पुढाऱ्यांच्या मागे रात्रंदिवस पळणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचं डोळ्यात अंजन घालणारं जळजळीत 'पत्र'
एखाद्या नेत्याचा डावा, उजवा हात,निकटवर्तीय, सावली अशी विशेषणे असलेल्या कार्यकर्त्यांच्या मदतीला कोणी नेता येतो का?

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ७ एप्रिल २०२५ :- पुणे शहरातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका आमदारांचा खासगी स्वीय सहायकांच्या (पी.ए.) गर्भवती पत्नीचा मृत्यू झाला. हा मृत्यू केवळ या रुग्णालयाच्या अड्डेलतट्टू भूमिकेमुळे झाला, हे वास्तव नाकारता येत नाही. पण या मृत्यूमुळे झालेल्या वेदना आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवनातील कटू वास्तव समोर आले आहे. हे कटू वास्तव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात मांडले आहे. त्यांचे हे पत्र जसेच्या तसे 'ग्रामराज्य'च्या वाचकांसाठी आम्ही प्रसिद्ध करत आहोत.
प्रिय , कार्यकर्ता दादा / ताई
गेल्या दोन-तीन दिवसांपासून आपल्यासाठी लिहावं बोलावं, असं फार आतून वाटत आहे. पोटात खोलवर खड्डा पडल्यासारखं वाटतंय. दोन - तीन वेळा तर, लिहून पुन्हा सगळं खोडून टाकावं असं वाटलं...! पण हे लिहिलं पाहिजे, बोलल पाहिजे. काल- परवा सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा हिने जीव गमावला. मातृत्वाची अनिवार्य ओढ ही दुःखद करुण कथेमध्ये विसावली.रुग्णालय प्रशासनावर काही कारवाई होईल का, यावर शंकाच आहे.
या रुग्णालयाने कमालीची असंवेदनशीलता दाखवली. सरकारही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सहायता कक्ष यांचा भोंगळ कारभार उघडा पडला. नेमलेले आयोग, समित्या यासुद्धा चहा-बिस्किटांपुरत्या अशा सिमित राहतील. आजवरच्या कुठल्याही आयोग किंवा समितीने सरकारी यंत्रणेला दोषी धरलेलं नाही किंवा तसा अहवाल दिला तरी संबंधितांवर कारवाई झालेली नाही.
अजून आठ-पंधरा दिवसांत रुग्णालय प्रशासन आणि सरकारचे लागेबांधे यामध्ये मानवी जीवाचा कोलाहल विरून जाईल. असंवेदनशीलता, हलगर्जीपणा, दप्तर दिरंगाई, दवाखान्यांचे कत्तलखान्यातले रूपांतर याही चर्चा हळूहळू मागे पडतील.
पण तरीही एक प्रश्न अनुत्तरित राहील.तो म्हणजे मुळात हा जीव का गेला. दहा लाख रुपये जर ,या कुटूंबाकडे असते तर, हा जीव वाचला असता का ? ज्या देशाचे पंतप्रधान ऑन रेकॉर्ड सांगतात की, ८० कोटी जनता रेशनिंगचे धान्य खाते. अशा रेशनिंगचा धान्य खाणाऱ्या जनतेला एका प्रसुतीसाठी १० ते २० लाख रुपये दवाखान्यात भरणे शक्य आहे का?
सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा स्विय सहाय्यक असणाऱ्या माणसाची ही आर्थिक विपन्नावस्था का व्हावी ? सुशांत भिसे यांची पत्नी तनिषाचा मृत्यू हे एक निमित्त आहे. पण यानिमित्ताने संपूर्ण कार्यकर्ता जमातीला एक धडा शिकण्याची गरज आहे. कुठल्याही पुढाऱ्याच्या मागे कार्यकर्ता दिवस-रात्र पळत असतो.नेत्यासाठी आपल्या कुटूंबाची पर्वा करत नाही.आपली बायका-मुलं रस्त्यावर येतील का?, त्यांच्या काही दैनंदिन गरजा आहेत का? आरोग्य, शिक्षण,अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता झाली आहे का?, याचाही विचार न करता कार्यकर्ता पुढार्यांच्या मागे उर फुटेस्तोर धावत राहतो. त्याच्या या धावण्याची किंमत नेता बनवणाऱ्या कंपन्या किंवा संबंधिताला खरंच असते का?
खरंच एखाद्या आमदाराच्या घरातल्या स्त्रीला अशा आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली असती तर, आमदार कुठल्यातरी योजनेमध्ये बसवता येते का किंवा अजून कुणाकडून फोन करता येतील का,यासाठी धडपडत राहिले असते की, रुग्णालय प्रशासनाला पुन्हा कधीतरी धडा शिकवता येईल की आता आपल्या घरातल्या स्त्रीचा जीव वाचविणे गरजेचे आहे, याचा विचार केला असता...!
मला जर, माझ्या कार्यकर्त्याला जो माझ्यासाठी २४/७ त्याच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून पूर्णवेळ काम करत असेल आणि त्याच्या कुटुंबाप्रति माझ्या जबाबदारीचे मला भान नसेल तर, थू आहे, माझ्या पुढारी असण्यावर. सोलापूरच्या निर्मला यादव भाजपच्याच एका विंगमध्ये काम करायच्या. मात्र, आज त्यांची अवस्था मृत्यूपेक्षाही भयंकर होण्याला कोण कारणीभूत आहे? ज्या पक्षासाठी दिवस-रात्र जीव झिजवला. ती लोकं मदतीला पुढे का आली नाहीत? संतोष देशमुख भाजपचे बूथप्रमुख होते. त्यांच्या हत्येशी संबंधित सगळे पुरावे गृहखात्याच्या हाताशी असतानासुद्धा गृहखात्याने ते पुरावे राजकीय अजेंडा राबवण्यासाठी तीन महिने दडवून ठेवले आणि मराठा आणि ओबीसी तणाव वाढवला. म्हणजे कार्यकर्त्यांच्या जीवापेक्षा राजकीय अजेंडा महत्त्वाचा वाटला.
मी उदगीरमध्ये नोकरी करत होते. तेव्हा पन्नाशीच्या पुढचे दोन- तीन जेष्ठ कार्यकर्ते नित्यनियमाने येता -जाता बसस्टॅंडवर भेटायचे.कधी- कधी चहा व्हायचा. मग ते गप्पांमध्ये बोलायचे. अमक्याला आमदार कुणी केलं, आम्ही केलं...!तमक्या विधान परिषदेवर कुणामुळे गेला, तर आमच्यामुळे...! मला फार आश्चर्य वाटायचं.एवढ्या लोकांना आमदार करणारी ही माणसं अशी हिनदीन अवस्थेत का दिसत असतील. एखाद्या नेत्यासोबत त्याचा कार्यकर्ता किंवा हरकाम्या म्हणून रेल्वेने जनरल डब्यात प्रवास करत मुंबईला निघायचं. शबनममध्ये एखादा स्टार्च करून ठेवलेला ड्रेस. रेल्वेतून उतरलं की कुठल्यातरी सुलभ शौचालयमध्ये फ्रेश व्हायचं. स्टार्चचे कपडे घालायचे.दिवसभर त्या नेत्याची बॅग घेऊन किंवा त्याचे वेगवेगळ्या पोजमधले फोटो काढत त्याच्या मागे फिरायचं. संध्याकाळी पुन्हा सुलभ शौचालय गाठायचं स्टार्चचे कपडे पिशवीत ठेवायचे.चूरगळलेला ड्रेस अंगावर घालायचा. रेल्वेत बसण्याआधी इंग्रजी पेपर घ्यायचा. इंग्रजीच का तर, याच्यात पाने जास्त असतात.समजा रेल्वेत जागा नाहीच मिळाली तर, खाली अंथरायची सोय पेपरमुळे होईल. हे वाचायला कडवट आहे, वाईट आहे, पण सत्य आहे. जगाला साम्यवादाचे तत्त्वज्ञान सांगणारा मार्क्सचासुद्धा अत्यंत हलाखीच्या अवस्थेत शेवट झाला. त्याच्या पश्चात त्याचे पुस्तक फ्रेडरिक एंजल्स या त्याच्या मित्राने प्रकाशित केले.
एखाद्या नेत्याचा लेफ्ट हॅॅंड (डावा हात), राईट हॅंड (उजवा हात), निकटवर्तीय, सावली, अशी विशेषणे लाऊन फिरणारा कार्यकर्ता. खरंच या कार्यकर्त्याच्या संकटकाळात त्याच्या मदतीला कोणी नेता येतो का ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "जोपर्यंत आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीची दरी संपत नाही, तोपर्यंत राजकीय लोकशाही प्रकल्भ होत नाही."नेत्याने नुसता पाठीवर हात टाकला की, फुरफुरणारे कार्यकर्ते, नेत्यांनी आपल्याला चार-चौघात ओळखीच्या आवाजाने हाक मारल्याने हरखून जाणारे, नेत्यासाठी सोशल मीडियात बाजू मांडून स्वतःवर केसेस ओढवून घेणारे दादाहो, हे सगळं करण्याच्याआधी तुमच्या कुटूंबाचा विचार करा. कारण तुमच्या आपत्कालीनस्थितीमध्ये तुमच्या कुटूंबाशिवाय दुसरे कोणीही तुमच्यासोबत असणार नाही, याचं भान असू द्या. नेत्याच्या सांगण्यावरून माथी भडकाऊन दंगलींमध्ये सामील होणारे उद्या कोर्टकचेऱ्यांमध्ये जमानतीसाठी कागदपत्रांची जमवाजमव करायला तुमच्या घरातली वृद्ध आई, १० ते ५ या वेळेत शिफ्ट असणारा आणि काबाडकष्ट करणारा भाऊ, तुम्ही तुरुंगात गेलातचं तर, धुणीभांडी करून तुमच्या चिल्या-पिल्यांना सांभाळणारी तुमची बायको, याच्याशिवाय दुसरा कोणीही मदतीला येणार नाही. तेव्हा या मृगजळाच्यामागे धावण्यापेक्षा आपले अर्थकारण सक्षम करण्याकडे लक्ष देणे केव्हाही अधिक चांगले.
छत्रपती शिवराय एखादा गड-किल्ला आधी स्वतः चढण्यासाठी सज्ज व्हायचे. मग त्यांच्यामागे मावळे यायचे. कार्यकर्त्याला सांगण्याच्या आधी जो, स्वतः एखादा धोका पत्करायला सहज तयार होतो, अशा नेत्यांसोबत उभे राहायला हरकत नाही. मात्र 'तुम लढो हम कपडे सांभालते हैं' या टाईपच्या भुरट्या लोकांपासून जितक्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर सावध व्हा.आधी स्वतःला आधार द्या.
'जो दुसऱ्यावरी विसंबला..., त्याचा कार्यभार संपला..!
आपली बहीण,
सुषमा अंधारे