Darbar Band founder Iqbal Darbar passes away :- 'ऑर्केस्ट्रा' या कलेला समाजात अढळ स्थान मिळवून देणारे सॅक्सोफोन वादक इक्बाल दरबार यांचे निधन 

पुण्यातील प्रसिद्ध 'दरबार बॅंड'चे संस्थापक काळाच्या पडद्याआड : सुर्ख अब्दाल कब्रस्तानात अंत्यसंस्कार होणार 

Darbar Band founder Iqbal Darbar passes away :- 'ऑर्केस्ट्रा' या कलेला समाजात अढळ स्थान मिळवून देणारे सॅक्सोफोन वादक इक्बाल दरबार यांचे निधन 
पुणे:- पुण्यातील प्रसिद्ध दरबार बॅंडचे संस्थापक इक्बाल दरबार.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २८ जून २०२५ :- महाराष्ट्रातील 'ऑर्केस्ट्रा' या पारंपरिक कलेला समाजात अढळ स्थान मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असलेले जुन्या पिढीतील प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक आणि पुण्यातील प्रसिद्ध 'दरबार बँड' चे संस्थापक-संचालक इकबाल दरबार यांचे शनिवारी (दि.२८ जून) पहाटे निधन झाले.   ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे तीन मुलगे,एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी दोन वाजता पुण्यातील रविवार पेठ येथील सुर्ख अब्दाल कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

ऑर्केस्ट्रा ही संकल्पना महाराष्ट्रात रुजवणाऱ्या काही मोजक्या कलावंतांमध्ये दरबार यांचा समावेश होतो. त्यांच्या वादनाचे चाहते केवळ पुणे-मुंबईपुरते मर्यादित नव्हते तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही त्यांच्या वादनाने भारावून जात असत. पुणे महानगरपालिकेत आयोजित एका कार्यक्रमात दिलीपकुमार यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यावेळी 'मधुबन में राधिका नाचे रे' हे गीत  इकबाल दरबार यांनी सॅक्सोफोनवर सादर केले.होते. त्या सादरीकरणाने दिलीपकुमार हे भारावून गेले आणि त्यांनी उभे राहून त्यांना मानवंदना देत 'वन्स मोअर' ची मागणी केली होती. 

दरम्यान, इकबाल दरबार यांचे कार्य केवळ संगीतपुरते मर्यादित नव्हते. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सेवाभाव ही त्यांच्या कार्यशैलीची खास वैशिष्ट्ये होती. दरवर्षी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीची सुरुवात त्यांच्या दरबार बँडद्वारे सादर केलेल्या आरतीनेच होत असे. हे केवळ परंपरेचे नव्हे, तर समाजाशी असलेल्या त्यांच्या नात्याचे प्रतिक होते.त्यांनी सीमेवर जाऊन आपल्या वादनाने भारतीय जवानांचे मनोरंजन केले आणि त्या कार्यक्रमातून मिळालेला निधी कृतज्ञता निधी म्हणून सैन्याला दिला होता . 

भोई फाउंडेशनच्या' 'पुण्याजागर' उपक्रमासाठीही त्यांनी कृतज्ञता निधी दिला होता. त्यांनी स्थापन केलेल्या 'मोहम्मद रफी आर्ट फाउंडेशन'च्या माध्यमातून गरजू कलाकारांना वैद्यकीय आणि आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी ते काम करत होते. बँडमधील कलाकार व्यसनमुक्त व्हावेत, यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांना योग्य वैद्यकीय मदत मिळावी, यासाठीही ते अहोरात्र  प्रयत्न करत असत. 'भोई प्रतिष्ठान' या सामाजिक संस्थेत ते समन्वयक म्हणून कार्यरत होते.

त्यांच्या निधनाबद्दल जगप्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, संगीतकार कल्याणजी आनंदजी व पंडित सुरेश वाडकर आदींनी सांत्वनपर भावना व्यक्त केल्या आहेत. इक्बाल दरबार त्यांची तीनही मुले संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे जेष्ठ चिरंजीव 
जाहीर दरबार हे संगीतकार आणि कीबोर्ड प्लेयर असून, आवेज आणि जमीर हे गायक आहेत.