सासवडमध्ये आषाढी वारीतील २५०० वारकऱ्यांची आरोग्य तपासणी !
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचा उपक्रम : वारकऱ्यांना फराळ वाटप व औषधोपचार सेवा

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २३ जून २०२५ :- आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या सुमारे अडीच हजार वारकऱ्यांची सासवड येथे वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. या तपासणीनंतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.
विठ्ठलनामाचा जयघोष करत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. यानुसार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दोन दिवस सासवड येथे मुक्कामी होता. या पार्श्वभूमीवर वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्यावतीने संत साहित्याचे अभ्यासक वैकुंठवासी सदानंद महाराज आळंदीकर गुरुजी यांच्या स्मरणार्थ वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले.
साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, याउक्ती प्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून अखंडितपणे दरवर्षी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांना जवळपास एक लाख रुपयांची औषधे व पन्नास हजार रुपयांच्या फराळ साहित्याचे वाटप करण्यात आल्याचे जालिंदर कामठे यांनी सांगितले.वारी हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकात्मतेचे प्रतिक आहे. वारकऱ्यांची सेवा हाच आमचा खरा धर्म मानून हा उपक्रम गेली अनेक वर्षे हाती घेतला आहे. या सेवेमुळे अनेक वारकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे कामठे यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी मार्केट कमिटीचे माजी संचालक भानुदास जगताप, माजी सरपंच सचिन पठारे, शिवाजी साळुंके, नवनाथ बोरावके, बंडू पवार आदी उपस्थित होते. या आरोग्य तपासणी शिबिरासाठी डॉ.मनोज अहिरे डॉ.चंद्रशेखर अहिरे डॉ.नीरज नागर, डॉ.गोपाल झंवर, डॉ.संकेत लोलगे आदींचे सहकार्य लाभले