खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना १ एप्रिलपासून कर्ज वाटप सुरू, रब्बी हंगामाचे पीककर्ज वाटप संपलं!
पुणे जिल्हा बॅंक सर्व पात्र शेतकऱ्यांना खरीपातील पीकांसाठी कर्ज देणार : थकबाकीदार शेतकरी मात्र अपात्र ठरणार

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १ एप्रिल २०२५ :- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून (दि.१ एप्रिल २०२५) पासून पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांसाठी पीककर्ज देण्यास सुरुवात केली आहे. पण या पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना थेट जिल्हा बँकेत खेटे मारण्याची गरज नाही. आपापल्या गावातील प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्यामार्फतच (सोसायटी) शेतकऱ्यांना हे कर्ज वाटप केले जाणार आहे.
मात्र गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील या पीककर्जाची पूर्ण परतफेड केलेली असणे बंधनकारक आहे. परतफेड केली असलेलेच शेतकरी यंदाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी पीककर्ज घेण्यास पात्र ठरणार आहेत. याशिवाय जे शेतकरी पुन्हा खरीपासाठी पीककर्ज घेऊ इच्छितात. पण त्यांच्याकडे पुर्वीची थकबाकी आहे, असे शेतकरी अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पात्र होण्यासाठी पुर्वीची थकबाकी भरावी लागणार आहे.
जिल्हा बँकेच्या वतीने दरवर्षी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत खरीप हंगामातील पिकांसाठी तर, १ ऑक्टोबर ते ते पुढच्या वर्षातील ३१ मार्चपर्यंत रब्बी हंगामातील पिकांसाठी पीककर्ज वाटप करण्यात येते, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी खरीप हंगामातील पिकांसाठीच्या पीककर्जापासून वंचित ठेवला जाणार नाही. मागेल त्या सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जाणार आहे. यासाठी जिल्हा बॅंकेने पुरेशी तरतूद केली आहे. जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
- प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे,
अध्यक्ष, पुणे जिल्हा बँक.