डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी धोरणकर्ते, शासनकर्ते बना!
ज्येष्ठ निवृत्त अधिकारी यशवंत मानखेडकर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला : नांदेड सिटीत १३४ व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १८ एप्रिल २०२५ :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच समाजातील दुर्लक्षित, वंचित, पिडीत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करण्यावर अधिक भर दिला. यातून बाबासाहेब हे मानवतावादी होते, हे दिसून येते. समाजातील अतिमागास व दुर्बल घटक हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. हे स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ' हा नारा दिला. यानुसार डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही उच्चशिक्षित व्हा, धोरणकर्ते आणि शासनकर्ते व्हा आणि समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला केंद्रीय खेल व क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या नेहरू युवा केंद्राचे निवृत्त उपसंचालक यशवंत मानखेडकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना दिला.
पुणे शहरातील नांदेड सिटीतील जनरंजनी सोसायटीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या तीन महापुरुषांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. यावेळी या तीनही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मानखेडकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या समारंभाला सचिन खानापुरे,विजय चव्हाण, युवराज सावंत,शेखर शिंदे यांच्यासह सोसायटीचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. मानखेडकर पुढे म्हणाले, "डॉ. आंबेडकर यांचे योगदान हे सूर्यकिरणांसारखे सर्वदूर पसरलेले आहे. जे सामाजिक समतेच्या मुळाशी खोलवर रुजले आहे. त्यांचे कायद्यावरील प्रभुत्व व अर्थशास्त्रातील सखोल चिंतनाने देशाच्या प्रगतीला मोठी दिशा दिली. स्त्री-मुक्ती आणि कामगार हक्कांसाठीचा त्यांचा लढा आजही प्रेरणा देतो. बाबासाहेबांचे विचार हे केवळ काळाच्या सीमांना भेदणारे नव्हते, तर ते प्रत्येक हृदयात परिवर्तनाची ठिणगी पाडणारे होते, ज्यांनी भारताच्या भवितव्यास नवी उजळ दृष्टी दिली. शिव-फुले-शाहू-आंबेडकर आदी सर्व महापुरुषांचे मानवतावादी विचार आत्मसात करा. महापुरुषांच्या विचारांचा जागर करतानाच आपण समाजाला विधायक स्वरूपाचे योगदान कसे देऊ शकतो, यासाठी बहुजन समाजातील प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत."
या कार्यक्रमात म्यानमार आणि थायलंडमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बाबासाहेबांचे स्वप्न साकारण्यासाठी हे करा : मानखेडकर
- काटेकोर आर्थिक नियोजन करायला शिका.
- पैशांची बचत करून, त्यातून चांगल्या संस्थांची निर्मिती करण्यावर भर द्या.
- शिक्षण संस्था, ग्रंथालये,अभ्यासिका निर्माण करा.
- स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन वर्ग सुरू करा.
- बहुजन समाजातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मदत करा.
- आपल्या अर्थिक संस्था निर्माण करा.
- शिक्षण संस्थांची निर्मिती आणि सध्या अस्तित्वात असलेल्या संस्थांचे बळकटीकरण करा.
- विधायक उपक्रम सुरु करा.
- वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करुन शासनकर्ती जमात निर्माण करण्यासाठी होतकरु आणि हुशार मुलांना मार्गदर्शन करा.
- धम्म विचार हा मानवी विकासासाठी एक उत्तम जीवनशैली आहे. त्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी नेटवर्क तयार करा.
- विहार दत्तक घ्या आणि विहारात अभ्यास चळवळ सुरु करा.
- स्वकमाईतील २० टक्के हिसा हा समाज विकासाठी दान करा.
- सामान्य आर्थिक परिस्थिती असणारे आणि बहुजन समाजातील अर्थिक दुर्बल मुला-ना,मुलींना शिक्षणासाठी दत्तक घ्या.