Book publish ceremony :- शिक्षकांनो, विद्यार्थ्यांना लाल शेरे देऊ नका, त्याऐवजी गोष्टीची पुस्तके भेट द्या!

डॉ.अरविंद गुप्ता यांचे शिक्षकांना आवाहन : प्रा. डॉ. नवनाथ तुपे यांच्या  'वाचन दिशा आणि दृष्टिकोन' या पुस्तकाचे प्रकाशन  

Book publish ceremony :- शिक्षकांनो, विद्यार्थ्यांना लाल शेरे देऊ नका, त्याऐवजी गोष्टीची पुस्तके भेट द्या!
पुणे:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रा.डॉ. नवनाथ तुपे यांच्या 'वाचन दिशा आणि दृष्टीकोन ' या पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. अरविंद गुप्ता व अन्य मान्यवर.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १८ जून २०२५ :-  गृहपाठ पूर्ण करताना विद्यार्थ्याची चूक झाली की, त्याला या चुकीची शिक्षा म्हणून शिक्षक त्यावर लाल शेरे मारतात. शिक्षकांच्या या कृतीने विद्यार्थी नाउमेद होतात. हे टाळण्यासाठी मुळात शिक्षकांनी लाल शेरे देणे टाळले पाहिजे. त्याऐवजी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम शिक्षकांनी करणे गरजेचे आहे. हे प्रोत्साहन लाल शेऱ्यांमधून नव्हे तर त्यांना गोष्टीची पुस्तके भेट देऊन करा, असे आवाहन डॉ. अरविंद गुप्ता यांनी  शिक्षकांना केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रा. डॉ. नवनाथ तुपे यांनी लिहिलेल्या  'वाचन दिशा आणि दृष्टिकोन' या पुस्तकाचे प्रकाशन गुप्ता यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला शिक्षणतज्ज्ञ अ. ल. देशमुख, लोकसेवा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार दीपक पायगुडे, आत्मवल्लभ शिक्षण संस्थेचे कुमार रमेश पारवाल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष आणि रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. सतीश परदेशी, युनिक फाउंडेशनचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक घोटाळे, प्रा. संजय ढोले, प्रा. राजेश गच्चे, प्रा. विकास मठे, प्रा. तेज निवळीकर, प्रा. एस आय. पाटील, प्रा. विलास आढाव आदी उपस्थित होते. 

डॉ. गुप्ता पुढे म्हणाले, "चांगल्या शिक्षकांचे काम अत्यंत कठीण आहे. जे चांगले शिकवतात.ते लोकमनात टिकून राहतात आणि वाईट शिक्षक मात्र लवकरच खतम होतात. हे टाळण्यासाठी सर्वच शिक्षकांचे काम चांगले होण्यासाठी सर्वच शिक्षकांनी गृहपाठाच्या वहीवरील लाल शेरे देणे टाळले पाहिजे."

वाचन दिशा आणि दृष्टिकोन या पुस्तकावर बोलतांना हेरंब कुलकर्णी म्हणाले, "विद्यार्थी गरिबीमुळे शाळा सोडतात हे सत्य नसून विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागत नाही. गोडी नसल्याने त्यांना लिहिता वाचता येत नाहीआणि  म्हणून विद्यार्थी शाळा सोडतात. विद्यार्थ्यांना वाचन शिकविण्यासाठी हा ग्रंथ निश्चित दिशा आणि दृष्टिकोन देतो. या पुस्तकाचे लेखक लिहितात की, मुलांनी वाचतांना आशयालाच प्रश्नात रुपांतरित केले पाहिजे. म्हणजेच जे जे आपण शिकतो त्यावर प्रश्न पडले पाहिजेत."

अध्यक्षीय समारोप करतांना मराठी संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे म्हणाले, "या पुस्तकाच्या अनुषंगाने अनेक प्रश्न येथे उपस्थित होतात. त्यातील काही प्रश्नाची उत्तरे या पुस्तकात दिली आहेत व काही प्रश्नावर संशोधन होणे गरजेचे आहे. वाचनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पुस्तके कशी असली पाहिजे? या प्रश्नाला उत्तर देताना, ते म्हणाले की, वाचनासाठी पुस्तके सचित्र आणि अद्भुत असावी. कारण मानसशास्त्राने असा निष्कर्ष काढला की, अद्भुतरसात्मक पुस्तकाच्याअभावी किंवा अद्भुतरस सेवनाअभावी अविकसित व्यक्तिमत्व तयार होते. ही शुष्क, सामान्य बुद्धीची, वाचन, कला, संस्कृती बद्दल तुच्छता दर्शविणारी माणसे मग समाजात दिसून येतात."

कार्यक्रमाच्या सुरुवातीला युनिक फाउंडेशनच्या मुक्ता कुलकर्णी यांनी प्रकाशन संस्थेची भूमिका मांडली. वाचन दिशा आणि दृष्टिकोन या ग्रंथाचे लेखक प्रा.डॉ. नवनाथ तुपे यांनी त्यांच्या या पुस्तक निर्मितीमागची संकल्पना सांगितली. या कार्यक्रमासाठी विविध शाळांचे शिक्षक, विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केदार यांनी केले. डॉ. तुपे यांनी आभार मानले.