... आता नाय अडाणी राह्याचं, सायबर सुरक्षा शिकून शहाणं हुयाचं, पुणे जिल्ह्यातील सावित्रीच्या लेकींची भावना! 

पुणे झेडपीच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे बचत गटांच्या सव्वा लाख महिला बनल्या‌ सायबर सुरक्षेत 'साक्षर'

... आता नाय अडाणी राह्याचं, सायबर सुरक्षा शिकून शहाणं हुयाचं, पुणे जिल्ह्यातील सावित्रीच्या लेकींची भावना! 
पुणे:- पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात आलेल्या सायबर सुरक्षा प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करताना खासदार सुनेत्रा पवार, शेजारी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू-धोटे व अन्य अधिकारी.

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ९ एप्रिल २०२५ :-   पुर्वीच्या काळी ग्रामीण भागातील महिलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागायचं. यामुळे अनेक महिला निरक्षर राहत असत. यामुळे समाजातील निरक्षर लोकांना साक्षर करण्यासाठी सरकारने प्रोढांना साक्षर करणारा खास कार्यक्रम सुरू केला. तेव्हा निरक्षर महिला साक्षर व्हाव्यात, या उद्देशाने गावागावात भिंतीवर लिहिला जाणारा स्लोगन म्हणजे आता नाय अडाणी राह्याचं आणि शिकून शहाणं हुयाचं, हा असायचा. यामुळे निरक्षर महिला साक्षर झाल्या. पण तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील महिला या तंत्रज्ञानात निरक्षर झाल्या आहेत. त्यातूनची त्यांची सायबर गुन्हेगारांकडून आर्थिक फसवणूक होण्याचा धोका वाढला आहे. हा धोका टाळण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने बचत गटांच्या महिलांना सायबर सुरक्षेत साक्षर करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. यामुळे पुणे जिल्ह्यातील तब्बल सव्वा लाख महिलांनी सायबर सुरक्षेचे धडे गिरवले आणि या महिला आता सायबर सुरक्षेत साक्षर झाल्या आहेत. 

उमेद अभियानांतर्गत अंतर्गत कार्यरत असलेल्या बचत गटांतील महिलांनी 'आम्ही सावित्रीच्या लेकी' या ब्रीद वाक्याप्रमाणे संघटिततेकडून समृद्धीकडे वाटचाल सुरू करीत आहेत. राज्य सरकारच्या १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने पुणे जिल्ह्यात 'सायबर सुरक्षा जाणीव जागृती मोहीम' मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली.ग्रामीण भागातील महिला आणि युवतींमध्ये सायबर सुरक्षा व डिजिटल व्यवहारांबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू-धोटे यांनी सांगितले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दि.१ फेब्रुवारी २०२५ ते ८ मार्च २०२५ या कालावधीत ही मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली असल्याचे मत खासदार सुनेत्रा पवार  यांनी याबाबत बोलताना व्यक्त केले आहे. या मोहिमेमुळे बचत गटांच्या महिला आता स्वतःला सायबर साक्षर सावित्री समजू लागल्या आहेत . कारण यामुळे त्यांना वेळोवेळी येणारे खोटे संदेश, मेसेज किंवा लिंक आता सहज समजू लागल्या आहेत. यामुळे या महिला आता शहानिशा केल्याशिवाय कोणतीही लिंक उघडून पाहत नाहीत किंवा  येणाऱ्या खोट्या फोन कॉलवर स्वतःची माहिती देत नाहीत. प्रत्येक तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या (MKCL) सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये महिलांना  सायबर सुरक्षेचे प्रत्यक्ष म्हणजे ऑफलाइन प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणात  महाविद्यालयीन मुली व  बचत गटाच्या महिलांनी मोठ्या संख्येने  सहभाग नोंदवला. त्यांना कसे खोटे फोन कॉल येतात आणि कसे फसविण्याचा प्रयत्न झाला होता, यावेळी सांगितले. अनोळखी व्यक्तींना आपली  वैयक्तिक माहिती का देऊ नये ?, ओटीपी का देऊ नये?, बँकेचा पासवर्ड का देऊ नये? याबरोबरच विविध लिंक,मेसेज आणि सामाजिक माध्यमांवरील माहितीवर किती विश्वास ठेवायचा हे समजले. या उपक्रमांतर्गत 'एमकेसीएल'च्या प्रशिक्षित मुख्य प्रशिक्षकांनी जिल्ह्यातील विविध ४०० केंद्रांवर प्रशिक्षण दिले.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींनी गावागावात जाऊन महिलांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रजासत्ताकदिनी (दि. २६ जानेवारी) सायबर सुरक्षित पुणे जिल्ह्याचा संकल्प केला होता.या संकल्पाच्या अनुषंगाने ही मोहीम अधिक गतीने राबविण्यात आल्याचे शालिनी कडू-धोटे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत झालेल्या ग्रामसभांमध्येही  महिलांना सायबर सुरक्षेची ओळख करून देण्यात आली. यामध्ये बचत गटांच्या महिला, तरुणी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.

पुणे जिल्ह्यातील बचत गटांच्या महिला या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पद्धतीने आर्थिक व्यवहार व्यवहार करीत आहेत. हे आर्थिक व्यवहार करताना त्यांची सायबर गुन्हेगारांकडून आर्थिक फसवणूक होऊ नये. या उद्देशाने त्यांच्यासाठी हे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. 

- शालिनी कडू-धोटे, 
- प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पुणे.