जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे पुण्यात निधन
वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास : विज्ञान व साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २० मे २०२५ :- ज्येष्ठ शास्त्रज्ञ, विज्ञान साहित्य लेखक आणि पुणे येथील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राचे (आयुका) संस्थापक जयंत विष्णू नारळीकर यांचे मंगळवारी (दि. २० मे) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
डॉ. नारळीकर यांनी खगोलभौतिकी आणि अवकाशशास्त्र क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत 'हॉएल-नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांत' (Hoyle–Narlikar theory of gravity) मांडला. हा सिद्धांत आइन्स्टाईनच्या सापेक्षतावाद सिद्धांताशी सुसंगत मानला जातो. त्यांनी 'क्वासी-स्टडी स्टेट कॉस्मोलॉजी' या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीविषयक पर्यायी सिद्धांताचा विकास केला. सन १९८८ मध्ये त्यांनी पुणे येथे 'आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राची (IUCAA)स्थापना केली. भारतीय खगोलशास्त्राच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
याशिवाय विज्ञानाच्या प्रसारासाठी डॉ. नारळीकर यांनी मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये विज्ञानकथा, विज्ञानविषयक लेखन केले . त्यांच्या 'चार नगरांतले माझे विश्व' या आत्मचरित्राला २०१४ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांनी विज्ञान कथांच्या माध्यमातून विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले.
डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म दि. १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विषयाच्या विभागाचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञान शाखेची पदवी (बी. एसस्सी) प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बी.ए., एम. ए. आणि पीएच.डी.च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व अन्य अनेक बक्षिसे मिळाली आहेत.
सन १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ज्ञ) यांच्याशी झाला. डॉ. नारळीकर यांना ३ मुली आहेत. सन १९७२ मध्ये ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. सन १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.
डॉ. जयंत नारळीकर यांची काही निवडक पुस्तके
विज्ञानकथा यक्षांची देणगी, वामन परत न आला, व्हायरस, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, टाईम मशीनची किमया, प्रेषित
विज्ञानविषयक आकाशाशी जडले नाते, नभात हसरे तारे, विज्ञानाची गरूडझेप, विज्ञानाचे रचयिते, नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, चार नगरांतले माझे विश्व, पाहिलेले देश, भेटलेली माणसं, The Lighter Side of Gravity, From Black Clouds to Black Holes, An Introduction to Cosmology, The Scientific Edge.
पुरस्कार आणि सन्मान
- पद्मभूषण (१९६५)
- पद्मविभूषण (२००४)
- युनेस्कोचा कलिंगा पुरस्कार (१९९६)
- महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२०१०)
- साहित्य अकादमी पुरस्कार (२०१४)
- 'गोविंद स्वरूप लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड' (२०२३).
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली
खगोलशास्त्र डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने देशाच्या ज्ञान-विज्ञानाच्या नभांगणातील तेजस्वी तारा निखळला.डॉ. नारळीकर यांनी ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात देशाला नव्या उंचीवर नेले.विज्ञानाची सूत्रे, विज्ञानवादी विचार, वैज्ञानिक दृष्टीकोन नव्या पिढीमध्ये रुजविण्यासाठी जीवनभर कार्य केले.विज्ञानाची रहस्ये सहज आणि सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगितली. त्यांच्या निधनाने ज्ञान-विज्ञानाच्या प्रसारासाठी वाहून घेतलेला देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.