वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत गरजू विद्यार्थ्यांना १ लाखांची शिष्यवृत्ती अन् शालेय साहित्याचे वाटप!
पुणे झेडपीचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचा समाजासमोर नवा आदर्श

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २० जून २०२५ :- वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत गरजू विद्यार्थ्यांना एक लाख रूपयांची शिष्यवृत्ती आणि शालेय साहित्याचे वाटप करण्याचा अनोखा उपक्रम पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने राबविला आहे. या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून जालिंदर कामठे यांनी समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे.
राजकीय नेते, गाव पुढारी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याचा नवा पायंडा पडला आहे. यामुळे नेते किंवा अधिकाऱ्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावर अनावश्यक लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. पण या खर्चाला टाळून साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय कामठे यांनी घेतला व त्यांनी हा निर्णय प्रत्यक्षात अमलात आणला असून त्यांनी हा अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात दिला आहे.
वाढदिवसाच्या दिवशी जल्लोष करण्याऐवजी समाजातील गरजवंतांच्या मदतीसाठी पुढाकार घेत एक सामाजिक भान जपणारा उपक्रम कामठे यांनी राबविला. वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे आणि पार्टी करणे नव्हे, तर तो दिवस समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा एक सुंदर निमित्त ठरू शकतो, या विचारातून त्यांनी पारंपरिक उत्सवातील खर्च टाळत हाच निधी गोरगरीब व गरजू लोकांच्या सेवेसाठी वापरला.यानुसार त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती वाटप केली. तसेच गरजू विद्यार्थ्यां शालेय साहित्याचे वाटप केले.
आपण समाजाचे काही देणे लागतो. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी जर आपण एखाद्या गरजूला मदत केली तर, त्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतात. त्यामुळे यासारखा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकतो? उर्वरित आयुष्यात समाजोपयोगी कामे करणार आहे. समाजातील वंचित व दुर्बल घटकातील नागरिकांकरीता प्रामाणिकपणे काम करणार आहे. चांगल्या कार्यकर्त्यांकरिता काम करत राहणार असून मग तो कुठल्याही घटकातील असो, त्यांना मदत करणार. स्वतःसाठी खर्च न करता कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणता आलं, हीच खरी वाढदिवसाची भेट आहे , अशा शब्दांत कामठे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या उपक्रमात कामठे यांचे कुटुंबीय,मित्रमंडळी आणि कोंढवा बुद्रुक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. विशेष म्हणजे, या दिवशी कोणतीही सजावट, केक किंवा फुगे न वापरता साधेपणाने व सामाजिक बांधिलकीने जालिंदर कामठे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अॅड. मधुकर धांडेकर, शिवाजी मरळ शिरीष धर्मावत, बजरंग वाघ, सुखदेव लोणकर, भरत धर्मावत, गणेश कामठे, शामकांत कामठे, उमेश कामठे, रोहन कामठे, अमित कामठे, चिंतामण जगताप, अनिल कामठे, राहुल कामठे, बाळासाहेब ठोसर, माऊली कामठे, अमित जगताप, बाळासाहेब मासळ, दत्तात्रय ठोसर, किशोर काळभोर, स्वप्नील कामठे आदी उपस्थित होते.