ठाणे झेडपीचे सिईओ घुगे राज्यात तर, पुणे झेडपीचे सिईओ पाटील पुणे विभागात 'अव्वल'!

राज्य सरकारचे सर्वोत्कृष्ट अधिकारी पुरस्कार जाहीर :  जळगांवचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद राज्यात तृतीय

ठाणे झेडपीचे सिईओ घुगे राज्यात तर, पुणे झेडपीचे सिईओ पाटील पुणे विभागात 'अव्वल'!
पुणे :- छायाचित्रे अनुक्रमे जळगांवचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील.

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १ मे २०२५ :- राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात राज्यातील ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सिईओ) रोहन घुगे हे राज्यात सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले आहेत. या कार्यक्रमाच्या मूल्यांकनात घुगे यांनी १०० पैकी तब्बल ९२ गुण मिळवत राज्यात 'अव्वल' स्थान पटकावले आहे. दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जळगांवचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी संवर्गातून राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.

या मूल्यांकनात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ७५.४३ गुण मिळवत राज्यात तृतीय तर, पुणे विभागात 'अव्वल' स्थान पटकावले आहे. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी राज्यात दुसरे तर, अनुक्रमे पुणे व नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मित्तल यांनी प्रत्येकी ७५.४३ असे एकसमान गुण मिळवत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. 

राज्य सरकारने राज्यातील सर्व विभागांसाठी राज्यात १०० दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमात कार्यालयीन सुधारणांवर भर देण्यात आला होता. या कार्यक्रमातील कामगिरीचे भारतीय गुणवत्ता परिषदेच्या वतीने (Quality Council of India) नुकतेच अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यांकनात विभाग आणि कार्यालयनिहाय गुणानुक्रमे पहिल्या पाच सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या १०० दिवसांच्या कार्यक्रमात संकेतस्थळ (वेबसाईट) सुधारणा, कार्यालयीन सोयी-सुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर आदी प्रमुख मुद्द्यांसह विविध १० मुद्यांवर भर देण्यात आला होता.

महाराष्ट्र दिनानिमित्त दि. १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा निकाल एक्स या सामाजिक माध्यमाद्वारे जाहीर केला आहे. या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे. या अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अधिकाऱ्यांचे 'एक्स'वरून कौतुक केले आहे. 

राज्यातील सर्वोत्कृष्ट पाच झेडपी 'सिईओ' 

- श्री. रोहन घुगे (९२ गुण, प्रथम) --- ठाणे जिल्हा परिषद.

- श्री. विनायक महामुनी (७९.४३ गुण, द्वितीय) --- नागपूर जिल्हा परिषद 

- श्री. गजानन पाटील  (७५.४३ गुण, तृतीय व पुणे विभागात प्रथम) ---- पुणे जिल्हा परिषद 

- श्रीमती अशिमा मित्तल ( ७५.४३ गुण, तृतीय) ---- नाशिक जिल्हा परिषद.

श्री. वैभव वाघमारे (७२ गुण, चतुर्थ क्रमांक) ---- वाशीम जिल्हा परिषद 

राज्यातील सर्वोत्कृष्ट पाच जिल्हाधिकारी 

- श्री. विनय गौडा (८४.२९ गुण, राज्यात प्रथम) --- जिल्हाधिकारी चंद्रपूर.

- श्री. अमोल येडगे (८१.१४, द्वितीय ) ---- जिल्हाधिकारी कोल्हापूर.

- श्री. आयुष प्रसाद (८०.८६, तृतीय) --- जिल्हाधिकारी जळगाव.

- श्री. अजित कुंभार (७८.८६, चतुर्थ क्रमांक) ---- जिल्हाधिकारी, अकोला. 

- श्री. राहूल कर्डिले (६६.८६, पाचवा क्रमांक), जिल्हाधिकारी, नांदेड 

हे माझे एकट्याचे यश नसून पुणे जिल्हा परिषदेतील सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी अशा सर्व टीमचे यश आहे. राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत आणि आपण आता हे उपक्रम आणि योजना केवळ या उपक्रमापुरत्या मर्यादित न ठेवता यापुढेही सातत्याने चालू ठेवणार आहोत. 

- गजानन पाटील, 
मुख्य कार्यकारी अधिकारी, 
जिल्हा परिषद, पुणे

राज्याच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यात सुशासन व गतिमान आणि चुकमुक्त प्रशासन करण्यावर अधिक भर दिला. यामुळे नागरिकांना वेळेत व योग्य माहिती उपलब्ध करून तक्रारमुक्त प्रशासनाकडे वाटचाल सुरू केली. यामुळे जळगाव जिल्ह्यातील महसूल विभागातील प्रलंबित केसेसची संख्या जवळपास ५० टक्क्यांनी  कमी झाली. लोकांना सहज व सुलभपणे मिळाली की आपोआपच तक्रारी कमी होतात. या अनुषंगाने काम केले. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास फायदा झाला. हे पारितोषिक म्हणजे महसूल विभागातील  प्रशासकीय कामकाजामधील जटील  प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मिळालेली पावती आहे. 

- आयुष प्रसाद 
जिल्हाधिकारी, जळगाव

सर्वोत्कृष्ट पाच मंत्रालयीन विभाग 

- महिला व बालविकास (प्रथम) .

- सार्वजनिक बांधकाम विभाग (द्वितीय)

- कृषी विभाग (तृतीय)

- ग्रामविकास विभाग (चतुर्थ)

- परिवहन व बंदरे विभाग (पाचवा) 

राज्यातील सर्वोत्कृष्ट ठरलेले विभाग व कार्यालयनिहाय संख्या पुढीलप्रमाणे 

- मंत्रालयीन विभागांचे सचिव --- ०५

- मंत्रालयीन विभागांचे आयुक्त ---०५

- जिल्हाधिकारी --- ०५ 

- पोलिस अधीक्षक --- ०५

- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी --- ०५ 

- महापालिका आयुक्त --- ०४

- पोलिस आयुक्त ---०३ 

- विभागीय आयुक्त ---०२ 

- पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक ---०२