मयत आत्म्याची शांती करण्यावरून शेजाऱ्यांमध्ये पेटलेल्या वादावर अखेर तोडगा!
वृद्ध मयत व्यक्तीचा आत्मा त्रास देत असल्याचा आरोप : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची यशस्वी मध्यस्थी

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २९ एप्रिल २०२५ :- घराशेजारी राहणाऱ्या एका कुटुंबातील वृद्ध व्यक्तीचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले. पण या निधनानंतर काही वर्षांनी या मयत वृद्ध व्यक्तीच्या शेजारी राहणाऱ्या कुंटूबातील महिला व मुले सतत आजारी पडू लागली. या आजारामागे शेजारील मयत व्यक्तीचा आत्मा अशांत असल्याचा या कुटुंबाला समज झाला आणि यासाठी त्यांनी मयत वृद्ध व्यक्तीच्या मुलांकडे तुमच्या मयत वडिलांचा आत्मा शांत करा, ते आम्हाला त्रास देत आहेत, अशी मागणी केली. यातूनच शेजारी-शेजारी राहणाऱ्या या दोन कुटुंबांमध्ये वाद पेटला. ... अखेर या वादावर मध्यस्थी करत, यशस्वी तोडगा काढण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीला यश आले आहे.
सांगली जिल्ह्यातील माडग्याळ (ता.जत ) या गावातील ही घटना आहे. हा वाद केवळ अंधश्रद्धेतून निर्माण झाला होता. तो वाद अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जाडर बोबलाद शाखेच्या कार्यकर्त्यांनी सामोपचाराने मिटवला आहे. माडग्याळ गावातील एका कुटुंबातील वृद्ध व्यक्तीचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये मुले आणि महिला सतत आजारी पडत. त्यामुळे त्या कुटुंबाला असे वाटले की " शेजारील मयत वृद्ध व्यक्तीचा आत्मा अशांत आहे. तो आमच्या घरी येऊन आमच्या कुटुंबीयांना त्रास देतो, आजारी पाडतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या मृत वडिलांच्या आत्म्याची शांती करा, त्याला खानादाना द्या, म्हणजे तो शांत होईल.'' असा तगादा मृत व्यक्तीच्या कुटुंबाकडे लावला. या गोष्टी करण्यास त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबाने नकार दिला. त्यामुळे या दोन कुटुंबात मोठा वाद झाला होता.
यातूनच मयत व्यक्तीचे कुटुंब हे करणी, जादूटोणा करते, असा अपप्रचार गावात केला गेला. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या या दोन्ही कुटुंबांनी एकमेकांशी कायमचा अबोला धरला. 'तुम्ही तुमच्या वडिलांच्या मृतात्म्याची शांती का करत नाहीत' अशी विचारणा करून मयत व्यक्तींच्या कुटुंबांना गावांमध्ये सतत अपमानित केले जात होते. त्यामुळे त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव रवि सांगोलकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सांगोलकर यांनी सोमवारी (दि.२८ एप्रिल) माडग्याळ गावी जाऊन दोन्ही कुटुंबांची एकत्र बैठक घेतली. या बैठकीस गावचे पोलीस पाटील सिद्धांना ऐवळे, 'अंनिस'चे जाडर बोबलाद शाखेचे अध्यक्ष संतोष गेजगे, संतोष शिंदे हेही उपस्थित होते.
आत्मा, पुनर्जन्म या गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या नाहीत. कोणताही मृत आत्मा येऊन आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत. घरातील सततच्या आजारपणाला वेगळी कारणे असू शकतात. ती आपण शोधली पाहिजेत. आत्म्याची शांती करून आजारपण दूर होणार नाही. वेळीच वैद्यकीय सल्ला घेतला तर, आजारपणावर नक्की मात करता येईल, असे रवी सांगोलेकर यांनी यावेळी सांगितले. अंधश्रद्धेतून असे खोटे आरोप करणे, हा जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. तुम्ही जर या कुटुंबाची पुन्हा बदनामी केली तर, आम्ही कायदेशीर कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडू, असा इशारा सांगोलेकर यांनी या कुटुंबाला दिला होता.
या बैठकीमध्ये दोन्हीही कुटुंबांचे समाधान झाले. त्या कुटुंबाने अंधश्रद्धेतून आरोप करणे आम्ही थांबवू, अशी ग्वाही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिली.अंधश्रद्धेतून असे खोटे आरोप करून कोणी बदनामी करत असेल तर, त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा, या समितीचे असे आवाहन रवी सांगोलकर, राहुल थोरात, डॉ संजय निटवे यांनी केले आहे.