कल्पना करा, जर हेल्मेट नसते तर, काय झाले असते? : म्हणूनच दुचाकीस्वारांनो हेल्मेटविना दुचाकी प्रवास टाळा?
.... आणि जीवघेण्या अपघातातून वाचण्यासाठी हेल्मेट आले मदतीला धाऊन!

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २५ मार्च २०२५ :- गेल्या काही वर्षांपासून नागरिकांवर एखाद्या कायद्याचे बंधन घालणे किंवा संबंधित कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे म्हणजे सक्ती, व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा, जणू अशा आपल्या भावनाच झालेल्या आहेत, हे वास्तव आहे. यापैकीच एक म्हणजे पुणे शहरातील हेल्मेट सक्ती होय. पण मला नुकताच आलेला एक अनुभव पाहता ही सक्ती सरकारच्या नव्हे तर, तुम्हा-आम्हासारख्या सर्वच सर्वसामान्यांना कशी जीवदान देणारी आहे, हे मी प्रत्यक्षात अनुभवले आहे . माझा हा अनुभव सर्वच दुचाकीस्वारांना हेल्मेटचे महत्त्व समजण्यासाठी उपयुक्त ठरेल, याच भावनेने हा अनुभव आपणा सर्वांसाठी शेअर करत आहे. या अनुभवामुळे हेल्मेट सक्ती हे एक अपघातातून जीवदान देणारं महत्त्वाचे शस्त्र आहे, या निष्कर्षाप्रत मी पोहोचलो आहे.
नुकत्याच झालेल्या एका जीवघेण्या अपघातातून माझे प्राण हे केवळ हेल्मेटमुळेच वाचू शकले आहेत. मला काहीच होणार नाही, हेल्मेट घातले नाही तर, काय होणार आणि नाही तरी आपण सर्व जण कधी ना कधी जाणारच आहोत ना, असा अति आत्मविश्वास असणाऱ्यांना आपल्या जाण्यामुळे त्यांचे स्वतःचे व्यक्तीगत काहीच नुकसान होत नाही, असेच वाटते. पण मित्रांनो, आपले जाणे हे व्यक्तीगत आपल्यासाठी महत्वाचे नसले तरी, एखाद्या अपघातातून अचानक जाण्यामुळे आपल्या मुलां-बाळांची, कुटुंबाची होणारी संभाव्य वाताहत या गोष्टीही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. यासाठी हेल्मेट वापरणे व्यक्तीगत आपल्यासाठी महत्वाचे वाटत नसले तरी, ते मुला-बाळांच्या, कुटुंबांच्या भल्यासाठी वापरणे तेवढेच गरजेचे आहे, असं माझं मत बनले आहे. ते कसे, हे जाणून घेण्यासाठी आता आपण मूळ मुद्द्याकडे वळू यात.
नुकत्याच झालेल्या एका जीवघेण्या अपघातातून मी केवळ हेल्मेटमुळे वाचू शकलो. त्यामुळे हेल्मेटला दुसणे देणाऱ्यांसाठी हेल्मेट किती महत्त्वाचे आहे आणि हेल्मेटचा वापर हा तोट्याचा नसून तो आपल्याच फायद्याचा कसा आहे, याची जाणीव व्हावी, या उद्देशाने हा स्वअनुभव आपणा सर्वांसमोर मांडत आहे. हा अनुभव आपणासही फायद्याचा ठरेल, अशी आशा बाळगतो.
पुणेकर मित्रांनो, नुकतीच दहावीची वार्षिक परीक्षा संपली, हे आपण जाणून आहातच. दहावी म्हटलं की, विद्यार्थ्यांच्या करिअरसाठीचा पहिला महत्त्वाचा टर्निंग पॉईंट, अशी सर्वच पालकांची भावना. या भावनेला व्यक्ती म्हणून मी तरी कसा अपवाद असणार. यंदा माझा छोटा मुलगा संकेत दहावीला. त्यातही त्याची वार्षिक परीक्षा सुरू. अन्य पालकांप्रमाणे मीही माझ्या मुलाच्या दहावीची परीक्षेसाठी आवश्यक असलेली सर्व खबरदारी घेत घेतो. यासाठी मी कधी नव्हे तर, यंदा पहिल्यांदाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाही दांडी मारली. हे सर्व मी मुलाच्या करिअरसाठी करत होतो. पण एकीकडे हे करत असतानाच, दहावीच्या परीक्षेच्या शेवटच्या पेपरच्या आदल्या रात्रीच माझा अनपेक्षित जीवघेणा अपघात झाला आणि या अपघातातून हेल्मेटने मला सहीसलामत वाचवले. म्हणतात ना, अपघात काही सांगून होत नाही. अपघाताविषयीची आपली काही चूक आपण कितीही टाळायचा प्रयत्न केला, त्यासाठी आपण कितीही काळजी घेतली तरी, सम़ोरून येणारा आणि अपघातासाठी जबाबदार ठरणारा व्यक्ती हा आपण घेत असलेली खबरदारी घेईलच, असे नाही. माझाही अपघात नेमका असाच झाला.
त्याचं झालं असं, माझ्या मुलाचा दहावीचा शेवटचा पेपर १७ मार्चला होता. एकच पेपर शिल्लक राहिला, या आनंदात मी होतो. मुलाची परीक्षा असल्याने, या कालावधीत घराबाहेर पडणंही टाळलं. पण आता एकच पेपर राहिला आहे. त्यामुळे चला आता बाहेर पडू यात, असं मनोमन ठरवलं. त्यानुसार माझे जवळचे मित्र व पुण्यातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक असलेल्या एका मुलाच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी रविवारी (दि. १६ मार्च) रात्री ८ वाजता घराबाहेर पडलो. या कार्यक्रमात सर्वांच्या भेटी-गाठी घेत आणि सर्वांची गप्पा-गोष्टी करत रात्री ९.५० वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणाहून घराकडे परत निघालो. एवढं सगळं होईपर्यंत त्याच दिवशी अगदी थोड्याच वेळात माझा जीवघेणा अपघात होणार आहे, याची पुसटशी कल्पनाही मला नव्हती. पण घराकडे परत निघाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात म्हणजे त्या दिवशी रात्री १०.२० वाजता माझा हा अपघात झाला.
बरं हा अपघात होताना रस्त्यावर वाहनांची गर्दीही नव्हती. रस्ता पूर्ण रिकामाच होता. त्यातही मी रस्त्याच्या डाव्या बाजूने तेही रस्त्याच्या कडेने दुचाकी चालवत होतो. अपघातासाठी पोषक अशी एकही बाब तिथे नव्हती.पण कदाचित त्या रिकाम्या रस्त्याचा गैरवापर करण्याचा निर्णय अपघातास कारणीभूत ठरलेल्या त्या चारचाकीवाल्या वाहनचालकाने घेतला असावा. या निर्णयातूनच तो पाठीमागून अमर्याद (सुसाट) वेगाने आला. मला सहीसलामत मागे टाकून पुढे जाण्यासाठी त्याला पूर्ण रस्ताही रिकामा होता. तरीही त्याने गरज नसतानाही अर्धचंद्राकृती आकारात कट मारला आणि हेच अपघाताचं कारण ठरलं. कारण त्याच्या या कट मारण्याच्या नादात त्याची गाडी रस्त्याच्या मधोमध असलेल्या रस्ता दुभाजकाला धडकली आणि क्षणात त्याची गाडी हवेत उडाली. त्याची हवेत उडालेली ती गाडी ही त्याच्या आणि माझ्या गाडीत चार फुटांवरून अधिक अंतर असतानाही माझ्या चालत्या दुचाकीवर पडली. यामुळे माझी दुचाकी आणि मी दोघेही हवेत उडालो आणि तेवढ्याच वेगाने आम्ही दोघेही रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यावर आदळलो. हे सर्व घडत असताना मला सर्व कळत होते. पण त्या एका क्षणात मी काहीच करु शकलो नाही. एका क्षणात आता आपण जाणार, माझ्या मुलाच्या दुसऱ्या दिवशीच्या दहावीच्या पेपरचे काय होणार, याची जंत्रीच माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. तोपर्यंत अपघात झालेला होता. या अपघातात मी डोक्यावर पडलो. डोक्यावर पडल्याने हेल्मेट फुटले, पण डोकं वाचलं. बेशुद्ध झालो आणि पाच मिनिटांनी शुद्धीवर आलो.
शुद्धीवर आल्यानंतर उठून पाहतो तर, स्थानिक नागरिकांनी मला गराडा घातलेला. रस्त्यावर आपटल्याने अंगावरील सर्व कपडे मातीने माखलेले. मुका मार लागल्याने त्रास होण्यास सुरुवात झाली होती. शरिरातील अंतर्गत वेदना पाहून आपण आता वाचणार की नाही, याचेच काहूर मनात उठलं होतं. अशाही परिस्थितीत मला मदत करण्याऐवजी आणि या अपघातासाठी माझी काहीही चूक नसतानाही जमलेले लोक हे पेताड दिसतंय, पिऊन मध्येच आडवं आल्यानं अपघात झालेला दिसतोय. पोलिसांना बोलवा, पत्रकारांना फोन करा, अशी वायफळ बडबड करत होते. शेवटी वैतागून मला उपस्थित लोकांना सांगावं लागलं. बाबांनो, मी दारू पिलोलो नाही. आयुष्यात मी दारू पिणे सोडा, कधी तिला शिवतही नाही. मला एका चारचाकी गाडीने पाठीमाघून उडविल्यामुळे हा अपघात झाला आहे. तेव्हा कुठे उपस्थितांचा रोष थोडासा निघून गेला.
या अपघातासाठी माझी काहीही चूक नव्हती. तरीही अपघात झालाच ना, हेल्मेट फुटले ना, पण हे फुटलेले हेल्मेटचं, आधी माझ्या डोक्याचे संरक्षण करण्यासाठी ढाल बनले होते आणि हेल्मेट ढाल बनल्यामुळेच माझे डोके वाचले होते. याचाच अर्थ माझ्या डोक्यावरील संभाव्य संकटाचा गंभीर 'वार' हा माझ्या हेल्मेटने त्याच्या स्वतःच्या अंगावर झेलला होता आणि केवळ हेल्मेटमुळेच मी या जीवघेण्या अपघातातून सहीसलामत बाहेर पडू शकलो. कल्पना करा, जर हेल्मेट नसते तर, काय झाले असते?, म्हणूनच मी म्हणतो, दुचाकीस्वारांनो हेल्मेटविना दुचाकी प्रवास टाळा?
दरम्यान, या अपघातातून बाहेर पडण्यासाठी सकाळचे बातमीदार अशोक गव्हाणे, आमच्या सोसायटीचे चेअरमन महेशचंद्र जाधव आणि सेक्रेटरी संजय डिंबळे, सोसायटीतील अन्य सर्व सदस्य आणि मित्र परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे.