महाराष्ट्रातील साखर उत्पादन यंदा २८९.३६ लाख क्विंटलने घटले, ऊस गाळपही २१८.३१ लाख मेट्रिक टनाने कमी

राज्यात आतापर्यंत ८५१.३० लाख टनाचे गाळप पूर्ण : आणखी तीन साखर कारखाने अद्याप सुरू

महाराष्ट्रातील साखर उत्पादन यंदा २८९.३६ लाख क्विंटलने घटले, ऊस गाळपही २१८.३१ लाख मेट्रिक टनाने कमी
पुणे:- सहकारी साखर कारखाना

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १२ एप्रिल २०२५ :-   महाराष्ट्रातील साखर उत्पादनात यंदाच्या ऊस गळीत हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत २८९.३६ लाख मेट्रिक क्विंटलने घट झाली आहे. ऊसाचे एकूण गाळपही गतवर्षीच्या तुलनेत यंदा २१८.३१ लाख मेट्रिक टन इतके कमी झाले आहे. दरम्यान आणखी तीन साखर कारखान्यांचे ऊस गाळप अद्याप सुरू आहे. ही स्थिती दि. ७ एप्रिल २०२५ अखेरपर्यंतची आहे. 

गेल्या वर्षीच्या ऊस गळीत हंगामातील ७ एप्रिल २०२४ अखेरपर्यंत एकूण १ हजार ६९. ६१ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले होते. यंदाच्या ऊस गळीत हंगामात मात्र ८५१.३० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले आहे. गतवर्षीच्या आणि यंदाच्या ऊस गळीत हंगामातील साखर उत्पादनातही मोठी तफावत निर्माण झाली आहे. गतवर्षीच्या ७ एप्रिलपर्यंत १ हजार ९५.८१ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते. यंदा‌ मात्र एकूण ८०६. ४५ लाख क्विंटल इतकेच साखर उत्पादन झाले आहे. 

राज्यात यंदा सहकारी आणि खासगी मिळून एकूण २०० साखर कारखाने सुरू झाले होते. यापैकी आतापर्यंत १९७ कारखान्यांचे धुराडे बंद झाले असून उर्वरित तीन कारखान्यांचे धुराडे अद्याप सुरू आहेत. एकूण सुरू झालेल्या कारखान्यांमध्ये ९९ सहकारी आणि १०१ खासगी कारखान्यांचा समावेश होता. गतवर्षीच्या गळीत हंगामात २०७  साखर कारखाने सुरू झाले होते. यामध्ये १०३ सहकारी आणि १०४ खासगी कारखान्यांचा समावेश होता. राज्याच्या साखर आयुक्तालयातून शनिवारी दि.१२ एप्रिल) ही माहिती देण्यात आली. यंदाच्या ऊस गळीत हंगामात पुणे विभाग पहिल्यापासून आघाडीवर असून, या  विभागातून आतापर्यंतचे ऊस गाळप हे सर्वाधिक झाले आहे.

विभागनिहाय पूर्ण झालेले उसाचे गाळप (लाख मेट्रिक टनमध्ये)  

- कोल्हापूर --- २०२.७४ लाख मेट्रिक टन  
- पुणे --- २०६.६६
- सोलापूर --- १३२.३४
- अहिल्यानगर --- ११४.०६
- छत्रपती संभाजीनगर --- ८१.२४
- नांदेड --- ९८.७४
- अमरावती --- ११.८१
- नागपूर --- ३.७१