Pune Zp teachers transfer programme :- जिल्हांतर्गत बदली टाळण्यासाठी काय पण : पुणे झेडपीचे गुरुजी बनले मुके, बहिरे, आंधळे, लुळे अन् खुळे! 

बदली टाळण्यासाठी केला बनाव : पुणे जिल्ह्यातील तब्बल ४०९ गुरूजींनी मिळविली दिव्यांगत्वाची बोगस प्रमाणपत्रे

Pune Zp teachers transfer programme :- जिल्हांतर्गत बदली टाळण्यासाठी काय पण : पुणे झेडपीचे गुरुजी बनले मुके, बहिरे, आंधळे, लुळे अन् खुळे! 
पुणे:- दिव्यांग शिक्षकांचे ए. आय. ने तयार केलेले काल्पनिक छायाचित्र

डॉ.गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २० जून २०२५ :-  आपल्याला हवं ते मिळविण्यासाठी माणूस कोणत्याही स्तराला जात असतो. त्यातूनच स्वार्थासाठी काही पण, अशी एक म्हण मराठी भाषेत रूढ झाली आहे. या म्हणीचे तंतोतंत पालन पुणे जिल्हा परिषदेतील काही शिक्षकांनी केले आहे आणि बदलीसाठी काय पण अशी जणू नव्या म्हणीचीच भर या शिक्षकांनी त्यांच्या कृतीतून घातली आहे. याचे एकमेव कारण म्हणजे बदली टाळणे हे आहे. तब्बल ४०९ शिक्षकांनी चक्क दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. यासाठी पुणे झेडपीतील हे ४०९ गुरूजी ( काहींचा अपवाद वगळता) चक्क मुके, बहिरे, आंधळे, लुळे अन् खुळे बनले आहेत. यापैकी अनेकांनी दिव्यागत्वाचे बोगस प्रमाणपत्रे सादर केले असल्याची कुजबुज धडधाकट असलेल्या शिक्षकांनीच सुरू केली आहे.

राज्याच्या ग्रामविकास विभागाने दि. १८ जून २०२४ रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित बदली धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी विविध संवर्ग निर्माण केले आहेत. यापैकी विशेष संवर्ग भाग एक हा बदलीतून सुट मिळण्यासाठी पात्र ठरणाऱ्या शिक्षकांचा आहे. या संवर्गात दिव्यांग आणि विविध प्रकारच्या दुर्धर आजारांनी बाधीत शिक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे या संवर्गात बसण्याची बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळविले असल्याचा आरोप धडधाकट शिक्षकांनी केला आहे.

जिल्हांतर्गत बदली प्रक्रीयेमधून वगळण्यात येणऱ्या शिक्षकांमध्ये प्रामुख्याने पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणारे शिक्षक, बदली प्रक्रीया सुरु असताना निलंबित किंवा सेवेतून कार्यमुक्त केलेले शिक्षकांसह विशेष संवर्ग भाग-१ मधील कोणत्याही एका गटात मोडत असलेल्या शिक्षकांचा समावेश आहे. यानुसार विशेष संवर्ग भाग १ मध्ये पक्षाघाताने आजारी,दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. १४ जानेवारी २०११ रोजीच्या अध्यादेशानुसार सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक असलेले शिक्षक, ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक, एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले किंवा मुत्रपिंड रोपण केलेले व डायलीसीसवर असलेले शिक्षक,यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक, कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक, मेंदुचा आजार झालेले शिक्षक,थॅलेसेमिया किंवा कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक, जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार असलेल्या मुलांचे पालक असलेले शिक्षक, ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांचेवर उपचार सुरू आहेत असे शिक्षक, माजी सैनिक आणि आजी किंवा माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी, विधवा व कुमारिका शिक्षक,  परित्यक्ता व घटस्फोटीत महिला शिक्षक व वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक आदी प्रमुख गटातील शिक्षकांचा समावेश आहे.

बोगस दिवंगत्वाची काही प्रातिनिधिक उदाहरणे 

उदाहरण क्रमांक १ 

अंगाला वीज चाटून गेली, अन् दिव्यांग झाले. 

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत असलेल्या एका शिक्षकांच्या अंगाला वीज केवळ चाटून गेली आहे. हा प्रकार सुमारे दोन वर्षांपूर्वी घडला आहे. वीज चाटून गेल्याचा कसलाही परिणाम संबंधित शिक्षकांच्या शरीरावर झाल्याचे दिसत नाही. मात्र या गुरूजींनी चक्क ससून रुग्णालयातून दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळविले आहे. 

उदाहरण क्रमांक २ 

पाल्य मतिमंद, पण हे मतिमंद पाल्य आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत 

ज्या शिक्षकांचे पाल्य, अंध, मुकबधीर किंवा मतिमंद असेल, अशा पाल्यांचा सांभाळ करता यावा, या हेतूने सरकार अशा पाल्याचे आई किंवा वडील असलेल्या शिक्षकाला बदलीत सूट देते. याचाच फायदा उठविण्यासाठी एका शिक्षकाने त्यांचे पाल्य मतिमंद असल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. पण हेच मतिमंद असलेले पाल्य प्रत्यक्षात मात्र इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकले आहे. 

उदाहरण क्रमांक ३

घटस्फोट झाला, पण राहतात एकत्रच!

घटस्फोटीत शिक्षिकेला बदलीतून सूट मिळत असते. त्यामुळे जिल्ह्यातील काही शिक्षिकांनी चक्क पतीकडून केवळ कागदोपत्री घटस्फोट घेतला आहे. संबंधित शिक्षिकांनी घटस्फोटीत असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. प्रत्यक्षात मात्र या सर्व घटस्फोटीत शिक्षिका पुर्वीप्रमाणे घटस्फोटीत पतीबरोबरच राहत आहेत. पण त्यांचे हे एकत्र राहणे पुर्वी जसे होते, तसेच कायम आहे. यावरून या घटस्फोटाचा केवळ बदली टाळण्यासाठी जाणीवपूर्वक बनाव केला असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात केली जाऊ लागली आहे.