महाराष्ट्रात बुधवारी (19 मार्च) 'अन्नत्याग' आंदोलन, पण कशासाठी, ते पहा?

किसानपुत्र आंदोलन : राज्यात ठिकठिकाणी सामुदायिक उपोषण करणार 

महाराष्ट्रात बुधवारी (19 मार्च) 'अन्नत्याग' आंदोलन, पण कशासाठी, ते पहा?
शेतकरी आत्महत्येचे संग्रहित छायाचित्र

ग्रामराज्य वृत्तसेवा, पुणे 

पुणे, दि. १८ मार्च २०२५ :- महाराष्ट्रातील लाखो शेतकरी व किसानपुत्र येत्या बुधवारी ((दि. १९ मार्च) राज्यात ठिकठिकाणी सामुदायिक अन्नत्याग करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना प्रकट करणार आहेत.

महाराष्ट्रातील शेतकऱ्याची पहिली आत्महत्या ही १९ मार्च १९८६ रोजी झाली होती. चिलगव्हाण (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील साहेबराव पाटील करपे यांनी पत्नी मालती व चार मुलांसह दत्तपूर (वर्धा) येथील मनोहर कुष्ठधामात सामुदायिक आत्महत्या केली. या घटनेची महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झालेली आहे.

राज्याला हादरून सोडणाऱ्या या घटनेला येत्या बुधवारी  (ता. १९ ) ३९ वर्षे पूर्ण होत आहेत. करपे कुटुंबातील कुटुंबप्रमुख साहेबराव, पत्नी मालती आणि त्यांच्या चार चिमुकल्यांची ही सामुदायिक आत्महत्या होती. त्यामुळे दरवर्षी १९ मार्च हा दिवस शेतकरी सहवेदना दिवस म्हणून पाळला जातो. त्यामुळे शेतकरी पुत्रांनी या सामुदायिक अन्नत्याग आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांनी केले आहे.

किसानपुत्र आंदोलनाच्या प्रमुख मागण्या 

- ज्यांचे उत्पन्नाचे एकमेव साधन शेती आहे, अशा अत्यल्प भूधारकांना दरमहा 18 हजार रुपये महिना अनुदान देण्यात यावे.

 - संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या साहेबराव करपे कुटुंबाच्या सामूदायिक  आत्महत्येच्या दिवशी म्हणजेच दरवर्षी 19 मार्चला लोकसभा व विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात यावे.

- गावो गावच्या ग्रामपंचायती, ग्रामसभांनी 'आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धाजली' अर्पण करणारा ठराव करून महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना पाठवावा.