Rooftop Solar Energy : घराच्या छतावरील सौरऊर्जा : स्वच्छ, किफायतशीर आणि शाश्वत भविष्याचा मार्ग!

Rooftop Solar Energy : घराच्या छतावरील सौरऊर्जा : स्वच्छ, किफायतशीर आणि शाश्वत भविष्याचा मार्ग!
पुणे:- डॉ. ललिता भगत.

आजच्या युगात ऊर्जा ही केवळ गरज नसून ती विकासाची मूळ कडी बनली आहे. उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य, वाहतूक अशा प्रत्येक क्षेत्रात विजेचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. मात्र पारंपरिक ऊर्जास्रोत जसे की कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू हे मर्यादित असून पर्यावरणाला हानी पोहोचवणारे आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन पर्याय म्हणून सौरऊर्जेकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले आहे. 

- डॉ. ललिता भगत 

भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात तर सौरऊर्जा हा अत्यंत उपयुक्त आणि व्यवहार्य पर्याय ठरतो. सौरऊर्जा म्हणजे सूर्यप्रकाशापासून थेट वीज निर्मिती करण्याची प्रक्रिया. यासाठी सोलार पॅनेल्सचा वापर केला जातो. छतावर बसवलेले हे पॅनेल्स सूर्यप्रकाश शोषून त्याचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात. या प्रक्रियेमुळे कोणताही धूर, प्रदूषण किंवा हानिकारक वायू निर्माण होत नाहीत. म्हणूनच सौरऊर्जा ही “ग्रीन एनर्जी” किंवा हरित ऊर्जा म्हणून ओळखली जाते.

अलीकडील काळात घरगुती पातळीवर सोलर रूफटॉप सिस्टीम बसवण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते. उदाहरण म्हणून ४ किलोवॅट पीक (Kwp) क्षमतेची सोलार सिस्टीम घेतली, तर ती साधारणतः दररोज प्रति किलोवॅट पीक ४ युनिट्स वीज निर्माण करते. म्हणजेच ४ किलोवॅट पीक सिस्टीममधून दररोज सुमारे १६ युनिट्स वीज निर्माण होते. याचा मासिक हिशेब केला असता सुमारे ४८० युनिट्स आणि वार्षिक अंदाजे ५७६० युनिट्स वीज निर्मिती होते.

या उत्पादनाचा आर्थिक लाभही तितकाच महत्त्वाचा आहे. सध्याच्या दरानुसार प्रति युनिट सुमारे १२ रुपये बचत होत असल्यास, प्रत्येक महिन्याला जवळपास ५७६० रुपयांची बचत होते. याच गणनेनुसार वर्षाला सुमारे ६९ हजार रुपयांची आणि २५ वर्षांच्या कालावधीत सुमारे १७ लाख २८ हजार रुपयांची बचत होऊ शकते. विशेष म्हणजे अशा सोलार प्रकल्पाची सुरुवातीची किंमत साधारणतः ४.५ लाख रुपये इतकी असते. म्हणजे काही वर्षांतच गुंतवणूक परत मिळते आणि त्यानंतरचा काळ हा नफ्याचा ठरतो.

या प्रकल्पाकडे पर्यावरणीय दृष्टिकोनातून पाहिले असता, सौरऊर्जेचे फायदे आणखी मोठे आहेत. उदा. अशा पद्धतीच्या एका सिस्टीमने आतापर्यंत ११ मेगावॅट-तास (MWh) वीज निर्मिती केली असेल, तर ती ऊर्जा एका दिवसासाठी सुमारे ३६४ घरांना पुरेशी ठरते. याचबरोबर १९४ झाडे लावल्याइतका पर्यावरणीय फायदा होतो आणि सुमारे ७.६ टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन टाळले जाते. या आकडेवारीवरून सौरऊर्जा ही केवळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नसून पर्यावरण रक्षणासाठीही अत्यंत प्रभावी साधन आहे, हे स्पष्ट होते.

महाराष्ट्र राज्यात विशेषतः शहरी भागात वाढत्या विजेच्या मागणीमुळे विजेचे बिल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत सोलार रूफटॉप सिस्टीम हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकारदेखील सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आणि अनुदाने देत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठीही सोलार सिस्टीम बसवणे अधिक सुलभ झाले आहे. तथापि, सौरऊर्जा प्रणालीचा योग्य वापर आणि देखभाल करणेही तितकेच आवश्यक आहे. सोलार पॅनेल्सवर धूळ, माती किंवा पानांचा साठा झाला तर त्याची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे नियमित साफसफाई करणे गरजेचे आहे. साधारणपणे महिन्यातून एकदा पॅनेल्स स्वच्छ केल्यास वीज निर्मिती कायम उच्च पातळीवर राहते. सोलार सिस्टीम बसवताना तांत्रिक बाबींचाही विचार करणे आवश्यक आहे. छताची दिशा, सावलीची अडचण, पॅनेल्सचा दर्जा, इन्व्हर्टरची गुणवत्ता, तसेच वायरिंग आणि सुरक्षा यांचा योग्य विचार करूनच प्रकल्प राबवावा. अनुभवी आणि विश्वासार्ह कंपनीकडूनच सोलार सिस्टीम बसवणे फायदेशीर ठरते.

आजच्या बदलत्या काळात “ऊर्जा स्वावलंबन” ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. प्रत्येक घराने स्वतःची वीज स्वतः तयार केली, तर केवळ विजेच्या बिलात बचत होणार नाही, तर देशाच्या ऊर्जा सुरक्षेलाही हातभार लागेल. ग्रामीण भागात तर सौरऊर्जा शेती, पाणीपुरवठा आणि लघुउद्योगांसाठी क्रांतिकारक ठरू शकते. शेवटी असे म्हणता येईल की, सौरऊर्जा ही केवळ पर्याय नसून भविष्याची गरज आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत ऊर्जेसाठी सोलार सिस्टीमचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. आर्थिक बचत, पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा स्वावलंबन या तिन्ही गोष्टी साध्य करण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे सौरऊर्जा होय. "आजचा निर्णय, उद्याचा उज्ज्वल भविष्य” या ध्येयाने प्रत्येकाने सौरऊर्जेकडे पाऊल टाकले, तर भारत निश्चितच ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर आणि पर्यावरणपूरक देश म्हणून जगासमोर उभा राहील."