पावसाळ्यातील संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी आतापासूनच कामाला लागा!
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा आदेश : मान्सूनपुर्व कामे वेळेत पूर्ण करा!

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २९ एप्रिल २०२५ :- पावसाळा आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून यातील संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी मान्सूनपूर्व सर्व कामे वेळेत पूर्ण करा, असा आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवारी (दि.२९ एप्रिल) जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणांना दिला.यासाठी या कामांचे सुक्ष्म नियोजन करा आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा मिळण्यासाठी व नागरिकांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने नियोजन करा, अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली.
जिल्हाधिकारी डुडी यांनी मंगळवारी जिल्ह्यातील मान्सूनपूर्व कामांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, कृषी,आरोग्य, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नगर परिषद, पुणे प पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालय, ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महावितरण, वन विभाग, वन, प्रादेशिक परिवहन कार्यालय, भारतीय हवामान विभाग, जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.
डुडी म्हणाले, "पाटबंधारे विभागाने पूररेषा निश्चित करुन त्याची माहिती प्रशासनाला, महापालिकांना द्यावी. त्याप्रमाणे पूररेषेखाली येणाऱ्या झोपडपट्ट्या, अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही संबंधितांनी करावी. पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत पूर नियंत्रण आराखडा निश्चित करावा.धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत नागरिकांना पूर्वसूचना वेळेत मिळेल, याबाबतचे नियोजन करावे. सर्व धरणांची बांधकाम तपासणी पावसाळ्यापूर्वी करुन घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक व अतिधोकादायक ठिकाणे, गावे, पुल, रस्ते, पूरबाधित गावे आदीबाबतची माहिती सर्व संबंधित विभाग तसेच नागरिकांना द्यावी. धोकादायक व अतिधोकादायक ठिकाणे, गावे, पुल, रस्ते, पूरबाधित गावांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. सर्व रस्त्यांना बाजुला पट्टे भरुन घ्यावेत. पावसाळ्यात बंद रस्त्याला असलेले पर्यायी रस्त्याबाबत माहिती नागरिकांना द्यावी."
ते पुढे म्हणाले, "आणीबाणीच्या वेळी उपयोगात येणारी बुलडोझर्स, वॉटर टँकर्स, डंपर्स,अर्थमुव्हर्स, डिवॉटरींग पंप्स, जनरेटर्स, ट्री कटर्स, फल्ड लाईट, आर.सी.सी.कटर्स, आदी साहित्य चालू स्थितीमध्ये असल्याबाबतची खात्री करुन घ्यावी. आरोग्य विभागाने संभाव्य आपत्कालिन परिस्थितीचा विचार करुन नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा मिळेल, याबाबतचे नियोजन करावे. तालुकानिहाय रुग्णालय, खाटा, वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, रक्तपेढी, औषधे साठा तयार ठेवावे. साथीचे रोग व उपचारपद्धती आदीबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, याबाबत नागरिकांना माहिती द्यावी. मान्सून काळात सर्पदंशाचे प्रमाण लक्षात घेऊन पुरेसा सर्पविष प्रतिबंधक लस साठा उपलब्ध ठेवावा."
आपत्कालिन परिस्थितीचा विचार करुन कृषी विभागाने गावनिहाय पथके गठीत करावी. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी मुबलक अन्नधान्याचा साठा उपलब्ध करुन द्यावा. पूरबाधित गावाच्या अनुषंगाने आपत्कालीन यंत्रणा सर्व विभागांच्या समन्वयाने सज्ज ठेवावी. संबंधित विभागाने जिल्हास्तरापासून ते गावपातळीपर्यत आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, नागरिकांना सोप्या भाषेत परंतू अद्ययावत माहिती देण्याची कार्यवाही करावी. उपविभागीय अधिकारी यांनी तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, त्याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर करावी तसेच याबाबत नागरिकांना माहिती द्यावी, आदी सूचना दिल्या.
यावेळी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने करीत असलेल्या कामांची माहिती दिली.