गावकऱ्यांनो, चला तर मग आपण आपलं गाव स्वच्छ ठेवू या!
पुणे जिल्हा परिषदेचे आवाहन : येत्या महाराष्ट्र दिनापासून 'कंपोस्ट खड्डा' भरण्यासाठी मोहीम

गजेंद्र बडे: ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २६ एप्रिल २०२५ :- गाव करील, तेथे राव काय करील, अशी एक मराठी म्हण आहे. याचा ढोबळ अर्थ म्हणजे गावांपुढे रावांचेही काही चालत नाही. म्हणून तर लोकांच्या सहभागातून गावेची गाव स्वच्छ झाले आहेत. पण ही गावे यापुढेही सातत्याने स्वच्छ राहिली पाहिजेत, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषद नेहमीच नव-नवीन प्रयोग करत आहे. या प्रयोगाचाच एक भाग म्हणून आता कंपोस्ट खड्डे भरून गावे स्वच्छ करण्याचा आहे. यासाठी येत्या महाराष्ट्र दिनापासून (दि. १ मे) खास मोहीम राबविण्यात येणार आहे. यानुसार, गावकऱ्यांनो, चला तर, मग आपण आपले गाव स्वच्छ ठेवू या, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी कचरा कमी करणे, त्याचा पुर्नवापर करणे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ही खास मोहीम राबविण्याचा आदेश दिला आहे. पुणे जिल्ह्यात येत्या १ मेपासून 30 सप्टेंबरपर्यंत सलग 138 दिवस “कंपोस्ट खड्डा भरु, आपले गाव स्वच्छ ठेवू” ही खास मोहीम सर्व ग्रामपंचायती व महसुली गावांमध्ये राबविण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.
या मोहिमेतंर्गत गावाची संपूर्ण स्वच्छता करण्याबरोबरच ग्रामीण भागातील गावांना स्वच्छतेचा अपेक्षित दर्जा मिळवून देणे, स्वच्छताविषयक वर्तणुकीबाबत ग्रामस्थांमध्ये बदल घडवून आणणे, कचरा व्यवस्थापनात पर्यावरणपूरक सुधारणा करणे, त्यावर उपाययोजना करण्यासाठी कचरा कमी करणे आणि कचऱ्याचा पुनर्वापर करणे आदी ही या अभियानाची उद्यिष्टे आहेत. पुणे जिल्हयात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा दोनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गावात स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करुन देत, गावे हागणदारीमुक्त प्लस (अधिक) मॉडेल म्हणून घोषीत करण्यात येत आहेत. यानुसार आज अखेरपर्यंत पुणे जिल्ह्यातील १ हजार ५२६ महसुली गावे हागणदारीमुक्त प्लस मॉडेल म्हणून घोषीत करण्यात आलेली आहेत.
दरम्यान, या खास मोहिमेत गावातील कचरा संकल करणे, नॅडेप खड्डा भरणे व उपसणे ही कामे करावयाची आहेत. या मोहिमेत ग्रामस्थ,महिला बचत गटातील सदस्य, स्वयंसेवी संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकरी गट, तरुण मंडळे यांचा लोक सहभाग घेऊन श्रमदान उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे गावांमध्ये नॅडेप कंपोस्टिंगचा वापर वाढेल. घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी, कचरा कमी करणे, कचऱ्याचा पुनर्वापर करण्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखता येईल. ग्रामस्थांचा स्वच्छता कार्यक्रमात सक्रीय सहभाग वाढेल.
या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक गावासांठी तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांची स्वतंत्र संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. गावस्तरावर केलेल्या कामांची जिल्हा व तालुकास्तरावरुन पडताळणी करण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा मंत्र्यांचे लोकप्रतिनिधींना पत्र
या मोहिमेत ग्रामस्थांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही सहभागी व्हावे, या उद्देशाने राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींना पत्र लिहिले आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन गुलाबराव पाटील यांनी या पत्राद्वारे लोकप्रतिनिधींना केले आहे.
मोहिमेचा कालबद्ध कार्यक्रम
मोहिम कालावधी ---- दिनांक १ मे ३० सप्टेंबर २०२५.
- मोहिमेचा एकूण कालावधी --- 138 दिवस.
- मोहिमेची दंवडी देणे/ सूचनाफलकावर सुचना देणे --- दिनांक २५ ते २६ एप्रिल २०२५
- घरगुती व सार्वजनिक स्तरावरील वर्गीकरण केलेल्या कचऱ्याचे संकलन करणे ---
- दिनांक २७ ते ३० एप्रिल २०२५
- मोहिमेचा प्रारंभ ---- दिनांक ०१ मे २०२५
- गावातील कचरा गोळा करुन नॅडेप खड्डे भरणे --- दिनांक ०१ ते १० मे २०२५.
- नॅडेप खड्डा उपसणे --- दिनांक १ ते १५ सप्टेंबर२०२५.
पुणे जिल्ह्यात या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवण्यासाठी मोहिमेबाबत विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांचे दोन दिवस ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले आहे.
- आप्पासाहेब गुजर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद, पुणे.