Children of farmers who committed suicide :- मुलांनो, घाबरु नका, शिका आणि आयुष्यात खूप मोठे व्हा,आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू! 

पुण्याचे सहपोलीस आयुक्त शर्मा यांचा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दिलासा : अनाथ मुलांसाठी पुणेकरांचा पुण्यजागर

Children of farmers who committed suicide :- मुलांनो, घाबरु नका, शिका आणि आयुष्यात खूप मोठे व्हा,आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू! 
पुणे :- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षण सेवा प्रकल्पाचे उद्घाटन करताना पुण्याचे सह पोलीस  आयुक्त  रंजनकुमार शर्मा, उद्योगपती कृष्णकुमार गोयल आणि श्रीकांत शिरोळे आदी.

डॉ.गजेंद्र बडे:ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १६ जून २०२५ :-  मुलांनो, तुमच्यावर आलेले संकट हे दुर्दैवी आहे. तरीपण तुम्ही या सर्व जण या दुर्दैवी संकटातून बाहेर पडण्यासाठी खंबीरपणे उभे रहा, खूप खूप शिक्षण घ्या आणि अभ्यास करून मोठ्या पदावर काम करण्याचे स्वप्न बाळगा. तुम्हाला शिक्षणासाठी जी काही मदत लागेल, ती आम्ही करु. तुम्ही मदतीची चिंता करू नका, आम्ही सर्व पुणेकर सदैव तुमच्या पाठीशी आहोत, अशा शब्दांत पुण्याचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुला-मुलींना शाब्दिक दिलासा दिला. 

पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्यावतीने पुण्य जागर या प्रकल्पांतर्गत मागील दहा वर्षांपासून मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या  मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आलेले आहे. या मुलांच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ   सोमवारी (दि. १६ जून) रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उद्योगपती कृष्णकुमार गोयल, ललित जैन, शिक्षण तज्ज्ञ डॉ. फुलचंद चाटे, प्रमिला गायकवाड, अजय पाटील, विचारवंत श्रीकांत शिरोळे, ज्येष्ठ विधीज्ञ प्रताप परदेशी, अॅड.शिवराज कदम, प्रशांत गोरे, सुपर माईंडच्या अर्चिता मडके आदी उपस्थित होते. 

या प्रकल्पाचे समन्वयक आणि भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.मिलिंद भोई यांनी यावेळी या प्रकल्पाबाबतची माहिती दिली. नांदेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले पुण्यातील अस्तित्व गुरुकुल या निवासी शाळेत शिक्षण घेत असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावला आहे. ही आपल्या सर्वांसाठी समाधानाची बाब आहे. अजूनही  नांदेडमधील अर्धापूरबरोबरच अन्य तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची साडेतीनशे विद्यार्थी या  प्रकल्पातून शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असल्याचे डॉ. भोई यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

दरम्यान, पुण्यातील शिक्षणतज्ज्ञ डॉ. फुलचंद चाटे, प्रा. सुधाकर जाधवर, कृष्णकुमार गोयल, ललित जैन, प्रमिला गायकवाड, अजय पाटील आदी पुणेकरांनी त्या साडेतीनशे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेण्याची तयारी दर्शवली. यामुळे लवकरच नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या साडेतीनशे मुलांचा या प्रकल्पात प्रवेश निश्चित होणार आहे. त्या मुलांच्या प्रगतीसाठी पुणेकर सदैव कार्यरत राहणार आहेत. 

या प्रकल्पातील विद्यार्थिनी दुर्गा क्षीरसागर आणि नियती इंगोले यांनी मनोगत व्यक्त केले. आमचे वडील गेल्यानंतर आम्ही शेती कामात आईला मदत करत होतो. त्यामुळे आमचे शिक्षण थांबले होते. पण या प्रकल्पामुळे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये आम्हाला शिक्षण घेण्याची संधी मिळाली, हे आमचे भाग्य आहे. या संधीचे आम्ही नक्की सोने करून दाखवू असे, या दोन्ही विद्या्थीनींनी सांगितले. या दोन्ही मुलींचे मनोगत ऐकताना उपस्थितांच्या  डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

वडिलांनी आत्महत्या केली म्हणून तुम्ही शिक्षण अर्धवट सोडू नका, तुम्ही फक्त जिद्द धरा, आम्ही भोई फाउंडेशनच्या माध्यमातून सदैव तुमच्या पाठीशी राहू असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर यांनी या विद्यार्थ्यांना दिला.

यावेळी  इयत्ता दहावी आणि बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. मराठवाडा आणि विदर्भातील विविध तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या भोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर  प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे  आश्वासन याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी  दिले. जिल्हा परिषदेतील कर्मचारी आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले. उदय जगताप यांनी आभार मानले.