यक आहे. जेव्हा मुले निराशेच्या खाईत जातात, तेव्हा त्यांना विश्वासाने बोलण्यासाठी पालक किंवा शिक्षक उपलब्ध नसतात. यातूनच मग ते एकटेपणा अनुभवतात. मित्रांच्या आणि मैत्रिणीच्या चुकीच्या सल्ल्यांना बळी पडतात.आणि परिणामी अंमली पदार्थांना जवळ करतात.

- शैक्षणिक आणि भविष्यातील दबाव

अभ्यासात अपयश, एंट्रन्सची तयारी, अपेक्षांचे ओझे यांच्या ताणातून मुलांमध्ये हिंसात्मक अंश निर्माण होत आहे.

- चुकीची संगत

साथीजनांचं प्रभाव, या प्रभावातून "आधी धूम्रपान करून पाहा", "थोडं ड्रिंक कर" अशा प्रेरणा यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ सेवनाचे व्यसन वाढत आहे. 

- कुटुंबधनाचा खर्च

काही किशोरवयीन मुलांना पालकांकडून सहज उपलब्ध पैसे उपलब्ध होत असतात.काही विद्यार्थी हे पैसे मद्यपदार्थ किंवा ड्रग खरेदीसाठी वापरतात.

- शिकवणीचा अभाव

व्यसनांविषयी शिक्षणाचा अभाव, "गुडर्स", "बटन", इंजेक्शनशी इतरांपेक्षा जोखीमची अनभिज्ञता ही अनेक मुलांमध्ये दिसून येते. ज्यांना स्वतःची तब्येत छान दिसावी असे वाटते, अशी मुले ही प्रामाणिकपणे व्यायाम करण्यापेक्षा वेगवेगळ्या पद्धतीच्या चुकीच्या इंजेक्शन्सचा वापर करतात. याचा साईड इफेक्ट होतो.

प्रतिबंधात्मक उपाययोजना 

- पालक, शिक्षक, समाजाने मिळून एकत्रित प्रयत्न

पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा. मुलांच्या मनातील प्रश्न आणि कुतुहल समजून घ्यावेत.शाळा, कॉलेजमध्ये वेळीच व्यसनावरील कार्यशाळा, समूह चर्चा, सल्ला केंद्र स्थापन करणे आवश्यक असून समाजाने व्यसनग्रस्त व्यक्तींसाठी जीवनशैली सुधार कार्यक्रम राबवावेत.

- शाळा-कॉलेजांमधील भूमिका

मुलांमध्ये जीवन कौशल्य, आवेग नियंत्रण याची अंमलबजावणी करणे. जेणेकरून त्यांना मार्गदर्शन, करिअर सल्ला, तणावशमन क्रियाकलापचे महत्त्व कळू शकेल. शिवाय शाळा-महाविद्यालयांनी व्यसनमुक्तपद्धती आणि सक्षमीकरणावर विशेष भर दिला पाहिजे.

- कायदेशीर आणि पोलिस संहितांचा समुचित वापर

सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे पारंपारिक अभ्यासक्रमामध्ये इयत्ता पाचवी,सहावी, सातवीपासूनच अंमली पदार्थ व त्याचे दुष्परिणाम आणि पुढे होणारे गंभीर परिणाम, याविषयी माहिती असलेल्या पाठांचा  (धड्यांचा) समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे.

- 'एनडीपीस'अंतर्गत कठोर नियम 

एननडीपीस'अंतर्गत कठोर नियम करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रिहाब व थेरपीकडे वाटचाल करणेही आवश्यक आहे. बेनामी विक्रेत्यांवर लक्ष देऊन पोलिस, प्रशासन आणि समाजाने मिळून जागरूक उपाय केले पाहिजेत. 

- गट-आधारित प्रबोधन आणि पुनर्वसन

अनेक स्वयंसेवी संस्था रस्त्यावर काम करत आहेत. अशा प्रकारच्या स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालये,पोलिस,प्रशासन लोकप्रतिनिधी,प्रसारमाध्यमे,युथ आयडॉल्स,सेलिब्रेटीज या सर्वांनी एकत्रित येऊन समन्वयाने एक कृती आराखडा तयार केला पाहिजे. यातूनच काही प्रमाणात आपण याच्यावर नियंत्रण आणू शकतो. कारण अंमली पदार्थांची व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.यातूनच अंमली पदार्थांमुळे गुन्हेगारी आणि गुन्हेगारीमुळे अंमली पदार्थ हे दोन्ही घटक परस्परपूरक झाले आहेत. 

दोन दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, आता एक नवीन आणि धोकादायक मार्ग हा अंमली पदार्थांच्या वितरणासाठी अवलंबला जात आहे. मला वाटते की, आपण सर्वांसाठी ती फार मोठी धोक्याची घंटा आहे.  पुण्यातील एका ठिकाणच्या वेश्यावस्तीमध्ये शरीर विक्री करणाऱ्या काही जणांकडे अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात सापडले. त्याचे वितरण या व्यवसायाच्या पांघरूणाखाली करत असल्याचे निष्पन्न झाले, अशी ती बातमी होती. अशा पद्धतीने जर अंमली पदार्थांचे  वितरण वाढले तर, त्याला नियंत्रण करणे आणि प्रतिबंध करणे ही अत्यंत अवघड आणि जोखमीची गोष्ट आहे. 

मला वाटते की, यासाठी आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अवलंब  करणे अत्यंत आवश्यक आहे. महाराजांनी बलाढ्य शत्रूला गनिमी काव्याने किंवा बुद्धी वापरून हरवले होते. शत्रुचा अत्यंत बारीक आणि सखोल अभ्यास केला आणि नंतर त्याच्यावर कशा पद्धतीने मात करता येईल, अशी व्यूहरचना आखली पाहिजे. कारण  अंमली पदार्थ हासुद्धा बलाढ्य शत्रू आहे. त्याच्याशी जर लढून त्याला आपल्याला पराभूत करायचे असेल तर, त्याचा पूर्ण अभ्यास आधी करणे आवश्यक आहे. त्याची निर्मिती त्याचे वितरण, कायदेशीर बाबींमधील त्रुटी, याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. याचा समूळ नायनाट करायचा असेल तर, केवळ वरवर मलमपट्टी करून चालणार नाही. त्यासाठी आधी त्याचे मूळ शोधून त्याच्यावर हल्ला करणे आवश्यक आहे. गेली तीस वर्षे मी या क्षेत्रात काम करत असून अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये आणि संस्थांमध्ये व्याख्याने दिली आहेत. याबाबतचे स्लाईड शो दाखवले आहेत.व्याख्यानानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना याविषयी असलेल्या शंका मोबाइलवरील संभाषणातून दूर करत असतो.  

मित्रांनो, मी  आता जे सांगतोय, त्याकडे खूप गंभीरपणे पहा. एखाद्या कॉलेजमध्ये जर माझ्या व्याख्यानाला १ हजार मुले-मुली असतील तर, माझे व्याख्यान संपल्यानंतर साधारणपणे 400 ते 500 जणांचे मेसेज मला आलेले असतात. ज्यांना या गोष्टींमधून बाहेर पडायचे आहे. व्यक्त होणाऱ्यांची संख्या एवढी आहे. जे व्यक्त होत नाही, त्यांचे काय. यासाठी मला वाटते की, प्रसारमाध्यमे, लोकप्रतिनिधी, शैक्षणिक व सामाजिक संस्था या सर्वांनी प्राधान्याने याकडे पाहण्याची गरज आहे. नुकतीच याबद्दल मला एक सकारात्मक गोष्ट कळाली, ती म्हणजे केंद्र सरकारच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कृती दल स्थापन केलेले आहे. त्याची सुरुवात आता होत आहे. यासाठी वेगळी पोलिस यंत्रणा, इन्फ्रास्ट्रक्चर, आर्थिक निधी याचीसुद्धा तरतूद करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र सरकारने यंदा नव्याने युवा धोरण ठरवण्यासाठी तज्ज्ञ मंडळींची एक समिती स्थापन केली आहे. या समितीत माझाही समावेश आहे. भावनिक,मानसिक, शारीरीक सुदृढता असलेला युवक तयार व्हावा व  त्याचा वापर राज्याच्या आणि देशाच्या उभारणीमध्ये मध्ये व्हावा, हा विचार ठेवून आम्ही सर्वजण यात आता काम करत आहोत. ही एक चांगली सुरुवात आपण समजू शकतो. केवळ प्रशासकीय व पोलिस यंत्रणेवर अवलंबून न राहता, आपण सर्वांनी मिळून एकत्रित जर या शत्रूचा सामना केला तर, आपली बरबाद होणारी तरुण पिढी काही प्रमाणात आपण वाचू शकू, असे मला प्रामाणिकपणे वाटते. 

देशातील युवकांचे अशास्थान डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी व्हिजन इंडिया ट्वेंटी-ट्वेंटी हे स्वप्न आपल्याला दाखवले होते. सन 2020 मध्ये भारत हा जगाचे नेतृत्व करेल, असे त्यांचे व्हिजन होते.कारण 2020 मध्ये सर्वात जास्त तरुण मुलांची संख्या ही भारतात असणार होती. तरुणांच्या विधायक शक्तीवर त्यांचा खूप विश्वास होता. त्यांच्या या प्रकल्पात मला त्यांच्यासोबत सहा वर्षे काम करण्याचे भाग्य लाभले आहे. त्यांच्यानंतर सुद्धा त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारा मी एक छोटा कार्यकर्ता आहे.या अंमली पदार्थविरोधी वारीमध्ये या पालखीचा "भोई "होण्याचा मी एक प्रयत्न करत आहे. आपण यात वारकरी म्हणून सहभागी व्हा.पांडुरंगाचा आशीर्वाद नक्की आपल्याला मिळेल,असा मला विश्वास आहे.