महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समिती 'अव्वल', 'बारामती'ने पटकावला तिसरा क्रमांक
राज्यातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर : कामगिरीवर आधारित मूल्यांकन

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २३ एप्रिल २०२५ :- बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत कामगिरीवर करण्यात आलेल्या बाजार समित्यांच्या मूल्यांकनात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समिती राज्यात 'अव्वल' ठरली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समितीने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
राज्यातील ३०५ बाजार समित्यांची आणि ६८ खाजगी बाजारांची सन २०२३-२४ या वर्षाच्या कामगिरीवर आधारित वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून गुणानुक्रमानुसार निश्चित करण्यात आली आहे. या क्रमवारीनुसार राज्यातील पहिल्या १० बाजार समित्यांमध्ये पुणे विभागातील बारामती, पंढरपूर आणि अकलूज या बाजार समित्यांनी बाजी मारली आहे.
गुणानुक्रमे पहिल्या १० बाजार समित्यांमध्ये वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीला सर्वाधिक १७८ गुण मिळाले आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड बाजार समिती १७१.५ गुण मिळवत राज्यात दुसरे स्थान मिळविले आहे. तिसऱ्या स्थानावरील बारामती बाजार समितीला १६५ गुण मिळाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर बाजार समितीने १५५.५ गुण मिळवत पाचवे तर, अकलूज बाजार समितीने १४९ गुण मिळवत आठवे स्थान पटकावले आहे.
बाजार समित्यांची आणि खाजगी बाजारांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी पणन संचालनालयाकडून जागतिक बँकेच्या सुचनेनुसार शेतमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी बाजार समितीत असलेल्या पायाभूत व इतर सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, योजना, उपक्रम राबविण्यातील सहभाग यानुसार ३५ निकष तयार करण्यात आले होते. या सर्व निकषांसाठी मिळून २०० गुण व खाजगी बाजारांसाठी २५० गुण निश्चित करण्यात आले होते.
पुणे विभागात 'बारामती' प्रथम
राज्यातील सहकार विभागाच्या रचनेनुसार राज्यात बाजार समित्यांचे विविध विभाग निश्चित करण्यात आलेले आहेत. यामध्ये पुणे हा एक विभाग आहे. पुणे विभागातील बारामती बाजार समिती विभागात प्रथम आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर बाजार समितीने विभागातून दुसरे तर, अकलूज बाजार समितीने तिसरे स्थान पटकावले आहे.
या क्रमवारीमुळे शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये आणि खाजगी बाजारांमध्ये आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध देण्याची निकोप स्पर्धा निर्माण होण्यास चालना मिळेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समित्यांनी अधिक जोमाने कामकाज केले पाहिजे.
- विकास रसाळ, पणन संचालक, महाराष्ट्र.