जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कोंढव्यात ग्रामस्थांची जोरदार निदर्शने
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या नेतृत्वाखाली कोंढवा ग्रामस्थांकडून हल्ल्याचा तीव्र निषेध

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २३ एप्रिल २०२५ :- जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कोंढवा बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने कोंढव्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शने आंदोलनात कोंढवा बुद्रुक येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला.
या भ्याड दहशतवादी हल्ल्यांत देशभरातील २७ नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सहा जणांमधये पुण्यातील दोन नागरिकांचा समावेश आहे. समस्त कोंढवा बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने कोंढव्यातील दशरथ मरळ चौकात ही निदर्शने करण्यात आली. देशामध्ये कायदा व सुव्यवस्था अतिशय सुस्थितीत असतानाही विशिष्ट समुदायाच्या लोकांना टार्गेट करून देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही समुदायाचा आहे. त्या समुदायाचा प्रयत्न कदापि खपवून घेतला जाणार नाही. हा हल्ला अतिशय चिड आणणारा असल्याचे मत जालिंदर कामठे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
या हल्ल्याचा मुख्य सुत्रधाराला लवकरात लवकर शोधून त्यावर कठोर कारवाई करण्याचे काम मोदी सरकारने करावे, काश्मिरमध्ये अडकलेल्या पर्यटकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी शासनाकडून मदत करण्यात यावीआदी मागण्या यावेळी बोलताना कामठे यांनी केल्या. या आंदोलनात गणेश कामठे, वसंतराव कामठे, मधुकरराव मरळ, शिवाजीराव मरळ, चंद्रकांत गायकवाड, सागर कामठे, अनिल बाळा कामठे, किशोर मरळ, अमित कामठे, श्रीराम कामठे, रोहन कामठे, विठ्ठल ताथवडे, भरत पांगारे, संदीप मरळ, सुनील गायकवाड, वैभव कामठे, मदन शिंदे, अभिषेक थिरकुंडे आणि शिवाजी बधे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.