महाराष्ट्रातील ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम हव्यात ना, तर मग कॅशलेस व डिजिटल पद्धतीने कर वसुली करा! 

संगणक अभियांत्रिकी शाखेतील गौरव ठाकरे व त्याच्या मित्रांचे संशोधन : इंटरनॅशनल जर्नलमध्ये शोधनिबंध प्रकाशित

महाराष्ट्रातील ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम हव्यात ना, तर मग कॅशलेस व डिजिटल पद्धतीने कर वसुली करा! 
पुणे :- संशोधक विद्यार्थी गौरव विवेक ठाकरे . दुसऱ्या छायाचित्रात सर्व संशोधक विद्यार्थी.

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १९ एप्रिल २०२५ :-   गावातील ग्रामस्थांकडून घरपट्टी आणि वसुली करणे म्हणजे ग्रामपंचायतींसाठी मोठे जिकिरीचे काम. कारण शहरातील नागरिकांप्रमाणे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना कर भरण्याचे महत्त्व माहित नसते. त्यामुळे गावातील करवसुली करताना ग्रामसेवकांच्या अगदी नाकीनऊ येतात. त्यातही हा कर रोख रक्कमेच्या स्वरूपात घेतला जात असल्याचा फटका हा ग्रामपंचायती आर्थिकदृष्या सक्षम होण्यासाठी बसू लागला आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायती आर्थिकदृष्या सक्षम करायच्या असतील तर,  कर वसुलीसाठी कॅशलेस आणि डिजिटल पद्धतीचा अवलंब करणे हा एक चांगला मार्ग असल्याचा उपाय पुण्यातील संगणक अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी गौरव विवेक ठाकरे आणि त्याच्या मित्रांनी शोधला आहे. 

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर वसुलीबाबत सखोल अभ्यास करून हा निष्कर्ष या विद्यार्थ्यांनी काढला आहे. हा शोधनिबंध 'इंटरनॅशनल रिसर्च जर्नल ऑफ इनोव्हेशन्स इन इंजिनिरिंग अँड टेक्नॉलॉजी' या इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. 
ग्रामपंचायत करपट्टी वसुलीमध्ये सुसूत्रता आणता यावी, गैरव्यवहार टाळता यावेत आणि  त्यातूनच ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या कशा सक्षम होतील, याचा सखोल अभ्यास या शोधनिबंधात करण्यात आला आहे.

मुळचा जळगाव जिल्ह्यातील निंभोरा (ता. रावेर) येथील रहिवासी असलेला गौरव विवेक ठाकरे हा पुणे येथील अजिंक्य डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये संगणक अभियांत्रिकी शाखेचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने गौरव व त्याच्या सहअध्यायींनी हा एक नाविन्यपूर्ण शोध प्रबंध सादर केला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांशिवाय कर वसुलीतून मिळणारे उत्पन्न हे ग्रामपंचायतींसाठी हक्काचे आणि गावपातळीवरील  विकासकामांना चालना देणारे एक मोठा आर्थिक स्रोत असणारे माध्यम आहे. मात्र राज्यातील ग्रामपंचायतींपुढे कर  वसुलीचे मोठे आव्हान आहे. गावांची कर वसुली अद्याप डिजिटल न झाल्याने दरवर्षी करपट्टीच्या थकबाकीचा आकडा हा डोंगरासारखा वाढतच आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या उद्देशाने हे संशोधन करण्यात आले आहे. गौरव ठाकरे व त्याच्या कॉलेजमधील सहकारी वेदांत वाघुंदे, श्रेयस चिकणे, सायली शिलवंत, तन्मय पाडळे या सहकारी मित्रांनी प्रा. नीता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेटी देऊन हा अभ्यास केला आहे. कॉलेजमार्फत हा प्रबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या 'आयआरजेआयईटी' या जर्नलने प्रकाशित केला आहे. 

पुणे येथे संगणक अभियांत्रिकी शाखेचा अभ्यास करतानासुद्धा ग्रामीण भागासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा, ही तळमळ मनात ठेवत ग्रामपंचायत कर वसुलीसाठी नावीन्यपूर्ण संशोधन केल्याबद्दल  गौरव ठाकरे व त्याच्या सहकारी मित्रांचे कौतुक केले जात आहे.

माझे वडील विवेक ठाकरे हे जळगाव जिल्ह्यातील निंभोरा या आमच्या गावाचे माजी उपसरपंच व अखिल भारतीय सरपंच परिषदेचे राज्य सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीवरून मी माझ्या सहकारी मित्रांशी चर्चा करून ग्रामपंचायत कर वसुलीमध्ये सुसूत्रता यावी व ठोक वसुली व्हावी, यासाठी काम करण्याचे ठरवले. एकट्या आमच्या गावच्या ग्रामपंचायतची कराची सुमारे 2 कोटी रुपयांची थकबाकी आहे. गावाच्या घरपट्टी, पाणीपट्टी मालमत्ताकर व इतर सुविधांपोटी ग्रामपंचायतींना करवसुलीतून स्वनिधी म्हणून एक मोठे उत्पन्न मिळत असते. पण राज्यातील सर्व ग्रामपंचायतींची कराची   थकबाकी ही कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्य:स्थितीत  ग्रामपंचायतींची मिळून सुमारे तीन हजार कोटींहून अधिक थकबाकी आहे.  ग्रामविकासाला गती देणारी ही खूप मोठी रक्कम आहे. महापालिका यांची कराची रक्कम, दरमहा विजेचा वापर आणि मोबाईल रिचार्ज आदी भरणा जसा डिजिटल पद्धतीने होतो, तसा आजही ग्रामपंचायतीच्या कर वसुलीचा भरणा डिजिटलरित्या करता येत नाही. मनुष्यबळाच्या आधारे वसुली ही सध्या अत्यंत किचकट बाब आहे.शिवाय त्यात गैरव्यवहाराला वाव असल्याने, आम्ही  आमच्या या शोध प्रबंधाचे राज्याच्या ग्रामविकास विभागाकडे सादरीकरण करणार आहोत. सरकारने आमची अभ्यास प्रणाली लागू केल्यास ग्रामपंचायती आर्थिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

- गौरव विवेक ठाकरे
अभ्यासक, ग्रामपंचायत कर वसुली शोध प्रबंध