राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचे ज्ञान व परदेशातील तंत्रज्ञान कृषी खाते आणि कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून लोकाभिमुख करणार!
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे : राज्यस्तरीय कृषी अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेचे उद्घघाटन

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ९ एप्रिल २०२५ :- महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकरी, कृषी अधिकारी आणि निवृत्त कृषी अधिकाऱ्यांचे ज्ञान आणि परदेशातील शेतीविषयक तंत्रज्ञान हे राज्याचा कृषी विभाग व कृषी विद्यापीठांमार्फत अधिकाधिक लोकाभिमुख करण्यावर कृषी विभाग भर देणार असल्याचे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी (दि.९ एप्रिल) पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सांगितले.
राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने पुणे येथे राज्यस्तरीय कृषी अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग,महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर, स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदवले, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक विनायक कोकरे, पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकळ आदी उपस्थित होते.
शेतीमध्ये शासकीय खर्चाने भांडवली गूंतवणूक करून शेती उत्पादन कसे वाढविता येईल, याबाबत विचार सुरू आहे. कारण समाजात गुणवत्तेला महत्त्व देणारा एक वर्ग आहे. त्यामुळे आरोग्याविषयी जागरुक असलेला वर्ग समाजात असून, अन्न कितीही महाग असले तरी तो वर्ग विकत घेणारा आहे. उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होणे म्हणजे स्वयंपूर्ण झालो असे नाही. उत्पादनाची गुणवत्ता राखली जाणे, व्यवस्थित त्याची जाहिरात होणे, बाजारपेठ मिळणे आणि त्याला बाजारभाव मिळणे ही मूल्यसाखळी आपल्याला निर्माण करायची आहे, असेही कोकाटे यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले, "हवामान बदलामुळे शेतीपुढे खूप आव्हाने आहेत. एका क्षणात प्रचंड नुकसान होते. अशा परिस्थितीत शासन म्हणून शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणे, आपला विचार अभ्यास, प्रत्यक्षात आणणे त्यातून शेतकऱ्याला ज्ञान देणे, ही खरी काळाची गरज आहे. बदलत्या काळात शेतीला कशी सुरक्षा देऊ शकतो, खर्च कसा कमी करू शकतो. उत्पादन चांगल्या प्रतीचे कसे घेऊ शकतो. त्याला उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या सुविधा राज्य शासन कोणत्या प्रकारे देऊन त्याच्या पाठिशी उभे राहू शकते, या दृष्टीने या कार्यशाळेत चर्चा व्हावी."
कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रास्ताविक केले.या कार्यशाळेत शेतकरी, विक्रेता, खरेदीदार आदी पैलूंवर चर्चा करण्यासह कृषी विभाग, शेतकऱ्यांसमोरील प्रश्नावर विचारमंथन करून उपाययोजना सादर करणे आणि दिशा ठरविण्यात येणार असल्याचे मांढरे यांनी प्रास्ताविकात बोलताना सांगितले.
यावेळी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.कार्यशाळेला राज्यभरातून कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी,कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक,कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संस्थापक, शेतकरी गटांचे सदस्य, प्रयोगशील शेतकरी असे सुमारे २ हजारांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.