पोशिंद्या बळीराजाचा आसूड मोर्चा, सरकारी धोरणांविरोधात राज्याच्या कृषी आयुक्तालयासमोर व्यक्त केला आक्रोश
शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध : शेतकरी संघटनांचा सहभाग

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १९ मार्च २०२५ :- देशातील शेतकऱ्यांना आजही मुलभूत प्रश्नांमुळे जगणे मुश्कील बनले असून, शेतकरीविरोधी धोरणांमुळे शेतकरी पिचत चालले आहेत. पोशिद्या बळीराजाच्या या अवस्थेची सरकारला जाणीव करून देण्याच्या उद्देशाने बुधवारी (दि.१९ मार्च) शेतकरी संघटनेने कृषी आयुक्त कार्यालयावर आसूड मोर्चा काढला . या मोर्चाच्या माध्यमातून सरकारी धोरणांविरोधात आक्रोश व्यक्त करण्यात आला.
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य धरणे आंदोलन आणि आसूड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. अजित काळे, शिवाजी नांदखिले यांच्यासह महाराष्ट्रासह व अन्य राज्यातील शेतकरी संघटनांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी दि. १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे, त्यांच्या पत्नी मालती करपे आणि दोन मुले व दोन मुली यांनी सामुदायिक आत्महत्या करून सरकार विरोधात निषेध नोंदवला होता. त्या घटनेचा बुधवारी ३९ वा स्मृतिदिन आहे. या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा आसूड मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, ओरीसा आणि दिल्ली या राज्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतमालावरील निर्यातबंदी उठवावी, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी, शेतमजूर, बारा बुलतेदार यांची मायक्रो फायनान्स संस्था, पतसंस्था आणि खाजगी सावकार यांच्या कर्जातून मुक्तता करावी, दुधासह सर्व शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्यात यावा, शेतीपंपासाठी दिवसा पुर्ण दाबाने वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा, उसाला प्रति टन पाच हजार रुपये भाव द्यावा, दोन साखर कारखान्यामधील अंतराची अट रद्द करावी आणि वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.