आमदार, खासदारांना पेन्शन, मग शिक्षकांना का नाही?

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा सवाल : शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांचा वाचला पाढा

आमदार, खासदारांना पेन्शन, मग शिक्षकांना का नाही?
अमरावती:- शिक्षक समस्या निवारण सभेत बोलताना माजी राज्यमंत्री बच्चू कडू

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ४ एप्रिल २०२५ :-   देशातील सर्व आमदार, खासदारांना निवृत्ती वेतन (पेन्शन) असू शकते तर, स्वतःची अख्खी हयात सरकारच्या  कामाकरिता घालविणारे शिक्षकांना जुनी पेन्शन योजना का नको..?असा परखड सवाल राज्यकर्त्यांना करत माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर आक्रमक भूमिका व्यक्त केली. 

प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने अमरावती विभागस्तरीय शिक्षक समस्या निवारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून  ते अध्यक्ष बच्चू कडू यावेळी सभेला अमरावती विभागातील अमरावती अकोला, वाशिम, बुलढाणा ,यवतमाळ व अन्य जिल्ह्यातूनही शेकडो शिक्षकांनी उपस्थिती लावली होती. या सभेत जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित विनाअनुदानित, महानगरपालिका नगरपालिका व आश्रमशाळा आदी विविध संस्थांवर कार्यरत शिक्षक  मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी सभेचे प्रास्ताविक प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून सन प्रहार शिक्षक संघटनेची २०१६ पासूनची वाटचाल विशद केली. यावेळी प्राचार्य डॉ. दीपक धोटे, प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्य प्रवक्ते जितू दुधाने, कसबे गव्हाणचे सरपंच शशिकांत मंगळे आदी उपस्थित होते. 

बच्चू कडू पुढे म्हणाले, "शिक्षकांना जुनी पेन्शन मिळावी, वैद्यकीय देयके तत्काळ देण्यात यावीत. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, अंतर्गत बदल्या यातील पारदर्शकता कायम राहावी, शिक्षकांकडील अवाजवी कामे काढून घेण्यात यावीत, शिक्षकांना मानसिक स्थैर्य मिळावं, आदिवासी भागात कार्यरत शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता ,अतिरिक्त घरभाडे भत्ता मिळावा, वस्ती शाळा शिक्षकांचे प्रश्न खाजगी अनुदानित शाळांना अनुदान, आश्रमशाळा शिक्षकांच्या समस्या, महानगरपालिकेतील शिक्षकांच्या समस्या त्वरीत सुटणे आवश्यक आहे."         

यावेळी जितू दुधाने डॉ. दीपक धोटे यांनीही मनोगत व्यक्त केले.श सभेचे सूत्रसंचालन संघटनेचे अकोला जिल्हा कार्याध्यक्ष अमर भागवत  यांनी केले. विभागीय सचिव अमोल आगे यांनी आभार मानले. याप्रसंगी अमरावती भागातील संघटनेतील पाचही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सर्वश्री शरद काळे, मंगेश टिकार, महिंद्र रोठे, कुलदीप डंबारे,महादेव ठाकरे, अकोला प्रसिद्धी प्रमुख अमित फेंडर, नागेश जोगदे हेमंत बोरकर यांचा बच्चू कडू यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन उत्कृष्ट संघटनात्मक व शैक्षणिक कामाबद्दल सत्कार करण्यात आला. या सभेला संघटनेचे विभागातील सर्व पदाधिकारी ,सभासद आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'बच्चू कडू यांचा "शिक्षक हृदयसम्राट" पुरस्काराने गौरव 

या समस्या निवारण सभेत प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांनी संघटनेचे विभागातील जिल्हाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडू यांचा शिक्षकहृदय सम्राट  पुरस्काराने गौरव करण्यात आला.