पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये उरलं अवघं २१.६६ टक्के पाणी, काटकसरीने पाणी वापरा!
सध्या फक्त ४२.९७ टीएमसी पाणी : पावसासाठी आणखी दोन महिने प्रतिक्षा करावी लागणार

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २० एप्रिल २०२५ :- पुणे जिल्ह्यातील टाटा समुहाची सहा धरणे वगळता उर्वरित २६ धरणांमध्ये मिळून आता केवळ २१.६६ टक्के पाणी उरलं आहे. यानुसार या धरणांमध्ये मिळून अवघे ४२.९७ टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे. दरम्यान, पाऊस पडण्यासाठी आणखी किमान दोन महिने इतकी प्रदीर्घ काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे या धरणांच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वांनी आतापासूनच काटकसरीने पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे.
गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ३७.३८ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध होता. यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा थोडासा पाणीसाठा जास्त उपलब्ध असला तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाची तीव्रता जास्त आहे. यामुळे धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनात वाढ झाली आहे. शिवाय कडक उन्हाचा समजला जाणारा मे महिना अद्याप सुरू झालेली नाही. या २६ धरणांव्यतिरिक्त टाटा समूहाच्या सहा धरणांमधील पाणीसाठा वेगळा आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ३२ धरणे आहेत. यापैकी सहा धरणे ही टाटा समूहाची आहेत.
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे.सर्व प्रमुख धरणांसह जिल्ह्यातील सर्व धरणांतील मिळून एकूण उपयुक्त पाणी साठवण क्षमता ही १९८.३४ टीएमसी इतकी आहे.
‘खडकवासला’त ३६.०७ टक्के पाणी उपलब्ध
दरम्यान, पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून सध्या केवळ १०.५२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण केवळ ३६.०७ टक्के इतके आहे. या चार धरणांमध्ये टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत या चार धरणांमध्ये एकूण ९.७५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. यानुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमधील एकूण पाणीसाठा हा पाऊण टीएमसीने जास्त आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या धरण साठा आकडेवारी अहवालातून हे उघड झाले आहे.
‘टाटां’च्या धरणांत १९.२४ टीएमसी पाणी
दरम्यान, पुणे जिल्ह्यात टाटा उद्योग समूहाची सहा धरणे आहेत. या सहा धरणांमध्ये मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा आणि कुंडली यांचा समावेश आहे. या सहा धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही ४२.७६ टीएमसी इतकी आहे. यापैकी सध्या १९.२४ टीएमसी (४४.९९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
प्रमुख धरणांमधील सध्याचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
- टेमघर --- ०.३६
- वरसगाव --- ५.४२
- पानशेत --- ३.७१
- खडकवासला --- १.०३
- पवना --- ३.३२
- चासकमान --- १.७०
- भामा आसखेड --- ३.०१
- आंद्रा --- १.२४
- गुंजवणी --- १.३६
- भाटघर --- ६.०८
- नीरा देवघर --- २.७४
- वीर --- ५.६८
- माणिकडोह --- ०.५६
- येडगाव --- ०.५०
- डिंभे --- २.५७