बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे निधी परत गेल्याने शासकीय कंत्राटदारांचे ठिय्या आंदोलन 

ठेकेदारांचे देणे बाकी असताना केवळ अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे निधी परत गेल्याचा आरोप : दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी 

बांधकाम विभागाच्या  अधिकाऱ्याच्या चुकीमुळे  निधी परत गेल्याने शासकीय कंत्राटदारांचे ठिय्या आंदोलन 
पुणे:- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करताना शासकीय कंत्राटदार.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २ एप्रिल २०२५ :-  राज्यातील शासकीय कंत्राटदारांनी गेल्या वर्षभरात पूर्ण केलेल्या कामांची देयके (बिले) अदा करण्यासाठी सरकारकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी आला. पण या निधीचे मुदतीत वितरण करण्यात बांधकाम विभागातील काही अधिकारी अपयशी ठरले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी ही कृती जाणीवपूर्वक केल्यानेच हा निधी परत गेल्याचा आरोप पुणे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी केला आहे. या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे कंत्राटदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या अधिकारऱ्यांवर त्वरीत कारवाई करावी, या मागणीसाठी शासकीय कंत्राटदारांनी बुधवारी (दि.२ एप्रिल) सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. 

बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी वेळेत बिले न काढल्याने व बी. डी. एस. सिस्टीम स्लो झाल्याने सुमारे १३ कोटी रुपये सरकारकडे परत गेले आहेत. हा निधी परत जाण्यासाठी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी ठिय्या आंदोलन करणाऱ्या शासकीय कंत्राटदारांनी केली. यशिवाय काही अधिकाऱ्यांनी निधी वाटप करताना मर्जीतील कंत्राटदाराना जास्त निधी दिला व अन्य कंत्राटदरांवर अन्याय झाल्याचा आरोप करत कंत्राटदार संघटनेच्या वतीने घटनेचा या निषेध नोंदविण्यात आला. 

मुळात कंत्राटदारांची बिले अनेक वर्षांपासून रखडली आहेत. त्यातही ही बिले अदा करण्यासाठी कमी प्रमाणात निधी आला व त्याचे  चुकीच्या पद्धतीने वाटप झाल्याने कंत्राटदारांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. या रोषातूनच त्यांनी अधीक्षक अभियंता कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. ठेकेदारांचा रुद्रावतार पाहून स्वतः अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर हे या अभियंत्यांच्या ठिय्या आंदोलनात येऊन बसले व त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र भोसले, सुरेश कडू,अशोक ढमढेरे, राजेंद्र कांचन, कैलास इंगळे, संजीव पंजाबी, भालचंद्र हुलसुरे, सागर ठाकर यांच्यासह जिल्ह्यातील  कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.