... आता स्वप्नांच्या पुर्ततेसाठी आतापासूनच नियोजन व प्रयत्न करा!
संस्थेचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांचा दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सल्ला : कोरेगाव भीवरमधील गुणवंतांचा सत्कार

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २८ मे २०२५ :- दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामागे त्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे पाठबळ आणि शाळेचे योगदान महत्त्वाचे असते. मात्र दहावीतील यशानंतर करिअर निवडीचा टप्पा असतो. करिअरची स्वप्ने मोठी जरूर असावीत, पण त्यासाठी योग्य नियोजन आणि सतत प्रयत्न गरजेचे आहे, असा सल्ला वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी दहावीत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना दिला.
दौंड तालुक्यातील कोरेगाव भीवर येथील शहिद सोनू भिका वर्पे माध्यमिक विद्यालयातील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कामठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कामठे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनावणे यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य कांतीलाल काळे, दौंड मार्केट कमिटीचे माजी सभापती मारुती मगर, माजी उपसरपंच सोमनाथ काळे, प्रगतीशील शेतकरी बापूराव कदम, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर गद्रे, संपत कंद, राजेंद्र कदमबांडे, दत्तात्रेय शिंदे, अशोक वर्पे, पांडुरंग मांजरे, पोलिस पाटील बाळासाहेब मांजरे, मुख्याध्यापक नंदकुमार पांडे आदी उपस्थित उपस्थित होते .
या समारंभात या माध्यमिक विद्यालयातील गुणानुक्रमे पहिल्या पाच विद्यार्थ्यांचा कामठे यांच्या हस्ते रोख रक्कम व शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्नेहा गणेश वर्पे, समृद्धी पांडुरंग मांजरे, श्रावणी सुरेश गाढवे, सायली भाऊसाहेब गाढवे आणि सानिका संतोषकुमार काळे यांचा समावेश आहे. स्नेहा गणेश वर्पे या विद्यार्थिनीने ९७.४० टक्के गुण मिळवत दौंड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.