शेतकऱ्यांनो, खरिपाच्या पीककर्जासाठी शून्य टक्के व्याजाचा लाभ घ्यायचाय, तर मग हे करावे लागेल? काय ते पहा!  

शून्य टक्के व्याजाच्या लाभासाठी कर्जाची मुदतीत परतफेड अनिवार्य : अन्यथा नियमानुसार व्याज भरावे लागणार

शेतकऱ्यांनो, खरिपाच्या पीककर्जासाठी शून्य टक्के व्याजाचा लाभ घ्यायचाय, तर मग हे करावे लागेल? काय ते पहा!  
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. २८ मार्च  २०२५ :-   खरीप हंगामातील पिकांसाठी पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील पूर्ण कर्जाची परतफेड मुदतीत करणे अनिवार्य आहे. यामुळे शून्य टक्के पीककर्जाची सवलत सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार नसून, जे शेतकरी येत्या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजेच ३१ मार्च २०२५ पर्यंत पीककर्जाची परतफेड करतील, अशाच शेतकऱ्यांना या शून्य टक्के व्याज योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो, हा लाभ घेऊ इच्छित असाल तर, ३१ मार्च २०२५ पर्यंत पीककर्जाची परतफेड करण्याचे आवाहन राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी केले आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के देण्याबाबतचा तीन  सुमारे तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने घेतला आहे. राज्यभर ही योजना लागू होण्यापूर्वी केवळ पुणे व सातारा या दोन जिल्हा बँकांनी आपापल्या सदस्यांपुरती ही योजना लागू केली होती. यासाठी बॅंकेला मिळालेल्या नफ्यातील रक्कमेचा वापर केला जात असे. पुढे राज्य सरकारने पुणे व सातारा जिल्हा बँकांच्या धर्तीवर राज्यभर ही योजना लागू केली होती. दरम्यान, राज्य सरकारने राज्यभर ही योजना लागू केल्यानंतर वर्षभरातच केंद्र सरकारने पीक कर्जाच्या व्याज परताव्याच्या रक्कमेत अर्ध्या टक्क्याने कपात केल्याने शून्य टक्के व्याजाच्या पीककर्जाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र पुढे हा संभ्रम दूर करण्यात राज्य सरकारला यश आले होते.  

राज्यातील शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली दबले जाऊ नयेत, या उद्देशाने राज्य सरकारने शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पीककर्जाच्या व्याजात तीन टक्के सवलत मिळत होती. शिवाय केंद्र सरकार दोन टक्क्यांप्रमाणे  व्याज परतावा देत असे. उर्वरित एक टक्का हा जिल्हा बॅंका आपापल्या नफ्यातून तरतूद करत असत. यामुळे शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजाने मिळत असे. परंतु केंद्राच्या निर्णयाने ही पीककर्ज योजना कायमस्वरूपी बंद पडण्याची शक्यता सन २०२३ मध्ये निर्माण झाली होती. मात्र यावर राज्य सहकारी बँक आणि सरकारने यशस्वी मार्ग काढल्यामुळे ही योजना अद्याप चालू असल्याचे राज्याच्या सहकार विभागाकडून शुक्रवारी (दि.२८ मार्च) 'ग्रामराज्य'ला सांगण्यात आले.

पुणे जिल्हा बँक येत्या रविवारी, सोमवारी सुरु राहणार, सुट्टी रद्द :-  उपाध्यक्ष सुनील चांदेरे 

दरम्यान, खरीप हंगामातील पिकांसाठी पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत पीककर्जाची परतफेड करणे अनिवार्य आहे. यानुसार शेवटच्या दोन दिवसात शेतकरी कर्जाची मुदतीत परतफेड करण्यासाठी बॅंकेच्या विविध शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. मात्र येत्या ३० तारखेला रविवारी आल्याने आणि येत्या ३१ मार्चला रमजान ईदमुळे सरकारी सुट्टी आहे. परंतु शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी या दोन्ही दिवशीची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) घेतला आहे. त्यामुळे पुणे जिल्हा बॅंकेच्या सर्व शाखा येत्या रविवारी आणि सोमवारी सुरु राहणार आहेत, असे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी शुक्रवारी (दि.२८) सायंकाळी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील शेतकरी केवळ सुट्टीमुळे शून्य टक्के व्याजाच्या लाभापासून वंचित राहू नयेत, या उद्देशाने सुट्टीच्या दिवशी बॅंकेच्या सर्व शाखा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ  शेतकरी सभासदांच्या मार्च २०२५ अखेरच्या पीककर्ज वसुलीची पुर्तता करण्याकरीता व दैनंदिन आणि नियमित व्यवहारांकरीता बँकेच्या सर्व शाखा, विभागीय कार्यालये व मुख्य कार्यालय हे  रविवारी व सोमवारी सुरू ठेवण्यात येणार आहे. या सुट्ट्यांमुळे शेतकरी, सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. 

     - सुनील चांदेरे, 
       उपाध्यक्ष, पुणे जिल्हा बॅंक.