पुणे झेडपीतील उमाकांत सुर्यवंशी यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार, 'ग्रामविकास'चे पुरस्कार जाहीर!
एक भूकंपग्रस्त विद्यार्थी ते गुणवंत कर्मचारी असा झाला उमाकांत सुर्यवंशी यांचा प्रवास

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १७ एप्रिल २०२५ :- दि. ३० सप्टेंबर १९९३ ची अनंत चतुर्दशी, गणेश विसर्जन मिरवणूक अगदी रंगात आलेली. वेळ पहाटे ४.३५ ची. अशातच अचानक धरणीमाता एखाद्या झोक्याप्रमाणे जोरजोरात हलू लागली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. अनेक घरे भुईसपाट झाली. अनेकांचे आधार हिरावले गेले. अनेकांसाठी ही काळरात्र ठरली. हे काही एखाद्या चित्रपटातील कथानक नसून सन १९९३ मध्ये झालेल्या मराठवाड्यातील किल्लारी (जि. लातूर ) येथे झालेल्या भुकंपाची करुण कहाणी आहे. याच कहाणीतील एक पात्र असलेले पुणे जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यक उमाकांत सुर्यवंशी यांना राज्याच्या ग्रामविकास विभागाने पुणे विभागाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराने उमाकांत सुर्यवंशी यांचा एक भुकंपग्रस्त बेघर विद्यार्थी ते गुणवंत कर्मचारी असा थक्क करणारा प्रवास झाला आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील ३५ जणांना सन २०२२-२३ या वर्षाचा गुणवंत अधिकारी किंवा कर्मचारी पुरस्कार जाहीर केला आहे. यामध्ये पुणे विभागातील पाच कर्मचाऱ्यांचा आहे. पुणे विभागातील या पाच कर्मचाऱ्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील उमाकांत सुर्यवंशी हे एकमेव कर्मचारी आहेत. सुर्यवंशी हे सध्या हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत. सुर्यवंशी यांची पुणे जिल्हा परिषदेत सन २००६ मध्ये परिचर (शिपाई) या पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर ते पदोन्नतीने कनिष्ठ सहाय्यक पदावर पोहोचले आहेत.
सन १९९३ च्या किल्लारी भुकंपामुळे बेघर झालेल्या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पुणे येथे सोय करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतला. यानुसार पवार यांनी या मुलांच्या शिक्षणासाठी खास संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आणि या संकुलाच्या उभारण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत मुळचे मराठवाड्यातील असलेले पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक शांतीलाल मुथ्था पुढे आले. या शैक्षणिक संकुलासाठी सरकारी जमीन उपलब्ध करून देण्यात आली. यातूनच वाघोली येथील भारतीय जैन संघटनेचे शैक्षणिक संकुल उभा राहिले.
भुकंपामुळे बेघर झालेल्या लातूर व धाराशिव जिल्ह्यातील १ हजार ४०० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या संकुलात आणण्यात आले. या १४०० विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी हे उमाकांत सुर्यवंशी हे आहेत. सुर्यवंशी हे मूळचे मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील हराळी (ता. लोहारा) येथील रहिवासी आहेत.