Pune Dam water storage current situation :- यंदा भर उन्हाळ्यात पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये वाढलं तब्बल ३०.४४ टीएमसी पाणी!

धरणांमध्ये सध्या एकूण ४५.८८ टीएमसी पाणी : गतवर्षीच्या तुलनेत १५.३५ टक्के जास्त साठा

Pune Dam water storage current situation :- यंदा भर उन्हाळ्यात पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये वाढलं तब्बल ३०.४४ टीएमसी पाणी!
पुणे:- जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्याचे ए.आय.ने तयार केलेले हे छायाचित्र.

डॉ.गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १३ जून २०२५ :-  पुणे शहर व जिल्ह्यात यंदा भर उन्हाळ्यात म्हणजेच मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्यातील धरणांना फायदा झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील एकूण उपलब्ध पाणीसाठ्यात अवघ्या तीन आठवड्यात तब्बल ३०.४४ टीएमसी पाण्याची भर पडली आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ४५.८८ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. एकूण पाणीसाठ्याचे हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत १५.३५ टक्के जास्त आहे. 

गेल्या वर्षीच्या जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण केवळ १५.४४ टीएमसी पाणी शिल्लक राहिले होते. यंदाच्या जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी मात्र हाच एकूण पाणीसाठा ४५.८८ टीएमसी इतका उपलब्ध झाला आहे. एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत सध्याचा उपलब्ध पाणीसाठा हा २३.१३ टक्के इतका झाला आहे. गतवर्षी हीच टक्केवारी केवळ ७.७८ टक्के इतकी होती. टक्केवारी नुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५.३५ टक्के जास्त पाणीसाठा झाला आहे. 

पुणे जिल्ह्यातील टाटा समुहाची सहा धरणे वगळता एकूण २६ धरणे आहेत. त्यामुळे याव्यतिरिक्त टाटा समूहाच्या या सहा धरणांतील पाणीसाठा वेगळा आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे.सर्व प्रमुख धरणांसह सर्व धरणांतील मिळून एकूण उपयुक्त पाणी साठवण क्षमता ही १९८.३४ टीएमसी इतकी आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील सध्याचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

- टेमघर --- ०.१८
- वरसगाव --- २.८०
- पानशेत --- १.६७
- खडकवासला --- ०.८१
- पवना --- २.२९
- चासकमान --- ०.९६
- भामा आसखेड --- १.३५
- आंद्रा --- १.०५
- गुंजवणी --- ०.८२
- भाटघर --- १.७०
- नीरा देवघर --- १.१३
- वीर --- ३.९५
- माणिकडोह --- ०.५६
- येडगाव --- ०.७६
- डिंभे --- १.८०

(टीप:- पाणीसाठ्याची ही स्थिती दि. ८ जून २०२५ पर्यंतची आहे.)