... अखेर उजनी धरणातील पाणीसाठा मायनसमध्ये, कर्जाऊ पाणी वापराला सुरूवात!

धरणातील उपयुक्त पाणीसाठा शून्याच्या खाली : अचल साठा ०.९० ने कमी 

... अखेर उजनी धरणातील पाणीसाठा मायनसमध्ये, कर्जाऊ पाणी वापराला सुरूवात!
पुणे: उजनी जलाशय

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १९ एप्रिल २०२५ :-   पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील सर्वात मोठे समजल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा शनिवारी (दि.१९ एप्रिल) मायनसमध्ये गेला आहे. या धरणातील उपयुक्त पाणीसाठा शुक्रवारीच (दि.१८ एप्रिल) शून्यावर आला होता. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी हा पाणीसाठा मायनसमध्ये (शुन्याच्या) खाली गेला आहे. यामुळे शनिवारपासून या धरणातील कर्जाऊ वापरण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ०.९० टीएमसी इतके कर्जाऊ पाणी वापरण्यात आले आहे. यामुळे उजनी धरणातील पाणीसाठा आता -०.९० वर आला आहे. 

उजनी जलाशयाची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १०६ टीएमसी इतकी आहे. यापैकी ५३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आणि ५३ टीएमसी हा अचल पाणीसाठा आहे. कोणत्याही धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपल्यानंतर त्या धरणातील पाणीसाठा हा शून्य म्हणजे धरण कोरडेठाक पडल्याचे समजले जाते. अचल पाणीसाठ्यातील पाणी वापरण्यास सुरुवात केल्यानंतर, जेवढे पाणी वापरले जाते, तेवढा पाणीसाठा मायनसमध्ये मोजला जातो, असे जलसंधारण विभागातून सांगण्यात आले. 

अचल पाणीसाठा म्हणजे काय? 

धरणातील एकूण पाणी साठवण क्षमता, उपयुक्त पाणी साठा क्षमता आणि अचल पाणी साठा क्षमता या तीनही बाबी भिन्न भिन्न असतात. एकूण पाणीसाठा हा प्रकल्पीय क्षमतेनुसार मोजला जातो आणि या प्रकल्पीय क्षमतेपैकी प्रत्यक्षात वापर केला जाणारा साठा हा उपयुक्त पाणीसाठा असतो आणि जे पाणी केवळ आपत्कालीन परिस्थितीत वापरले जाण्यासाठी राखीव असते, या आपत्कालीन राखीव पाण्याला अचल साठा (डेड स्टॉक) असे म्हटले जाते. 

कर्जाऊ पाणी म्हणजे काय?

एखाद्या धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपल्यानंतरच, तेही केवळ आपत्कालीन परिस्थितीत अचल पाणीसाठ्यातील पाणी वापरले जाते. अचल साठ्यातील वापरल्या जाणाऱ्या पाण्याला कर्जाऊ म्हणजेच वापरासाठी उसने घेतलेले पाणी म्हटले जाते. त्यानुसार पावसाळ्यात पुन्हा संबंधित धरण भरण्यास सुरुवात होते, तेव्हा अगोदर हे कर्जाऊ पाणी परत केले जाते. या पाण्याची पूर्ण परतफेड केल्यानंतरच धरणातील पाणीसाठ्याचे मोजमाप सुरू केले जाते.