लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्यावरील खटल्याची आता 'समन्स ट्रायल' सुनावणी होणार!
पुण्यातील विशेष न्यायालयाकडून गांधी यांची मागणी मान्य : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ७ एप्रिल २०२५ :- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्यावरील खटल्याची 'समन्स ट्रायल' सुनावणी घेण्यास पुणे येथील एम.पी. एम.एल.ए. न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी सोमवारी (दि. ७ एप्रिल) राहुल गांधी यांना परवानगी दिली आहे. यामुळे राहुल गांधी यांच्यावरील खटल्याची सुनावणी आता &समन्स ट्रायल' होणार आहे. पुढील सुनावणी येत्या २५ एप्रिल रोजी होणार आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची लंडनमध्ये बदनामी केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पंतू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केलेला आहे. या खटल्याची सुनावणी सध्या चालू आहे. लंडनमध्ये राहूल गांधी यांनी भाषण केले होते. या भाषणात बोलताना गांधी म्हणाले होते, "सावरकरांनी त्यांच्या एका पुस्तकात असे लिहून ठेवलेले आहे की "आम्ही मित्र एकदा जात होतो, तेव्हा काही लोक एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण करीत होते, ते बघून खूप आनंद वाटत होता." पण सावरकरांनी असे कुठल्याच पुस्तकात लिहून ठेवलेले नाही, असे फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे म्हणणे आहे. म्हणून राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केली, म्हणून गांधी यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे. या बदनामीच्या खटल्याची सुनावणी सोमवारी (दि. ७ एप्रिल) पुणे येथील विशेष न्यायालयात पार पडली.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे वकील मिलिंद दत्तात्रेय पवार यांनी राहुल गांधी यांच्यावतीने या खटल्याची सुनावणी 'समरी ट्रायल' ऐवजी 'समन्स ट्रायल' म्हणून घ्यावी, असा अर्ज सोमवारी न्यायालयात दाखल केला होता. हा खटला काही ऐतिहासिक प्रसंगावर व घटनांवर अवलंबून आहे.विनायक दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्य मिळविण्यात किती व कसे योगदान होते. सावरकर यांनी किती पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मुस्लिमांविषयी काय विचार होते. सावरकर यांचे ब्रिटिशांबरोबर संबंध कसे होते, अशा अनेक ऐतिहासिक घटनांवर व त्यासंदर्भात या खटल्यात बचाव पक्षाला उलट तपास घ्यावा लागणार आहे. नैसर्गिक न्यायतत्वाला धरून व कायद्यातील तरतुदींनुसार बचाव पक्षाला खटल्याची सुनावणी व उलट तपासणी विस्तृतपणे घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हा खटल्याची 'समन्स ट्रायल' म्हणून सुनावणी घेणे अनिवार्य असल्याचा युक्तिवाद अॅड. पवार यांनी यावेळी केला.
या खटल्याची सुनावणी 'समरी ट्रायल' म्हणून घेतल्यास बचाव पक्षाला विस्तृत व सखोलपणे साक्षीदारांचा उलटतपास घेता येणार नाही. 'समन्स ट्रायल' म्हणून खटल्याची सुनावणी घेतल्यास बचाव पक्षाला या खटल्यात विस्तृत व सखोलपणे बाजू मांडण्याची, वेळोवेळी आवश्यक ती कागदपत्रे दाखल करण्याची, प्रसंगी सरकारकडून ती मागविण्याची परवानगी मिळू शकते. म्हणून या फौजदारी खटल्याची सुनावणी 'समन्स ट्रायल' म्हणून या न्यायालयात व्हावी, अशी मागणी करणारा अर्ज अॅड. पवार यांनी केला होता.
या अर्जावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर राहुल गांधी यांचा अर्ज व विनंती मान्य केली आहे. त्यामुळे आता येथून पुढे या खटल्याची नियमित सुनावणी 'समन्स ट्रायल' म्हणून होणार आहे.
सर्व कागदपत्रे उपलब्ध करून द्या : अॅड. पवार यांची मागणी
फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात दाखल केलेली सर्व कागदपत्रे, राहूल गांधी यांनी लंडनमधील डायसापोरा या कार्यक्रमात केलेल्या भाषणाची सीडी, वर्तमानपत्रे, पुस्तके, साक्षीदार यांची प्रतिज्ञापत्रे ही सर्व कागदपत्रे आजतागायत बचाव पक्षाला (राहूल गांधी) हस्तांतरित केलेली नाहीत. त्यामुळे पुढील सुनावणी सुरू होण्यापुर्वी ही सर्व कागदपत्रे बचाव पक्षाला हस्तांतरित करण्याचा आदेशही न्यायालयाने फिर्यादींना द्यावा, अशी मागणी करणारा अर्ज अॅड. मिलिंद पवार यांनी विशेष न्यायालयात केला आहे. या अर्जावर विशेष न्यायालयाने फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे लेखी म्हणणे मागितले आहे. या खटल्याची पुढील सुनावणी आता येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे.