तीन मित्रांची यारी, एकाचवेळी झाले समाजात भारी! एकत्र अभ्यास, एकत्र वकिली आणि आता एकाचवेळी झाले न्यायाधीश!

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तीन वकील मित्रांची न्यायाधीश पदासाठी निवड 

तीन मित्रांची यारी, एकाचवेळी झाले समाजात भारी! एकत्र अभ्यास, एकत्र वकिली आणि आता एकाचवेळी झाले न्यायाधीश!
पुणे:- एकाचवेळी न्यायाधीश पदी निवड झालेले तीन वकील मित्र.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २ एप्रिल २०२५ :-  तीन जीवलग वकील मित्रांनी वकिलीचा अभ्यास एकत्र केला. वकीलीची पदवी मिळाल्यानंतर सोबतच वकिली व्यवसाय सुरू केला आणि वकील करत असतानाच तिघांनी एकत्रच न्यायाधीश पदासाठीच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. योगायोग असा की, एकाचवेळी या तिघांनी न्यायधीश पदाच्या निवडीत बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या न्यायाधीश पदाच्या परीक्षेत या तीन मित्रांच्या मैत्रीची अनोखी  यशोगाथा समोर आली आहे. 

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूरचा ॲड. शुभम कराळे, बुरूंजवाडीचा सागर नळकांडे आणि कारेगावचा ॲड.अक्षय ताठे या तीन मित्रांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदाच्या परीक्षेत यश मिळवले असून, तिघांचीही न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. न्यायाधीश होण्याचे एकत्रितपने स्वप्न पाहिलेल्या या तिन्ही मित्रांना एकाचवेळी मिळालेल्या यशाने या मैत्रीची चर्चा रंगली आहे.

हे तिनही तरुण कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले.तिघांनी वेगवेगळ्या महाविद्यालयांतून विधी शाखेच्या पदवीचे ( एल.एल.बी.) शिक्षण पूर्ण केले. पदवी पूर्ण झाल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कायद्याची पदव्युत्तर पदवी (एल.एल.एम.) मिळवली. त्यानंतर  एकाच तालुक्यातील या तीन मित्रांची भेट पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात झाली आणि पुन्हा तिघांनी न्यायाधीश बनण्याचे स्वप्न एकत्रितपणे बघितले. ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यात हे तीन मित्र यशस्वी झाले आहेत. 

पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी वकिली करताना अनेक गाजलेल्या प्रकरणांमध्ये फिर्यादी व पीडितांना न्याय मिळवून देता आला, ही बाब माझ्यासाठी समाधानाची आहे, असे ॲड. शुभम कराळे यांनी सांगितले. दरम्यान, ॲड. सागर नळकांडे आणि ॲड. अक्षय ताठे हे दिवाणी न्यायालयात वकिली करत होते. तिघेही एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण करीत न्यायालयात कार्यरत होते.

एकत्र अभ्यास, एकत्र यश...

न्यायाधीश होण्याचे स्वप्न उराशी बाळगून या तिघांची मैत्री अधिक दृढ झाली. वकिली व्यवसाय सांभाळत त्यांनी चार वर्षे नियमित अभ्यास केला. परीक्षा जवळ आल्यावर मोबाईलचा कमीत कमी वापर करून आणि आशिलांशी मोजकाच संपर्क ठेवत अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत सन २०२३ मध्ये घेतल्या जाणाऱ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदाच्या परीक्षेसाठी तिघांनी मिळून तयारी केली. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गणेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली तिघांनी या परीक्षेसाठीचा अभ्यास केला आणि पूर्व व मुख्य परीक्षेत यश मिळवले. दरम्यान राज्य लोकसेवा आयोगाने नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या निकालानुसार राज्यातील ११४ वकिलांची न्यायाधीशपदासाठी निवड झाली आहे. यामध्ये या तिघांचाही समावेश आहे.

एका तालुक्यातून शिक्षणासाठी एकत्र निघालेला हा प्रवास आता लोकसेवेपर्यंत पोहोचला आहे. भविष्यात हे तिघे मित्र राज्यातील विविध न्यायालयांमध्ये न्यायदानाची जबाबदारी पार पाडणार आहेत.