New National education policy starting in Maharashtra :- महाराष्ट्रात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी!

इयत्ता पहिलीसाठी नवीन अभ्यासक्रम  : राज्यातील ९५ हजार शिक्षकांना नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण 

New National education policy starting in Maharashtra :- महाराष्ट्रात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी!
पुणे:- इयत्ता पहिलीच्या वर्गांचे ए. आय. ने तयार केलेले छायाचित्र.

डॉ.गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १२ जून २०२५ :-  महाराष्ट्रातील शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (सन२०२५-२६) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एन.ई.पी.) अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. यामुळे यंदापासून महाराष्ट्रातील शाळांमधील पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ( सी.बी.एस.ई.)धर्तीवर नवीन अभ्यासक्रम लागू  केला जात आहे. 

इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना हा नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना कसा शिकवायचा, याबाबतचे प्रशिक्षण महाराष्ट्रातील इयत्ता पहिलीला अध्यापन करणाऱ्या सुमारे ९५ हजार शिक्षकांना दिले जाणार आहे. जिल्हा व तालुका स्तरावर स्वतंत्रपणे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यातील सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळेतील सर्व माध्यमाच्या शिक्षकांना हे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय अन्य सर्व शाळांमधील शिक्षकांसाठी स्वतंत्रपणे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

राज्यातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष दि. १६ जून २०२५ पासून सुरू होत आहे. त्यानुसार इयत्ता पहिलीच्या शिक्षकांसाठी पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतचा अध्यादेश 
दि.१६ एप्रिल २०२५ काढण्यात आलेला आहे. चालू वर्षाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शाळांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. ही अंमलबजावणी वर्गनिहाय टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. याची सुरुवात सन २०२५ -२६ या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे. त्यानंतर पुढील वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी ते सहावीच्या वर्गातील (पाचवीचा अपवाद वगळता) विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. 

दरम्यान, राज्यस्तरावरील हे प्रशिक्षण दि. २१ ते २३ मे २०२५ या कालावधीत पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) येथे घेण्यात आले.जिल्हा स्तरावरील प्रशिक्षण दि. ३० मे ते १ जून या कालावधीत पुण्यातील सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि लोणावळ्याजवळील कुसगाव येथे घेण्यात आले. तालुकास्तरावरील प्रशिक्षण दि.९ जून ते ११ जून २०२५ (पहिला टप्पा ) या कालावधीत घेण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण हे  दि. १३ जून ते १५ जून या कालावधीत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी घेतले जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील तज्ज्ञ मार्गदर्शक नितीन मेमाणे  यांनी राज्यस्तरावर प्रशिक्षण घेऊन त्यानंतर मेमाणे यांनी जिल्हास्तरावर हे प्रशिक्षण शिक्षकांना दिले आहे. या प्रशिक्षणासाठी मेमाणे यांच्याबरोबर हनुमंत जाधव, गायत्री शितोळे, वैशाली गाढवे यांनीही सुलभक म्हणून काम पाहिले.

शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचे वर्गनिहाय टप्पे 

- इयत्ता पहिली ---- सन २०२५ -२६ (यंदापासून) 

- इयत्ता दुसरी,तिसरी, चौथी, सहावी --- सन २०२६-२७ च्या शैक्षणिक वर्षापासून 

- इयत्ता पाचवी, सातवी, नववी, अकरावी --- २०२७-२८ पासून

- इयत्ता आठवी, दहावी, बारावी --- २०२८-२९ पासून 

नवीन अभ्यासक्रमाची माहिती होण्यासाठी हे प्रशिक्षण शिक्षकांना उपयुक्त असणार आहे. या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना  दर्जेदार अध्यापन करण्यासाठी व जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचविण्यासाठी फायदा होणार आहे. 

   - दत्तात्रेय जानकु वाळुंज
माजी सदस्य, शिक्षण समिती जिल्हा परिषद पुणे.