'फेडू ऋण समाजाचे- निराधार, गरजू, गोरगरीब व अनाथ विद्यार्थ्यांना देऊ हात मदतीचे'!
पुणे झेडपीच्या गुरुजींचा अनोखा उपक्रम : वेतनातील पदरमोडीतून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी साथ
गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १९ मे २०२५ :- आपल्या परिसरातील निराधार, गरजू, गोरगरीब आणि निराधार मुले हे केवळ आर्थिक परिस्थितीमुळे हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील चार गुरूजींनी या विद्यार्थ्यांच्या सेवेचे व्रत हाती घेतले आहे. यानुसार हे गुरूजी दरवर्षी किमान २० ते कमाल ४० मुले दत्तक घेत असून, या दत्तक मुलांचा संपूर्ण सांभाळ करत आहेत.त्यांची ही सेवा मागील सुमारे आठ वर्षांपासून अखंडितपणे चालू आहे.या विद्यार्थ्यांच्या खर्चासाठी हे गुरूजी स्वतःच्या वेतनातून पदरमोड करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील हे गुरूजी आहेत. ते सर्व जण मिळून मागील सुमारे आठ वर्षांपासून शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत आहेत.या सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च हे गुरूजी स्वतःच्या पगारातून करत आहेत.त्यांनी आतापर्यंत सुमारे २५० हून अधिक विद्यार्थ्यांना आर्थिक, भावनिक आधार आणि मदतीचा हात दिला आहे.
यासाठी या चार गुरूजींनी मिळून 'एक हात मदतीचा' हा उपक्रम सुरू केला असून या उपक्रमाच्या माध्यमातून दरवर्षीच्या शैक्षणिक वर्षातील शाळेच्या पहिल्या दिवशीच या विद्यार्थ्यांना व कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या जिल्हा परिषद शाळेतील अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत. यासाठी ग्रामीण विशेषतः आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांतील अशा गरजू विद्यार्थ्यांची नावे ते संबंधित शाळांच्या शिक्षकांकडून घेत असतात. शिवाय या उपक्रमासाठी कोणत्याही सामाजिक संस्थेकडून किंवा वैयक्तिक स्वरूपात आर्थिक मदत किंवा देणगी स्वरुपातील मदत ते स्विकारत नाहीत. ते आपापल्या पगारातील काही रक्कम समाजाप्रती आपले काही देणे आहे, या भावनेतून या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगिण विकासासाठी खर्च करत आहेत.
हा अनोखा उपक्रम सुरू करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे माजी निमंत्रित सदस्य व ज्येष्ठ शिक्षक दत्तात्रेय वाळुंज यांनी पहिल्यांदा पुढाकार घेतला. त्यांच्याबरोबर नंदकुमार येवले, सुरेंद्र डोके, किसन कोंढवळे हे तीन शिक्षक यासाठी काम करत आहेत. हे चारही शिक्षक आपल्या पगारातील काही रक्कम एकत्रित करून त्यातून हा उपक्रम संयुक्तपणे राबवीत आहेत.
या गुरूजींनी सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. तेव्हापासून आजतागायत सलग ८ वर्षे ते हे काम अविरतपणे करत आहेत. या उपक्रमांतर्गत पहिल्या वर्षी २०, दुसऱ्या वर्षी ४०, तिसऱ्या वर्षी ५० आणि त्यानंतरच्या चार वर्षांमध्ये मिळून ७५ अशा एकूण सुमारे २५० विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात येत आहे.
दरम्यान, यावर्षी दत्तात्रेय वाळुंज यांनी नंदकुमार येवले, सुरेंद्र डोके, किसन कोंढवळे या आपल्या जुन्या सहकाऱ्यांसह नारायण काळे, सुनिल पाटील, सुनिल बुरसे, प्रदिप चासकर,ईश्वर फदाले, मच्छींद्र झांजरे, किसन शिंगाडे या सहकाऱ्यांना सोबत घेऊन जानेवारी २०२५ मध्ये भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.