पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यातील पर्यटन व्यावसायिकांचा शांततेचा कॅंडल मार्च!

पर्यटन, शांतता आणि राष्ट्रीय एकतेसाठी एकजूट : मेणबत्त्यांच्या उजेडात मौन पाळत, हल्ल्यात बळी गेलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यातील पर्यटन व्यावसायिकांचा शांततेचा कॅंडल मार्च!
पुणे :- कॅंडल मार्चमध्ये सहभागी पुण्यातील पर्यटन व्यावसायिक.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २५  एप्रिल २०२५ :-  पर्यटन हा केवळ व्यवसाय नसून, तो देशाच्या आत्म्याशी जोडलेला संवाद आहे.याच भावना लक्षात घेऊन पुणे शहरातील संपूर्ण पर्यटन व्यावसायिकांनी गुरुवारी (दि.२४ एप्रिल) बालगंधर्व रंगमंदिरासमोर एकत्र येत जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांवरील भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. 

पुण्यातील सर्व ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन,  यांच्या नेतृत्वाखाली उज्वल विकास आणि असंख्य पर्यटन क्षेत्रातील घटकांनी या शांततेच्या कॅंडल मार्चमध्ये सहभाग घेतला. यावेळी 'देश प्रथम, पर्यटकांची सुरक्षा प्रथम, त्यांची काळजी नेहमीच प्रथम आणि त्यानंतर व्यवसाय' असा एक सूर उमटला होता.काश्मीरमधील शांतता व पर्यटन रोखणे, हाच दहशतवाद्यांचा हेतू होता. पण जर आपण थांबलो, तर ती त्यांच्या विकृत हेतूंची जीत ठरेल आणि आपण ती कधीही होऊ देणार नाही, असा संकल्प यावेळी  व्यक्त करण्यात आला. 

त्यामुळे आता आपणच जबाबदारी घेतली पाहिजे,  दहशतवादाला उत्तर द्यायचं असेल तर, ते पर्यटनाच्या रूपाने देऊ. यासाठी दुप्पट पर्यटक काश्मीरला पाठवू, हेच आमचं उत्तर असेल, असे यावेळी निश्चित करण्यात आले. ही केवळ निषेध व्यक्त करण्याची घटना नाही तर ,ती आपल्या देशवासीयांसोबत असलेली बांधिलकी, काश्मीरप्रती असलेले प्रेम आणि एक दृढ निश्चय आहे. शिवाय काश्मीर आपलंच आहे आणि कायमच आपलंच राहील", असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. 

या कॅंडल मार्चमध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी मेणबत्त्यांच्या उजेडात मौन पाळत,हल्ल्यात बळी गेलेल्या निरपराध पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली व त्याच्या कुटुंबीयांच्या सोबत असल्याची भावनिक एकजूट दाखवली. 

या कॅंडल मार्चमध्ये निलेश भन्साळी, दीपक पुजारी, अमित पंडित, अनिकेत केकर,विवेक गोळे,अखिलेश जोशी,विजय मंडलिक, मेहबूब शेख, समीर कुलकर्णी, जी. कृष्णा,संतोष खवले, दुष्यंत देसाई, शशांक कुलकर्णी, अमित बोराडे, मंदार सात्रे, आणि प्रसाद सेठ, मनीष केळकर, श्रीकांत जगताप आणि प्रमोद बिडकर आदी प्रमुख पर्यटन व्यावसायिकांसह विविध पर्यटन व्यावसायिक सहभागी झाले होते. 

या सर्व पर्यटन व्यावसायिकांच्या  उपस्थितीमुळे हा कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला. त्यांनी दाखवलेली एकजूट ही संपूर्ण पर्यटन उद्योगासाठी प्रेरणादायी ठरली आणि यातून "आम्ही एकत्र आहोत. आम्ही निर्धाराने उभे आहोत.आम्ही शांततेसाठी लढतोय ते अशांततेच्या विरोधात व प्रेमाच्या बाजूने" असा संदेश देण्यात आला.