राज्यातील सर्व शाळा आता सकाळीच भरणार, पण कधीपासून? उन्हाचा तडाखा वाढल्याने शिक्षण खात्याचा जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिकांना आदेश 

उष्णतेच्या लाटांमुळे विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता : उन्हाळ्यातील शाळांबाबत मार्गदर्शक सूचना जारी 

राज्यातील सर्व शाळा आता सकाळीच भरणार, पण कधीपासून? उन्हाचा तडाखा वाढल्याने शिक्षण खात्याचा जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिकांना आदेश 
पुणे:- वर्गीत बसून शालेय शिक्षण घेत असलेले शालेय विद्यार्थी

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २९ मार्च २०२५ :-  महाराष्ट्रात वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे राज्यातील सर्व शाळा आता फक्त सकाळच्याच सत्रात भरविण्यात येणार आहेत.  राज्याच्या शिक्षण विभागाने याबाबतचा आदेश २८ मार्च रोजी सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिका आणि नगरपालिकांना दिला आहे. यानुसार येत्या १ एप्रिलपासून राज्यातील सर्व प्राथमिक शाळा या सकाळी ७ ते ११.१५ आणि माध्यमिक शाळा या सकाळी  ७ ते ११.४५ वाजेपर्यंतच भरणार आहेत. 

वाढत्या उन्हामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी विविध शिक्षक संघटनांकडून शाळेची वेळ सकाळची करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे करण्यात आली होती. तसेच काही जिल्ह्यांनी सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याबाबतचा आदेश दिलेला आहे.

परंतू, या सर्व जिल्हयांमध्ये शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास आल्याने, राज्यातील सर्व शाळा एकाच वेळेत भराव्यात आणि एकाच वेळेत सुटाव्यात, याची खबरदारी घेण्यासाठी शाळांचे वेळापत्रकही शिक्षण खात्याने सर्व जिल्हा परिषदा, महापालिका आणि नगरपालिकांना पाठविले आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये शाळेच्या वेळेत एकवाक्यता असावी, या उद्देशाने हे वेळापत्रक निश्चित करण्यात आल्याचे राज्याचे शिक्षण संचालक 
(प्राथमिक) शरद गोसावी आणि शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) संपत सुर्यवंशी यांनी संयुक्तपणे काढलेल्या लेखी आदेशात नमूद केले आहे.

उष्णतेच्या लाटेच्या बचावासाठी विद्यार्थी व शाळांनी काय करावे?, याबाबत मार्गदर्शक सूचना जारी 

- उन्हाळयात विद्यार्थ्यांनी मैदानी व  शारीरिक हालचाली टाळाव्यात.
- शाळांनी वर्गांच्या बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत.
- विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून कसा बचाव करावा , याबाबत त्यांना शिक्षित करावे.

- वर्गांमधील पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करावी.

- विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करुन द्यावे.

- टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या आणि उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.

- पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावेत.

- डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करावा.

- उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालावी.

- उन्हात बाहेर पडणे टाळावे.

सकाळच्या सत्रातील शाळेसाठीचे वेळापत्रक

(प्राथमिक शाळा) :- 

- सकाळी ---  ७:०० ते ७:१५ -- परिपाठ

- ७:१५ ते  ७.४५ --- पहिली तासिका

- ७:४५ ते ८.१५ ---- दुसरी तासिका 

- ८:१५ ते ८.४५ ---- तिसरी तासिका 

- ८:४५ ते ९:१५ ----  चौथी तासिका 

- ९:१५ ते ९:४५ --- भोजनासाठी सुट्टी

- ९:४५ ते १०:१५ ---- पाचवी तासिका 

- १०:१५ ते १०:४५ --- सहावी तासिका

- १०:४५ ते ११:१५ --- सातवी तासिका 

माध्यमिक शाळा :- 

- ७:०० ते ७:१५ --- परिपाठ

- ७:१५ ते ७ :४५ --- पहिली तासिका 

- ७:४५ ते ८.१५ --- दुसरी तासिका

- ८.१५ ते ८.४५ -- तिसरी तासिका

- ८:४५ ते ९:१५ ---- चौथी तासिका 

- ९:१५ ते ९:४५ ---- भोजनाची सुट्टी

- ९:४५ ते १०:१५ --- पाचवी तासिका

- १०:१५ ते १०:४५--- सहावी तासिका 
- १०:४५ ते ११:१५ ---- सातवी तासिका 
- ११:१५ ते ११:४५ ---- आठवी तासिका

सध्या उन्हाळा खुपच कडक सुरू झाला आहे. या उन्हामुळे शालेय विद्यार्थ्यांना या कडक उन्हाचा खुप त्रास होत आहे. आता शाळा सकाळच्या सत्रात सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा उन्हापासून बचाव होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शिक्षक या निर्णयाचे स्वागत करत आहेत. 

- दत्तात्रेय वाळूंज, 
माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षक संघ.