लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांचा जामीन रद्द करा, सात्यकी सावरकर यांच्या वकिलांची न्यायालयाकडे मागणी
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी खटला : येत्या २८ मे रोजी गांधींचे वकील अॅड. मिलिंद पवार बाजू मांडणार

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १० मे २०२५ :- लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्याच्या सुनावणीला काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे न्यायालयात वारंवार तारखा मागत असल्याने, त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी सात्यकी सावरकर यांचे वकील अॅड. संग्राम कोलाटकर यांनी शुक्रवारी (दि. ९) न्यायालयात केली.
खासदार राहुल गांधी हे सातत्याने जामिनाच्या अटींचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे गांधी यांचा मुचलका जप्त करण्यात यावा आणि राहुल गांधी हे पुढील तारखेला न्यायालयात हजर राहतील, हे सुनिश्चित करावे, असेही सावरकर यांच्या वकिलांनी न्यायालयात सादर केलेल्या अर्जात नमूद केले आहे. गांधी आपली याचिका नोंदविण्यास (प्ली रेकॉर्डिंग) जाणूनबुजून टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे खटल्याच्या सुनावणीत अडथळा निर्माण होत आहेत.
खासदार गांधी हे या खटल्याच्या सुनावणीला स्थगिती मागणार नाहीत आणि या खटल्याच्या प्रत्येक तारखेला राहुल यांचे वकील हजर राहतील, या अटींवर न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला होता. त्या विरोधात सात्यकी सावरकर यांच्या वकीलांनी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद दत्तात्रेय पवार हे येत्या २८ मे २०२५ रोजी गांधी यांची बाजू मांडणार आहेत.
सात्यकी सावरकर यांचे वकील अॅड संग्राम कोलाटकर यांनी मागील तारखेला सावरकर यांच्या पुस्तकांसह भाषणाचा पेन ड्राइव्ह गांधी यांचे वकील अॅड मिलिंद पवार यांच्याकडे सुपूर्त केला आहे. राहुल गांधी यांच्या वकिलांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित ‘माझी जन्मठेप’ व ‘हिंदुत्व’ या पुस्तकांचे इंग्रजी व मराठी भाषांतर, राहुल गांधी यांचे वादग्रस्त भाषण असलेला पेन ड्राइव्ह न्यायालयात मागितला होता. या खटल्याची पुढील सुनावणी आता येत्या २८ मे रोजी होणार आहे.