भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व, भाजप नेते जालींदर कामठे
वसंतदादा प्रतिष्ठानतर्फे कोंढवा बुद्रुक व हिवरे येथील शाळेत बाबासाहेबांना जयंतीनिमित्त अभिवादन

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १४ एप्रिल २०२५ :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे म्हणजे अर्थशास्त्रज्ञ, विचारवंत, संशोधक, पत्रकार, राजकारणी आणि समाजसुधारक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालींदर कामठे यांनी सोमवारी (दि.१४ एप्रिल) यांनी येथे केले.
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या हिवरे (ता. पुरंदर) येथील गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी तेे बोलत होते. यावेळी हिवरे गावच्या सरपंच पूनम कामठे, उपसरपंच रामदास कुदळे,सागर कुदळे, गुलाब गायकवाड, सुदर्शन कुदळे, शब्बीर शेख, रमेश कुदळे, दीपक गायकवाड, नंदू गायकवाड, शंकर कुदळे, संतोष गायकवाड, मुख्याध्यापिका सुनीता रायडू, रोहिणी गायकवाड, संजय शेडगे, चंद्रशेखर गुरव, दत्तात्रय गायकवाड, विकास भोसले, वैशाली पवार, मेघा गायकवाड, स्मिता बोराटे, स्वाती बोरकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, जालिंदर कामठे यांनी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या कोंढवा बुद्रुक येथील प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेस वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना जालींदर कामठे म्हणाले, "महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३४ वी जयंती आहे. बाबासाहेबांनी केवळ इतिहास घडवला नाही, तर हजारो वर्षांचा अन्याय, अज्ञान आणि अस्पृश्यतेतून अनेक पिढ्यांना आपल्या ज्ञानप्रकाशाने अंधारातून बाहेर काढले. भारताच्या संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक,अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, लेखक, तत्वज्ञ आणि दलित, वंचित, शोषितांच्या हक्कांचा बुलंद आवाज असलेल्या बाबासाहेबांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या त्रिसूत्रीचा आजही प्रत्येक पिढीवर प्रभाव आहे."
स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हेच आपल्या प्रगतीचे खरे शस्त्र आहेत. आज बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आपल्याला त्यांच्या विचारांची आठवण ठेवून ते विचार कृतीत आणण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेब हे केवळ एका वर्गाचे नाहीत, ते संपूर्ण मानवतेचे प्रेरणास्थान आहेत. बाबासाहेबांनी संपूर्ण मानव समाजासाठी, सर्व भारतीयांसाठी मूलभूत आणि महत्वपूर्ण काम केलेले असल्याचे कामठे यांनी यावेळी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना आपण सर्वजण एकजूट होऊन समतेच्या, न्यायाच्या आणि शिक्षणाच्या दिशेने बाबासाहेबांच्या स्वप्नांची पूर्तता करू या. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय अस्तित्वासाठी बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाऊ या. जिथे समता आहे, तिथेच खरे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले मूलभूत हक्क आणि अधिकार जपू या, जागरूकपणे आपल्या कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव ठेवू या, असे आवाहन जालिंदर कामठे यांनी यावेळी बोलताना केले.
या समारंभाला भाऊसाहेब जगताप, मुख्याध्यापिका सुरेखा कोलते, पर्यवेक्षक हेमंत जाधव, संदीप खिरीड संभाजी साबळे, सुधीर कबाडी, प्रतिमा केदार, वैशाली सोमवंशी, पुष्पा झेंडे, नीता शिंदे, शारदा गायकवाड,विकास मोरे, सुनील काकडे आणि प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.