कोंढव्यातील विजेचा लपंडाव थांबवा, ग्रामस्थांचे महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन 

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन : सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी

कोंढव्यातील विजेचा लपंडाव थांबवा, ग्रामस्थांचे महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन 
पुणे:- नियमित विजपुरवठ्याच्या मागणीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करताना कोंढवा बुद्रुक येथील ग्रामस्थ.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २७ मे २०२५ :-   कोंढवा बुद्रुकमधील वीजेचा पुरवठा वारंवार खंडित होणे आणि अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.२७ मे) कोंढवा येथील ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या ठिय्या आंदोलनात ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. ठिय्या आंदोलनानंतर जालींदर कामठे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरण कंपनीचे अभियंता श्रीकांत अवचार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

कोंढवा बुद्रुक गावठाणात  मागील काही  दिवसांपासून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. वीज पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने अनेक नागरिकांची महत्वाची कामे रेंगाळत असून विजेच्या लंपडावामुळे घरातील विद्युत उपकरणांचे  देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याशिवाय कोंढवा बुद्रुक येथील वीज पुरवठा कार्यालयाकडून नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेणे, नागरिकांचे फोन न उचलणे नागरीकांशी उद्धट बोलणे आदी गंभीर प्रकार घडत आहेत. हे सर्व प्रकार त्वरीत थांबले पाहिजेत आणि विजेचा पुरवठा हा सुरळीत व नियमित झाला पाहिजे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. वीज बिल न भरल्यास लगेचच वीज पुरवठा खंडित करावयाची कार्यवाही केली जाते. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीतपणे करणे ही महावितरण कार्यालयाची जबाबदारी असून त्याची कार्यवाही महावितरण कार्यालाकडून होत नसल्याचे कोंढवा बुद्रुक येथील  नागरिकांच्या लक्षात आले आहे. यावर आपण लवकरात लवकर मार्ग काढावा आणि कोंढवा बुद्रुक गावचा  वीज पुरवठा व्यवस्थित करावा,  अन्यथा महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

दरम्यान, येत्या ५ दिवसांत  कोंढवा बुद्रुक परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची व्यवस्था करण्यात येईल असे लेखी आश्वासन श्रीकांत अवचार यांनी यावेळी कोंढवा बुद्रुक ग्रामस्थांन दिले.या आंदोलनात गणेश कामठे, रोहन कामठे, सुखदेव लोणकर, बैजू वाघ, विनायक कामठे,अमित जगताप, राहुल कामठे, अमित कामठे, चिंतामणी जगताप, सुनील दळवी, भरत पांगारे, अभिषेक तीरकुंडे, आकाश कांबळे, किरण शिंदे, तात्या कामठे, स्वप्निल कामठे,बापू वाळुंजकर, राजू मरळ, कालिदास जगताप, माणिक जगताप, सोमनाथ कामठे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.