महाराष्ट्रात अव्वल ठरलेले ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची खास मुलाखत!

झेडपीच्या कामकाजात ए.आय.चा वापर, डोअर स्टेप डिलेव्हरी, ई-ऑफीस अन् ई-कामवाटपामुळे  मारली राज्यात बाजी! 

महाराष्ट्रात अव्वल ठरलेले ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची खास मुलाखत!
ठाणे:- ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे.

राज्य सरकार‌ आणि भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘कार्यालयीन मूल्यमापन - 100 दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा’ या कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रोहन घुगे यांनी राज्यात अव्वल स्थान पटकावत बाजी मारली आहे. या मोहिमेत घुगे यांनी कोणते नवीन उपक्रम, संकल्पनांची सुरूवात केली, हे जाणून घेण्यासाठी सीईओ रोहन घुगे यांच्याशी 'ग्रामराज्य'ने प्रश्नोत्तरे स्वरुपात केलेली बातचीत. 

- गजेंद्र बडे 

प्रश्न :-  राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात राज्यात सर्वोत्कृष्ट ठरल्याबद्दल प्रथमतः आपले मनःपूर्वक अभिनंदन. या कार्यक्रमागचा राज्य सरकारचा मुख्य उद्देश काय होता.?

- रोहन घुगे  :-  अभिनंदनाबदल आभारी आहे. राज्य सरकारने राज्यातील सर्वच कार्यालयांसाठी १०० दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केला होता, हे आपण सर्वजण जाणून आहातच. या‌ कार्यक्रमांतर्गत सरकारी कार्यालयांचे कामकाज, कार्यक्षमता, पारदर्शकता, जनतेशी संवाद साधणे, जनतेस वेळेवर सेवा देणे आदी विविध घटकांवर आधारित नाविन्यपूर्ण उपक्रम आणि योजना सुरु कराव्यात. जेणेकरून याचा उपयोग हा सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सक्षमीकरणासाठी आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी व्हावा, हाच या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमागचा मुख्य उद्देश आहे. 

प्रश्न :-  आपण मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने या कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्हा परिषदेत कोणकोणते नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत.?

- रोहन घुगे  :-  ठाणे जिल्हा परिषदेत आम्ही दैनंदिन कार्यालयीन कामकाजात आणि शिक्षण, आरोग्य , बांधकाम व कृषी विभागातील विविध विकासकामांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ए. आय. चा (कृत्रीम बुद्धीमत्ता) व चॅट-जीपीटी या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर सुरू केला आहे.याशिवाय डोअर स्टेप डिलेव्हरी (Door step delevery), ई-ऑफीस, स्कीम अॅप्लीकेशन पोर्टल, दिशा, ई. एच. आर. एम. एस. प्रणाली, ब्लॉक फॅसिलेशन कमिटी (Block facilitation committee) ई-कामवाटप, वर्क मॅनेजमेंट सिस्टीम, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी आदी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. वर्क मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून आतापर्यंत ३ हजार ७६५ विकासकामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. या सिस्टीममुळे विकासकामे कोणत्या स्टेजला आहेत, हे समजण्यास मदत होते. 

प्रश्न :-  जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन कामकाजात ए. आय. आणि 'चॅट-जीपीटी'चा वापर नेमका कोठे आणि कसा केला जातो.?

- रोहन घुगे :-  जिल्हा परिषदेमार्फत सरकारी कामकाजासाठी केल्या जाणाऱ्या सरू टिप्पणी,पत्र, नोंदी,  संशोधन याबाबत ए. आय. आणि 'चॅट-जीपीटी'मार्फत मार्गदर्शन घेऊन वेगाने काम करण्यात येत आहे.‌ तसेच ए. आय. तंत्रज्ञानातील नोटबुक, एल. एम. याचा वापर करून सरकारी पुस्तक, अध्यादेश किंवा माहिती असलेले कागदपत्रे अपलोड करुन त्याबाबतचे संक्षिप्त टिप्पणी किंवा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यात येत आहेत. कॅनव्हाचा वापर करून सरकारी कामकाजाचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, 'मायका ॲप'च्या माध्यमाचा वापर करणे, मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी चॅटबॉटचा वापर करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व आपली मानसिक स्थिती याबद्दलची माहिती मिळविली जाते. शिवाय उपचार घेण्यासाठीसुद्धा यांचा फायदा होतो. गामा अॅपचा वापर करून काही मिनिटांत सरकारी कामकाजाचे सादरीकरण करता येते. तसेच शिक्षण व आरोग्याची अॅसेसमेंट करणे, रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता सुधारणे, विद्यार्थी व शिक्षकांची अॅसेसमेंट करणे आदी विविध कामांसाठी  कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत.

प्रश्न:-  ए. आय., चॅट जी.पी.टी. वापराचा काय फायदा होत आहे.? 

- रोहन घुगे :-  ए.आय.तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सरकारी कामकाज अधिक पारदर्शक, उत्तम, गतिमान आणि पेपरलेस करण्यासाठी उपयोग होत आहे.यामुळे कार्यालयातील आणि शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कृषी या विभागातील विविध विकासकामांचा दर्जा सुधारण्यासाठी झाला आहे. यामुळे शिक्षण विभागातील विद्यार्थी व शिक्षकांची अॅसेसमेंट वेळेत पूर्ण होते. आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांचे रोगनिदान करण्यासाठी वापर केला जात आहे. यामुळे बांधकामांचा आणि रस्त्यांच्या कामांचा दर्जा सुधारण्यास फायदा होत आहे. सरकारी अधिकारी व  कर्मचाऱ्यांना कामकाजाचा तुलनात्मक तक्ता जसे एक्सेल शीट (excel Sheet) पावर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी केला जात आहे. या सर्व ॲपचा वापर करून सरकारी कामकाजात कशाप्रकारे गतिमानता येऊ शकते, याबाबत अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. 

 प्रश्न :-  डोअर स्टेप डिलेव्हरी हा उपक्रम काय आहे? याची अंमलबजावणी कशी केली जाते.?

- रोहन घुगे :-  ठाणे जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्रातील नागरिकांना हवी असलेली सर्व सरकारी कागदपत्रे ग्रामस्थांना त्यांच्या दारापर्यंत पोहचविण्यासाठी 'Door Step Delivery' हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम ठाणे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमध्ये कार्यान्वित करण्यात आला असून, गेल्या २० दिवसांत ३ हजारांहून अधिक नागरिकांनी घरबसल्या सरकारी कागदपत्रे मिळविली आहेत. या उपक्रमांतर्गत नागरिकांना हव्या असलेल्या दाखल्याची (प्रमाणपत्र) त्यांना घरबसल्या नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. नोंदणी केलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन 'आपले सरकार'चे कर्मचारी संबंधित व्यक्तीची आवश्यक कागदपत्रे अपलोड करतात आणि त्यांच्या मागणीनुसार तयार झालेले प्रमाणपत्र संबंधित नागरिकांना घरी जाऊन देण्यात येते. 

प्रश्न:-  दिशा उपक्रमाचा अवलंब नेमका कशासाठी केला जात आहे, हे सांगू शकाल का.?

- रोहन घुगे :-  महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी दिशा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक अॅसेसमेंट केले जाते. विद्यार्थ्यांसाठी पर्सनल लर्निग इंप्रूव्हमेंट प्लॅन तयार केला आहे. यानुसार आतापर्यंत सुमारे ३१लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत.शिवाय पर्यवेक्षणासाठी १८० लोकांची टीम तयार केली आहे. या टीमने आतापर्यंत १० हजारांहून अधिक शाळांना भेटी दिल्या आहेत. यातून मिळणाऱ्या बेटाच्या आधारे धोरण आखले जाते. ठाणे जिल्हा परिषदेचा हा उपक्रम राज्य पातळीवर निपूण महाराष्ट्र या नावाने राज्य सरकारने सुरू केला आहे. शिवाय राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्यापुढेही यांचे सादरीकरण करण्यात आले आहे. गेल्या १०  महिन्यांच्या कालखंडात भाषा आणि गणित या विषयाचा अध्ययन स्तर दुप्पटीपेक्षा जास्त वाढविण्यात यश आले आहे. या उपक्रमाची दखल राज्य स्तरावर घेऊन निपूण महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.  

प्रश्न :-  ई ऑफिस‌ ही संकल्पना काय आहे.? 

- रोहन घुगे :-  या उपक्रमांतर्गत कार्यालयातील दप्तर दिरंगाई टाळण्यासाठी जिल्हा परिषदेंतर्गत ई- ऑफिसमार्फत सर्व फाईल्स व टपाल हे डिजिटल फाईल मोमेंट करण्यात येत आहे. यानुसार फाईल मंजुरीचे टप्पे दहावरुन कमी करुन चार करण्यात आले आहेत. यामुळे  प्रत्येक नस्ती (फाईल्)  सात दिवसांमध्ये निपटारा करण्याचे प्रयत्न असून कागद विरहित कामकाज करण्यात ठाणे जिल्हा परिषद पुढाकार घेत आहे.

प्रश्न :-  स्कीम अॅप्लीकेशन पोर्टलचा उपयोग कोठे आणि कसा केला जातो.? 

- रोहन घुगे :- जिल्हा परिषदेच्या सर्व योजनांची माहिती, उद्देश, अर्ज भरण्याच्या पद्धती याची सविस्तर माहिती या संकेतस्थळावर (वेब पोर्टल) उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पोर्टलचा वापर करून इच्छुक लाभार्थी हे डिजिटल पद्धतीने अर्ज  करू शकतात.

 प्रश्न :-  ब्लॉक फॅसिलेशन कमिटी स्थापन करण्यामागचा उद्देश काय आहे.? या समितीचे कार्य काय आहे.?

- रोहन घुगे :-  ब्लॉक फॅसिलेशन कमिटी (Block Facilitation Committee) ही सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी व अडचणी जाणून घेऊन, या तक्रारींची  शासकीय यंत्रणेकडून ताबडतोब सोडवणूक करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केले जाते. शिवाय तक्रारीच येऊ नयेत आणि प्राप्त तक्रारींची सोडवणूक करणे, अशा पद्धतीने काम केले जाते. या उपक्रमांतर्गत २ हजार ५०० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यासाठीची प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हा स्तरावरावरील अधिकारी पंचायत समिती स्तरावर जाऊन तालुका सुविधा समिती योजनेंतर्गत (Block Facilitation Committee) ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करत आहेत. 

प्रश्न :-  ई काम वाटप म्हणजे काय? 

- रोहन घुगे :-  ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड देऊन विकासकामांचे वाटप हे लॉटरी पद्धतीने  करण्यात आले आहे. तसेच या समितीमार्फत काम वाटप आणि आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे करण्याच्या उद्देशाने कामकाज करण्यात येत आहे. 

प्रश्न :-  ई. एच. आर. एम. एस. संकेतस्थळ कशासाठी कार्यान्वित करण्यात आले आहे. ?

- रोहन घुगे :-  ई. एच. आर. एम. एस. या संकेतस्थळाच्या (वेबसाईट) माध्यमातून जिल्हा परिषदेच्या पाच हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक डिजिटल पद्धतीने संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याचा उपयोग सेवाविषयक सर्व बाबी व लाभ वेळेत देण्यासाठी करण्यात येणार आहे.

प्रश्न :-  याशिवाय आणखी काही उपक्रम सुरू केले आहेत काय?

- रोहन घुगे :-  होय. सुरू केले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद मुख्यालय इमारतीचे सुशोभीकरण,स्वच्छता,अभिलेख वर्गीकरण, अभ्यागत कक्ष, हिरकणी कक्ष, नागरिकांना जिल्हा परिषदेची माहिती मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेत केऑस निर्मिती, जिल्हा परिषदेच्या विविध योजनेची व विभागनिहाय कामकाजाचे व ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या ठिकाणांना जिवंत ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या इमारतीत रंगरंगोटी करण्यात आली आहे.

 प्रश्न:-  या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे जिल्हा परिषदेच्या कामकाज काय बदल झाले आहेत काय.? 

- रोहन घुगे :-  होय, झाले आहेत. जिल्हा परिषद  प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजात गुणात्मक सुधारणा झाली आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासन अधिक गतीमान, पारदर्शक आणि नागरिककेंद्रित झाले आहे. नागरिकांना अधिक सुलभपणे सोईसुविधा उपलब्ध होऊन प्रशासन लोकाभिमुख झाले आहे. हे काम आमच्यासुद्धा दिशादर्शक ठरले आहे. शिवाय यामुळे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. 

प्रश्न :-  आपल्या या यशाचे श्रेय आपल्याशिवाय आणखी कोणाला देऊ शकाल. ?

- रोहन घुगे :-  या यशाचे खरे श्रेय ठाणे जिल्हा परिषदेच्य प्रत्येक अधिकाऱ्याचे व कर्मचाऱ्याचे आहे. वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना अपेक्षित लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक प्रशासन तयार करण्यासाठी त्या १०० दिवसांमध्ये विशेष प्रयत्न करण्यात आले. यापुढेही अशाच प्रकारे  काम अविरत सुरू राहील व नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषद सदैव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही देतो.