पुणे जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला,अवघे ३१.५६ टक्के पाणी शिल्लक!
उजनीतील पाणीसाठा २० टक्क्यांच्या आत : जिल्ह्यातील २६ धरणांत फक्त ६२.६० टीएमसी पाणीसाठा

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ९ एप्रिल २०२५ :- पुणे जिल्ह्यातील धरणांनी आत्ताच तळ गाठला आहे. शिवाय दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने धरणांतील पाण्याच्या भाष्पीभवनाचे प्रमाण वाढू लागले आहे. परिणामी पुणे जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये मिळून फक्त ६२.६० टीएमसी (३१.५६ टक्के) पाणी शिल्लक राहिले आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पाणीसाठा असलेल्या उजनी जलाशयातील साठा २० टक्क्यांच्या आत आला आहे.
दरम्यान, टाटा समुहाच्या सहा धरणांमधील पाणीसाठाही ५० टक्क्यांहून कमी झाली आहे. सध्या टाटा समुहाच्या सहा धरणांमध्ये केवळ २१.१३ टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे. टाटा समुहाच्या धरणांमध्ये मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा आणि कुंडली या सहा धरणांचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण २६ धरणे आहेत. याव्यतिरिक्त टाटा समूहाच्या सहा धरणे वेगळी आहेत. यानुसार पुणे जिल्ह्यातील एकूण धरणांची संख्या ३२ इतकी आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे
`टाटां’च्या धरणांमध्ये २१.१३ टीएमसी पाणी
दरम्यान, पुणे जिल्ह्यात टाटा उद्योग समूहाची सहा धरणे आहेत. या सहा धरणांमध्ये मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा आणि कुंडली यांचा समावेश आहे. या सहा धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही ४२.७६ टीएमसी इतकी आहे. यापैकी सध्या २१.१३ टीएमसी (४९.४१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या सहापैकी लोणावळा हे धरण कोरडेठाक पडले आहे.
पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील ९ एप्रिलचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) (कंसात गतवर्षीचा आजचा पाणीसाठा)
- पवना --- ३.६८ (३.६२)
- चासकमान --- २.१३ (२.१६)
- भामा आसखेड --- ३.७८ (२.७२)
- आंद्रा --- १.३५ (१.५२)
- गुंजवणी --- १.६३ (१.४१)
- भाटघर --- ९.१००(५.३४)
- नीरा देवघर --- ३.४६ (३.६३)
- वीर --- ५.२०(४.३९)
- माणिकडोह --- ०.६३ (०.५०)
- येडगाव --- ०.३८ (०.२८)
- डिंभे --- ३.४६ (४.२४)
- घोड --- १.०५ (१.१९)
- उजनी --- १०.६६ (-२०.०८)