अंबाजोगाईतील महाविद्यालयीन युवक ऋषीकेश मुंडेची अभिनय क्षेत्रात गरुडझेप, नव्या वर्षात आकर्षक भूमिकांची गुढी उभारण्यासाठी ऋषीकेश झाला सज्ज!
अभिनयासाठी अंबाजोगाई ते मुंबई व्हाया पुणे असा अभिनेता ऋषिकेशचा थक्क करणारा प्रवास

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २८ मार्च २०२५ :- मराठवाडयाचं पुणं अशी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराची ओळख आहे. या शहराने आतापर्यंत विविध क्षेत्रात अनेक नामवंत व्यक्ती दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, गंगाधरअप्पा बुरांडे, न्यायमूर्ती व्यंकटराव देशपांडे आदी नावांचा उल्लेख करता येईल. शिवाय अंबाजोगाई ही मराठीचे आद्यकवी मुकूंदराज आणि पासोडीकार दासोपंत यांची ही कर्मभूमी आहे. याच अंबाजोगाईचा उगवता अभिनेता ऋषीकेश मुंडे या महाविद्यालयीन युवकाने अभिनय क्षेत्रात चमकदार कामगिरी करण्यात यश मिळविले आहे. तो आता नव्या वर्षात आकर्षक भूमिकांची गुढी उभारण्यासाठी सज्ज झाला आहे.
अंबाजोगाईतील स्वामी विवेकानंद शाळेत ऋषीकेशचे इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण झाले योगेश्वरी नूतन विद्यालयात त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. शालेय जीवनापासूनच अभिनय क्षेत्रात आवड असणाऱ्या ऋषीकेशने आता दूरचित्रवाण्यांवरून प्रसारित केल्या जात असलेल्या विविध मालिकांमध्ये अभिनेता म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे.
ऋषीकेशने त्यांच्या आयुष्यातील पहिली मालिका केली, ती म्हणजे सोनी मराठी चॅनेलवरील 'तू भेटशी नव्याने ही होय. याचं मालिकेमुळे ऋषिकेशला अभिनय करण्याची पहिली संधी मिळाली आणि इथूनच त्याचा अभिनय क्षेत्रात प्रवेश झाला. ही मालिका सुरू असतानाच त्याला सन मराठी चॅनेलवरील लोकप्रिय मालिका 'आदिशक्ती' मिळाली आणि हळूहळू तो अभिनय क्षेत्रातील यशाची शिखरे चढत-चढत आज त्याचा अभिनय क्षेत्रातील प्रवास हा स्टार प्रवाह चॅनेलवरील लोकप्रिय मालिका 'उदे ग अंबे' पर्यंत पोहोचला आहे. सध्याचे त्याचे नवीन मराठी वर्ष पाहता, त्याला असं वाटतं की, त्याची नवीन वर्षाची सुरुवात आता गुढी सारखी उंच यशाने होणार आहे.
याबाबत 'ग्रामराज्य'शी बोलताना ऋषीकेश म्हणाला, " नवीन वर्ष हे माझ्यासाठी यशाचे असणार आहे. कारण लहानपणी मी माझ्या वडीलांसोबत गुढी उभा करायचो आणि म्हणायचो पप्पा गुढी अजून थोडी उंच करा ...! वडिलांना हे म्हणताना तेव्हा खूप गंमत वाटायची. आज त्या आठवणी आठवून हसायला येते. त्यावेळी वडिलांनी एक गोष्ट सांगितली होती. ती म्हणजे गुढीच्या पाया पडताना या उंच गुढीकडे भरपूर यश माग. कदाचित तेव्हा मी पाया पडताना ते मागितले पण असेल. परंतु, आज या सणाचा अर्थ प्रकर्षाने मला जाणवत आहे. गुढीपाडवा म्हणजे एक तर मराठी नववर्षाची सुरूवात आणि ती आपण यशाने सुरू केली तर, यशाची गुढी नेहमीच उंचच राहील."
सध्या मी घरापासून लांब राहून मनोरंजन क्षेत्रात यश मिळवायचे प्रयत्न करत आहे. नवनवीन भूमिकेतून माझी छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मी हजारो मैलांचा प्रवास करून माझ्या अंबाजोगाई या शहरातून एक स्वप्न उराशी बाळगून पुण्यात आलो होतो. त्यानंतर पुण्यातून हळूहळू मुंबई गाठली आणि आज तुमच्या समोर अभिनेता म्हणून माझ्या यशाची गुढी उभारतो आहे. नवीन वर्ष मला खूप खूणावत आहे. खूप साऱ्या गोष्टी मनात आहेत. नवीन वर्ष यशाचं आणि सुख समृद्धीच जावे, हीच इच्छा आहे. आज माझी यशाची गुढी उभा करत असताना मागे वळून पाहिले तर संपूर्ण प्रवास डोळ्यासमोर उभा राहत आहे. अंबाजोगाईवरून निघताना माहिती नव्हते की,आपलं नाणं वाजेल की नाही. त्यामुळेच माझ्या कुटुंबाने मला पुण्यात बी. फार्मसीचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात पाठवले आणि मीसुद्धा शिक्षणासाठी अंबाजोगाईवरून निघताना एक गाठोडे बांधलं ते शिक्षणाच आणि दुसरं गाठोडे बांधलं माझ्या मनात ते मनोरंजन विश्वात काम करायचं. अभिनयाचे स्वप्नच उराशी बाळगलं आणि ही सर्व गाठोडे घेऊन मी पुण्यात आलो.
दरम्यान, यापैकी एक गाठोडे सोडले व बी. फार्मसीच्या शिक्षणास सुरुवात केली. पण मनातील अभिनयाचे गाठोडे काय शांत बसत नव्हते. मग हळूहळू ते गाठोडे सोडण्यासाठी मी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर , यशवंतराव चव्हाण नाट्यगृह , अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, अशा ठिकाणी पायी जाऊन या क्षेत्रात येण्यासाठी मनाचं गाठोडे हळूहळू मोकळे करत होतो आणि सोबतीला असलेले बी. फार्मसीचं गाठोडे हे फार वेगाने पुढे जात होते. मला समतोल राखणं कठीण जात होते. पण हळूहळू शिक्षण आणि मनोरंजन क्षेत्र यांची सांगड घालत गेलो. तेव्हा मला मुंबईची वाट सापडली आणि माझा पुणे-मुंबई प्रवास सुरू झाला. यामुळेच मी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेऊ शकलो, असे ऋषीकेश सांगत होता. भावी वाटचालीसाठी ऋषीकेशला ग्रामराज्यतर्फे शुभेच्छा.