यंदाच्या आषाढीवारीवर पंढरपुरात ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची पुण्यात घोषणा 

संयुक्त व्यवस्थापन यंत्रणा तयार ठेवण्याचा सोलापूर झेडपी व पोलिसांना आदेश

यंदाच्या आषाढीवारीवर पंढरपुरात ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची पुण्यात घोषणा 
पुणे :- आषाढीवारी पुर्वतयारी आढावा बैठकीत बोलताना ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ७ एप्रिल २०२५ :-   यंदाच्या आषाढीवारीवर पंढरपूर शहरात ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेली संयुक्त व्यवस्थापन यंत्रणा तयार ठेवा,असा आदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी (दि.७ एप्रिल) पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सोलापूर जिल्हा परिषद आणि पोलिसांना दिला. 

पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी गोरे यांनी आषाढीवारी पूर्वतयारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अतिरिक्त आयुक्त अरुण आनंदकर, उपायुक्त विजय मुळीक, नितीन माने, दत्तात्रेय लांघी आदी उपस्थित होते.सातारा, सोलापूर, नाशिक व जळगाव या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

आषाढीवारी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासह पालखी मार्गावरील रस्ते, पालखीतळ दुरुस्तीसाठीचे प्रस्ताव दोन दिवसांत सादर करा. पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या अडचणीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्याच्या कामांना मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन गोरे यांनी यावेळी दिले.

गोरे पुढे म्हणाले, "प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी, पालखी मार्ग व विसावा स्थानांवर स्वच्छता राखली जाईल, याची विशेष खबरदारी घ्यावी. स्वच्छतेसाठी पुरेशा प्रमाणात फिरती शौचालये आणि अधिक प्रमाणात स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. टँकरमधील पाण्याच्या शुद्धतेबाबत नियमित तपासणी करावी. पाण्याच्या स्रोतांचे शुद्धीकरणही निटपणे होईल याकडे लक्ष द्यावे. पालखी मार्गावरील रेस्टॉरंट, हॉटेल्स यांची स्वच्छता व अन्न शुद्धतेची खात्री करावी. तसेच पंढरपूर शहरातील कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व वाहनांची व्यवस्था करावी." 

विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे वारीसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी, प्रथमोपचार पेट्या, निवारा केंद्र, हिरकणी कक्ष आदी सुविधांसोबत वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यात येणार असल्याचे पुलकुंडवार यांनी यावेळी सांगितले.