तीर्थक्षेत्र, पर्यटन विकास आराखड्यातील मंजूर कामे तात्काळ पूर्ण करा!
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा आदेश: भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा समग्र आराखडा तयार करणार

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे दि. ११ एप्रिल २०२५ :- पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठीची कृती आराखड्यानुसार मंजूर असलेली सर्व कामे तात्काळ पूर्ण करावीत, असा आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शुक्रवारी (दि.११ एप्रिल) संबंधित यंत्रणांना दिला. तसेच जिल्ह्यातील भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा समग्र आराखडा तयार करण्याच्या सूचनाही डुडी यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.११ एप्रिल) तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकास आराखडासंदर्भात विकासकामांची आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.तीर्थक्षेत्र विकासांतर्गत वढू बुद्रूक व तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ,मालोजी राजे भोसले यांची गढी व हजरत चाँदशहवली बाबा दरगाह, श्री क्षेत्र जेजुरी गड, सुदुंबरे येथील श्री संत जगनाडे महाराज समाधी स्थळ, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास, अष्टविनायक गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करणे, श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा या सर्व आराखड्यांच्या विकास कामांच्या प्रगतीबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला.
या बैठकीत बोलताना ते म्हणाले, "तीर्थक्षेत्रांच्या विकास कामासंदर्भात मंदिर ट्रस्ट, संस्थान येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन,त्यांची मदत घेऊन कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत. स्थानिक पातळीवरच्या काही अडचणी असतील त्या प्रशासनातर्फे सोडण्यात येतील.काही ठिकाणी जमीन संपादनासंदर्भात येणाऱ्या अडचणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून प्रक्रिया पूर्ण करावी. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांसाठीच्या सर्व सुविधा उत्कृष्ट असल्या पाहिजेत. विकासकामे कामे पूर्ण झाल्यावर त्यांची देखभाल व दुरुस्तीसाठी समिती स्थापन करण्यात यावी."
या बैठकीला, सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यटन विभाग वनविभाग, संबंधित विभागांचे अधिकारी, मंदिर देवस्थानाचे पदाधिकारी, विकासक उपस्थित होते.
भीमाशंकर तीर्थक्षेत्र व परिसराचा समग्र विकास आराखडा तयार करणार
नाशिक येथे सन २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामधील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. भीमाशंकर तीर्थक्षेत्र हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असून येथे भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे भीमाशंकर तीर्थक्षेत्र सर्वात चांगले तीर्थक्षेत्र तयार झाले पाहिजे. त्यादृष्टीने या तीर्थक्षेत्राच्या परिसराचा समग्र विकास आराखडा तयार करावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने तसेच या परिसरातील विविध देवस्थान, धार्मिक स्थळांची विकासकामे, रस्त्याची कामे, येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी, पर्यटनाच्या दृष्टीने देण्यात येणाऱ्या सुविधा पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, इको टुरिझम आदी बाबींचा समावेश या विकास आराखड्यात करुन पुढील दहा दिवसात आराखडा प्रशासनाकडे सादर करावा आणि या विशेष विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या अगोदर येत्या दोन वर्षात ही कामे पूर्ण झाली पाहिजे. त्यादृष्टीने सर्व संबंधितांनी नियोजन करावे, असेही डुडी यांनी यावेळी सांगितले